काश्मीरच्या विषयावर मध्यस्थी स्वीकारणार नाही

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची ट्रम्प यांच्याशी 35 मिनिटे दूरध्वनीवर चर्चा, भारतभेटीच्या निमंत्रणाचा स्वीकार

वृत्तसंस्था / नवी दिल्ली

काश्मीरप्रश्नी आम्ही कोणत्याही त्रयस्थ देशाची मध्यस्थी स्वीकारणार नाही, अशी स्पष्टोक्ती पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्याशी दूरध्वनीवरून चर्चा करताना केली आहे. त्यांनी ट्रम्प यांना ‘सिंदूर’ अभियान आणि नंतरची शस्त्रसंधी यासंबंधीचा घटनाक्रम स्पष्ट करून सांगितला. ट्रम्प यांनी भारताची बाजू समजावून घेतली आणि भारताच्या दहशतवादविरोधी भूमिकेला समर्थन व्यक्त केले, अशी माहिती परराष्ट्र विभागाने दिली आहे.

पंतप्रधान नरेंद्र मोदी सध्या जी-7 संघटनेच्या शिखर परिषदेत सहभागी होण्यासाठी कॅनडाला गेले आहेत. तेथून त्यांनी ट्रम्प यांना भारतात होणाऱ्या क्वाड संघटनेच्या परिषदेचे निमंत्रण दिले. हे निमंत्रण डोनाल्ड ट्रम्प यांनी स्वीकारले आहे, अशी माहिती परराष्ट्र व्यवहार विभागाने दिली आहे. ही चार देशांची बैठक आणखी काही कालावधीनंतर भारतात घेतली जाणार आहे

‘सिंदूर’ ची सविस्तर माहिती

पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्यात दूरध्वनीवरून बुधवारी चर्चा झाली. 35 मिनिटे चाललेल्या या चर्चेत त्यांनी ट्रम्प यांना भारताने पाकिस्तानविरोधात चालविलेल्या ‘सिंदूर अभियाना’ची सविस्तर माहिती दिली. हे अभियान अद्यापही होत आहे. भारतावर पुन्हा दहशतवादी हल्ला झाल्यास ती युद्धकृती मानली जाईल आणि भारत पाकिस्ताला धडा शिकवेल, असेही पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी या चर्चेत स्पष्ट केले. ट्रम्प यांनी त्यांना कॅनडाचा दौरा करुन भारतात परतताना अमेरिकेचा दौरा करण्याचे निमंत्रण दिले होते. तथापि, त्यांचा क्रोएशिया दौरा पूर्वनिर्धारित असल्याने त्यांनी हे निमंत्रण सविनय नाकारले.

भारतभेटीच्या निमंत्रणाचा स्वीकार

आणखी काही काळानंतर भारतात क्वाड या संघटनेची बैठक आयोजित करण्यात आली आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी डोनाल्ड ट्रम्प यांना या बैठकीसाठी भारतात येण्याचे निमंत्रण दिले. या निमंत्रणाचा स्वीकार ट्रम्प यांनी केला. मला भारतात येण्यास निश्चितच आवडेल, असे ट्रम्प यांनी स्पष्ट केल्याची माहिती भारताच्या परराष्ट्र व्यवहार विभागाचे सचिव विक्रम मिसरी यांनी दिली.

अर्धवट सोडली परिषद

महत्वाच्या कारणासाठी अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प कॅनडातील जी-7 परिषद अर्धवट सोडून मंगळवारी अमेरिकेला परतले होते. आपण एक ‘मोठी घोषणा’ लवकरच करणार आहोत. या घोषणेकडे सर्वांनी लक्ष ठेवावे, असे वक्तव्य त्यांनी केले होते. त्यामुळे ते कोणती घोषणा करणार यासंबंधी जगभरात उत्सुकता निर्माण झाली आहे. कदाचित, ते इराणसंबंधी काही निर्णय घेण्याची शक्यता आहे.

भेट नाही घडली

जी-7 परिषदेच्या निमित्ताने कॅनडात पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांची भेट होईल आणि व्यापक चर्चा होईल, अशी शक्यता वर्तविली जात होती. तथापि, ट्रम्प यांनी ही परिषद अर्धवट सोडल्याने ही संभाव्य भेट होऊ शकली नाही. त्यामुळे दोन्ही नेत्यांनी दूरध्वनीवरून चर्चा केली. ही चर्चा सौहार्दपूर्ण वातावरणात झाली, अशी माहिती देण्यात आली. भारताच्या परराष्ट्र विभागाचे सचिव विक्रम मिसरी यांनी दोन्ही नेत्यांमधील संवाद पत्रकारांकडे स्पष्ट केला.

काँग्रेसची प्रतिक्रिया

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी अध्यक्ष ट्रम्प यांच्याशी बोलताना काश्मीरप्रश्नी भारताची भूमिका विशद केली. मध्यस्थी स्वीकारणार नाही, हेही स्पष्ट केले. आता सरकारने सर्वपक्षीय बैठक बोलावून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ट्रम्प यांच्याशी कोणता संवाद केला, याची माहिती या सर्वपक्षीय बैठकीत द्यावी, अशी प्रतिक्रिया काँग्रेसने, तसेच अन्य काही विरोधी पक्षांनी व्यक्त केली आहे.

