Ahilyanagar Rain – अहिल्यानगरला आज आणि उद्या पावसाचा ‘यलो अलर्ट’, नागरिकांना सतर्कतेचा इशारा

भारतीय हवामान खात्याने दिलेल्या अंदाजानुसार दिनांक 3 ते 4 ऑक्टोबर 2025 या कालावधीत अहिल्यानगर जिल्ह्यात वीजांचा कडकडाट, हलक्या ते मध्यम स्वरुपाच्या पावसाची शक्यता वर्तविण्यात आली आहे. या पार्श्वभूमीवर जिल्हा प्रशासनाने अहिल्यानगर जिल्ह्यासाठी ‘यलो अलर्ट’जारी करून नागरिकांना सतर्कतेचा इशारा दिला आहे.

पुणे, नाशिक, अहिल्यानगर व छत्रपती संभाजी नगर जिल्ह्यातील धरणांमधून सोडलेल्या विसर्गामुळे नद्यांच्या पाणी पातळीत वाढ होऊ शकते. त्यामुळे नदीकाठच्या नागरिकांनी सतर्क राहावे, असे आवाहन जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाकडून करण्यात आले आहे. सध्या भिमा नदीवर दौंड पूल येथे 12,038 क्युसेक, गोदावरी नदीवरील नांदूर मध्यमेश्वर धरणातून 6,310 क्युसेक, जायकवाडी धरणातून 28,296 क्युसेक, प्रवरा नदीवरील निळवंडे धरणातून 1,356 क्यूसेक,ओझर बंधारा 2,757 क्युसेक, मुळा धरणातून 3,000 क्युसेक, घोड धरणातून 4,000 क्युसेक, सीना धरणातून 3,393 क्युसेक, कुकडी नदीवरील येडगांव धरणातून 500 क्युसेक, हंगा नदीवरील विसापूर धरणातून 1,220 क्युसेक, खैरी धरण येथून 519 क्सुसेक इतका विसर्ग सुरू आहे.

प्रशासनाकडून नागरिकांना सूचना

  • मेघगर्जनेच्या वेळी, विजा चमकत असताना किंवा वादळीवारे वाहत असतांना झाडाखाली किंवा झाडांजवळ उभे राहू नये. वीजेपासून बचावासाठी सुरक्षित ठिकाणी आश्रय घ्यावा.
  • गडगडाटीच्या वादळादरम्यान व विजा चमकताना कोणत्याही विद्युत उपकरणांचा वापर करू नये, विजेच्या सुवाहक भागांशी संपर्क टाळावा, ट्रॅक्टर्स, शेतीची अवजारे, मोटारसायकल/सायकल यांचेपासून दूर रहावे.
  • मोकळे मैदान, झाडाखाली, टॉवर्स, ध्वजांचे खांब, विद्युत/दिव्यांचे खांब, धातूचे कुंपण, विदयुतवाहिनी अथवा ट्रॉन्सफॉर्मजवळ थांबू नये. सर्व प्रकारच्या अधांतरी लटकणाऱ्या/लोंबणाऱ्या केबल्स पासून दूर रहावे.
  • जाहिरात फलक (होर्डिंग्ज) कोसळून होणाऱ्या दूर्घटना टाळण्यासाठी दक्षतेची बाब म्हणून जाहिरात फलकांच्या (होर्डिंग्ज) आजूबाजूला थांबू नये व योग्य ती दक्षता घ्यावी.
  • विजा चमकत असताना मोकळ्या जागेवर असल्यास सुरक्षेसाठी गुडघ्यावर बसून हाताने आपले कान झाकावे व आपले डोके दोन्ही गुडघ्यांच्यामध्ये झाकावे, जमीनीशी कमीतकमी संपर्क असावा.
  • धरण व नदीक्षेत्रामध्ये पर्यटनासाठी जाणाऱ्या नागरिकांनी विशेष खबरदारी घ्यावी, धरणाचे पाण्यात वा नदीच्या पाण्याच्या प्रवाहामध्ये उतरू नये, धोकादायक ठिकाणी सेल्फी काढू नये.
  • नदी, ओढे व नाल्याकाठच्या नागरिकांनी दक्ष रहावे. पाणीपातळीत वाढ होत असल्यास नागरिकांनी नदीपात्रापासून तसेच ओढे व नाले यापासून दूर रहावे व सुरक्षीत स्थळी स्थलांतर करावे. नदी, ओढे-नाल्यांवरील पुल व बंधाऱ्यांवरुन पाणी वाहत असल्यास पुल/बंधारे ओलांडू नये.
  • नागरिकांनी स्थानिक प्रशासनाने दिलेल्या सुचनांचे पालन करावे. आपत्कालीन परिस्थिती उद्भवण्यापूर्वीच सुरक्षित स्थळी स्थलांतर करावे.
  • जुनाट/मोडकळीस आलेल्या व धोकादायक इमारतीमध्ये आश्रय घेऊ नये.
  • अतिवृष्टीमुळे भूस्खलन होण्याची व दरडी कोसळण्याची शक्यता असते. त्यादृष्टीने डोंगराच्या पायथ्याशी राहणाऱ्या लोकांनी दक्षता घ्यावी व वेळीच सुरक्षीत स्थळी स्थलांतर करावे. घाट रस्त्याने प्रवास करणे शक्यतो टाळावे.
  • जनावरांचे सुरक्षित ठिकाणी स्थलांतर करावे

जिल्हा नियंत्रण कक्षाचा टोल-फ्री क्रमांक 1077 असून दूरध्वनी क्रमांक 0241-2323844 व 2356940 उपलब्ध आहेत, असे आवाहनही करण्यात आले आहे.

Comments are closed.