BCCI चा मोठा निर्णय: टी20 वर्ल्डकपपूर्वी भारताची श्रीलंकाविरुद्ध 5 सामन्यांची मालिका निश्चित!

आयसीसी महिला एकदिवसीय विश्वचषक जिंकल्यानंतर भारतीय महिला क्रिकेट संघाने अद्याप एकही आंतरराष्ट्रीय सामना खेळलेला नाही. टीम इंडिया घरच्या मैदानावर बांगलादेशविरुद्ध मालिका खेळणार होती, परंतु खेळाडूंना अधिक विश्रांती देण्यासाठी बीसीसीआयने ती पुढे ढकलण्याचा निर्णय घेतला. बीसीसीआयने आता भारतीय महिला संघाचे पुढील आंतरराष्ट्रीय वेळापत्रक जाहीर केले आहे, ज्यामध्ये श्रीलंकेच्या महिला संघाविरुद्ध घरच्या मैदानावर पाच सामन्यांची टी20 मालिका असेल. ही मालिका 21 डिसेंबरपासून सुरू होईल आणि अंतिम सामना 30 डिसेंबरला होणार आहे.

आयसीसी महिला टी20 विश्वचषक जून 2026 मध्ये इंग्लंडमध्ये खेळला जाईल आणि त्यासाठी भारतीय महिला संघाकडे तयारीसाठी जास्त वेळ शिल्लक नाही. त्यामुळे, या मेगा इव्हेंटच्या तयारीसाठी टीम इंडियासाठी ही मालिका महत्त्वाची ठरेल. भारतीय महिला संघ या पाच सामन्यांच्या टी-20 मालिकेतील पहिला सामना 21 डिसेंबर रोजी विशाखापट्टणमच्या मैदानावर खेळणार आहे, तर दुसरा सामना 23 डिसेंबर रोजी त्याच मैदानावर खेळला जाईल. शेवटचे तीन टी-20 सामने 26,28 आणि 30 डिसेंबर रोजी तिरुअनंतपुरम स्टेडियमवर खेळले जातील. या टी-20 मालिकेत सर्वांचे लक्ष टीम इंडियाची कर्णधार हरमनप्रीत कौर, स्मृती मानधना आणि जेमिमा रॉड्रिग्जवर असेल, ज्यांनी एकदिवसीय विश्वचषकात प्रभावी फलंदाजी केली होती.

श्रीलंकेविरुद्ध टीम इंडियाचे वर्चस्व आतापर्यंत स्पष्टपणे दिसून आले आहे. टीम इंडियाने श्रीलंकेविरुद्ध एकूण 26 टी-20 आंतरराष्ट्रीय सामने खेळले आहेत, त्यापैकी 20 जिंकले आहेत आणि पाच गमावले आहेत, तर एक सामना अनिर्णित राहिला आहे. अशा परिस्थितीत, टीम इंडिया श्रीलंकेविरुद्धच्या आगामी मालिकेत हा विक्रम मजबूत करण्याचा प्रयत्न करेल.

Comments are closed.