संवाद नेमका काय झाला…

भारताने पाकिस्तानमधील दहशतवाद्यांचे तळ 7 मे आणि 8 मे च्या मध्यरात्री विमान हल्ले करुन उद्ध्वस्त करत सिंदूर अभियानाचा प्रारंभ केला. 9 मे या दिवशी अमेरिकेचे उपाध्यक्ष जेडी व्हान्स यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना दूरध्वनी केला. पाकिस्तान भारतावर मोठा हल्ला करण्याच्या तयारीत आहे, अशी माहिती व्हान्स यांनी त्यांना दिली. पाकिस्तानने असे केल्यास भारत पाकिस्तानला याहीपेक्षा मोठा दणका देईल, असे स्पष्ट उत्तर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी व्हान्स यांना दिले. त्यानंतर पाकिस्तानने भारतावर ड्रोन्स आणि क्षेपणास्त्रांचा हल्ला करण्याचा प्रयत्न केला. भारताने तो प्रयत्न तर पूर्णत: हाणून पाडलाच. शिवाय पाकिस्तानवर मोठा हल्ला करून त्याचे 19 वायुतळ आणि सेना आस्थापने उद्ध्वस्त केली. भारताच्या या हल्ल्यामुळे पाकिस्तानची संरक्षण व्यवस्था खिळखिळी झाली आणि त्याचे अनेक सेनातळ निकामी झाले. त्यानंतर पाकिस्तानने भारताला शस्त्रसंधीची विनंती केली. ती भारताने स्वीकारली. संपूर्ण सिंदूर अभियानात भारताची अमेरिकेशी व्यापार किंवा काश्मीरप्रश्नी मध्यस्थी यासंबंधी कोणतीही चर्चा झाली नाही. भारत काश्मीरप्रश्नी कोणत्याही अन्य देशाची मध्यस्थी स्वीकारणार नाही. यापूर्वी आम्ही कधीही मध्यस्थी स्वीकारलेली नाही. आताही स्वीकारलेली नाही आणि भविष्यातही स्वीकारणार नाही, असे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी अध्यक्ष ट्रम्प यांच्याकडे स्पष्ट केले, अशी माहिती परराष्ट्र विभागाचे सचिव विक्रम मिसरी यांनी दिली आहे.

पहलगाम हल्ल्यानंतर काय केले…

पहलगाम हल्ल्यानंतर आम्ही पाकिस्तानला त्याच्या अपेक्षेपेक्षा मोठा दणका देणार आहोत, अशी स्पष्ट घोषणा साऱ्या जगासमोर केली होती. भारताने पाकिस्तानच्या विरोधात अत्यंत संयमित कृती केली. आम्ही केवळ दहशतवाद्यांच्या केंद्रांनाच लक्ष्य केले होते. कोणत्याही नागरी वस्तीला किंवा सेनास्थळांना लक्ष्य करण्याचा आमचा विचार नव्हता. मात्र, पाकिस्तानने आमच्या नागरी वस्त्यांना आणि सेना आस्थापनांना लक्ष्य केल्यानंतर आम्ही पाकिस्तानचे लष्करी तळ आणि वायुतळ उद्ध्वस्त करण्याची कृती केली, हा घटनाक्रमही पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी अध्यक्ष ट्रम्प यांना स्पष्ट करून सांगितला, ही बाबही मिसरी यांनी अधोरेखित केली आहे.

पंतप्रधान मोदी यांच्या स्पष्टोक्तीचे महत्व

भारत आणि पाकिस्तानमधील संघर्ष अणुयुद्धात रुपांतरीत झाला असता. अमेरिकेने मध्यस्थी केली म्हणून हे अणुयुद्ध रोखले गेले, असे प्रतिपादन अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी अनेकदा केले आहे. त्यामुळे भारत सरकारने ट्रम्प यांच्यासमोर शरणागती पत्करली आहे आणि काश्मीर प्रश्नात त्यांची मध्यस्थी स्वीकारून आजवरच्या भारताच्या भूमिकेला तडा दिला आहे. यामुळे भारताची काश्मीर प्रश्नासंबंधी बाजू दुर्बल झाली आहे, अशी टीका काँग्रेससह विरोधी पक्षांनी केली होती. त्यामुळे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ट्रम्प यांच्याशी दूरध्वनीवरून संवाद साधून भारताची भूमिका त्यांच्याकडे विशद केली. मध्यस्थी स्वीकारलेली नाही आणि कधीही स्वीकारणार नाही, ही बाबही त्यांनी स्पष्टपणे मांडली. यामुळे भारतात केंद्र सरकारविरोधात विरोधी पक्षांनी उठविलेला आवाज बंद होण्याची शक्यता आहे. तसेच दहशतवादासंबंधी भारताच्या भावना किती तीव्र आहेत, हे देखील पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी अमेरिकेच्या अध्यक्षांना दाखवून दिले. भारताने काश्मीर आणि दहशतवादासंबंधीची आपली भूमिका तसूभरही बदललेली नाही, ही बाब पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि ट्रम्प यांच्या संवादावरून स्पष्ट झाली आहे

भारताचा उद्देश सफल

ड काश्मीरसंबंधी मध्यस्थीला जागा नाही, हे जगाला दाखविण्यात भारत यशस्वी

ड अमेरिकेने काश्मीर प्रश्नात मध्यस्थी केली काय, या प्रश्नावर टाकला पडदा

ड दहशतवादी हल्ला ही युद्धकृती मानली जाईल, हा संदेश पोहचला जगभरात

ड पाकिस्तानने पुन्हा कुरापत काढली, तर याहीपेक्षा मोठा दणका भारत देणार

ड शस्त्रसंधी पाकिस्तानच्या विनंतीवरुनच. कोणाच्या मध्यस्थीमुळे नाही हे स्पष्ट

Comments are closed.