संभाजीनगर 75 एमएलडी पाणी पुरवठा योजना कधी पूर्ण करणार? अंबादास दानवे यांचा महायुती सरकारला सवाल

संभाजीनगर महानगरपालिकेच्या पाणी पुरवठ्यासाठी 2740 कोटी रुपयांची पाणी पुरवठा योजना प्रस्तावित करण्यात आली आहे. ही योजना पूर्ण होण्यास वेळ लागणार असल्याने महानगरपालिकेच्या वतीने करण्यात येणारी 193 कोटी रुपये खर्च करून 75 एमएलडी योजना कधी पूर्ण करणार असल्याचा प्रश्न नियम 93 अन्वये विधान परिषद विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी सोमवारी सभागृहात उपस्थित केला.

शहराच्या पाणी पुरवठासाठी 900 मिलिमीटर व्यासाची पाणी पुरवठा योजना महानगरपालिकेच्या माध्यमातून राबवण्यात येत आहे. या योजनेचा मुख्य उद्देश उन्हाळ्यात योग्य प्रकारे पाणी पुरवठा व्हावा, हा असून सध्या एप्रिल महिना लागला तरी पाणी मिळत नाही, अशी माहिती देत शहराला 11 दिवसाआड पाणी मिळत असल्याची गंभीर स्थिती दानवे यांनी सभागृहासमोर मांडली.

संभाजीनगराला 240 एमएलडी पाणी मिळावे यासाठी ही विशेष योजना राबविण्यात येत आहे. मात्र, शहराला पाण्याची तातडीने आवश्यकता असताना या योजनेचे काम पूर्ण होत नाही. महानगरपालिका आणि मनपा आयुक्त यांनी पाण्याचे योग्य व्यवस्थापन केले तर दोन दिवसाला शहराला पाणी मिळू शकते, अशी अपेक्षा अंबादास दानवे यांनी व्यक्त केली. मनपा आयुक्त आणि महानगरपालिका सदरील पाणी पुरवठा योजना पूर्ण करण्यासाठी बिलकुल लक्ष देत नाही.आगामी काळात शहराला पाणी मिळावे, यासाठी जलद गतीने ही योजना राबवून दोन दिवसाला पाणी देण्यासाठी नियोजन करणार का? असा प्रश्नही दानवे यांनी उपस्थित केला..

Comments are closed.