पक्ष फोडायचा आणि आमदार गोळा करायचे हे मुलांनी पहिलीपासून शिकायचे म्हणा ना! हिंदी सक्तीवरून साहित्यिक, कलाकारांकडून सरकारचा समाचार
पहिलीपासून हिंदीची सक्ती करणाऱया सरकारविरोधात आता साहित्यिक आणि कलाकारांनीही सरकारच्या ‘मराठीद्रोही’ भूमिकेचा समाचार घेण्यास सुरुवात केली आहे. सरकार जरी हिंदी सक्तीची नसल्याचे सांगत असले तरी प्रत्यक्षात हिंदी भाषा स्वीकारण्याशिवाय विद्यार्थ्यांना पर्यायच राहणार नाही, अशीच ‘व्यवस्था’ सरकारने केली आहे. त्यामुळे ‘पक्ष फोडायचे आणि आमदार गोळा करायचे हे मुलांनी आता पहिलीपासूनच शिकायचं असंच म्हणा ना!’ असे लेखक अरविंद जगताप यांनी म्हटले आहे. तर हिंदी सक्तीमुळे मराठीचे महत्त्व कमी करण्याचा डाव असल्याचा टोला अभिनेत्यांकडून लगावण्यात आला आहे.
केंद्र सरकारच्या नव्या शिक्षण धोरणाच्या नावाखाली महाराष्ट्रात तिसरी भाषा म्हणून हिंदी पहिलीपासून शिकवण्याचा सरकारचा डाव आहे. यावर लेखक अरविंद जगताप यांनी इन्स्टाग्रामवर केलेल्या पोस्टमध्ये मराठी सक्ती करणाऱया सरकारवर उपरोधिक टीका केली आहे. त्यामध्ये ते म्हणतात, ‘पहिलीतल्या 20 मुलांनी एकत्र यायचं आणि तिसरी वेगळी भाषा निवडायची. मग हे सरकार शिक्षक देणार. म्हणजेच पक्ष फोडायचा आणि आमदार गोळा करायचे हे मुलांना पहिलीपासून शिकयाचं म्हणा, ना!, लेखक जगताप यांची ही पोस्ट चांगलीच व्हायरल होत आहे.
सक्ती नकोच – समीर चौगुले
सक्ती नकोच अशी स्पष्ट भूमिका अभिनेता समीर चौगुले यांनी मांडली आहे. आम्ही कार्यक्रमात हमरेको तुमरेको करतो त्या भाषेतही 90 टक्के मराठीच असतं. कारण आपण 90 टक्के मराठी माणसे याच प्रकारे हिंदीत व्यक्त होतो आणि ते फक्त आणि फक्त विनोदापुरतं असतं. त्यामुळे आम्हाला आमच्याच कामाचे दाखले कृपया देऊ नका, अशी भूमिका समीर चौघुले यांनी मांडली आहे.
मावशी जगवायला आणि वाढवायला कुणी ‘आई’ला मारत नाही – हेमंत ढोमे
खरंतर कुठल्याच भाषेला विरोध नाही. मात्र त्या त्या भाषेच्या लोकांनी आपल्या भाषेचा मक्ता जरूर घ्यावा. त्यात गैर काहीच नाही. मात्र हा मुद्दा महाराष्ट्रात होणाऱया मराठी भाषेच्या गळचेपीचा आहे. हिंदी मोडकीतोडकी येतेच की सगळ्यांना, पण मराठी मोडकीतोडकी येऊ नये हा मुद्दा आहे. भारत हा आपला देश आहे आणि या देशातल्या सगळ्या भाषा आपल्याच आहेत. पण ‘मावशी जगवायला आणि वाढवायला ‘आई’ला कुणी मारत नाही, असा सणसणीत टोला अभिनेता दिग्दर्शक हेमंत ढोमे यांनी लगावला आहे. एक देश, एक भाषा असा अजेंडा खपवून घेतला जाणार नाही, असा टोलाही त्यांनी हाणला.
आम्ही मराठी बोलतो. जसं जमेल तसं तोडपं मोडपं हिंदी बोलतो. तेवढं जगायला पुरेसं आहे. लहान वयात मुलांवर प्रत्यक्ष-अप्रत्यक्ष हिंदी किंवा तिसऱया भाषेची सक्ती नकोच.
हिंदी मोडकी तोडकी येतेच की सगळ्यांना, पण मराठी मोडकी तोडकी येऊ नये हा मुद्दा आहे. एक देश, एक भाषा असा अजेंडा खपवून घेतला जाणार नाही.
Comments are closed.