मुंबईला लुटून तुम्ही श्रीमंत होऊ शकणार नाही, धारावीच्या मुद्द्यावरून आदित्य ठाकरेंचा हल्लाबोल
“ही मुंबई आपली आहे आणि आपलीच राहायला पाहिजे. वर्षोनुवर्षे येतेच उद्योगपती झाले आहेत. उद्योगपतींनी मुंबईला आपलं घर समजलं आहे. जगात अनेक लोक श्रीमंत झाले आणि श्रीमंत होण्यात काहीच गैर नाही, झालेच पाहिजेत. मुंबईकर जर कोणी श्रीमंत होत असेल, आपल्याला आनंद आणि अभिमानच असला पाहिजे. पण माझ्या मुंबईला लुटून तुम्ही श्रीमंत होऊ शकणार नाही. हे देखील आपण ठरवलं पाहिजे. जर तुम्हाला मुंबईत राहायचं असेल, धंदा करायचा असेल, तर मुंबईकर म्हणून राहा. मुंबईचा, मुंबादेवीचा आदर करा आणि तरच तुम्ही येथे व्यवसाय करू शकाल”, धारावी आणि मुंबईच्या मुद्द्यांवर बोलताना असा हल्लाबोल शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाचे नेते, युवासेनाप्रमुख, आमदार आदित्य ठाकरे यांनी केला आहे. मुंबईतील मुलुंड येथील कालिदास सभागृहात शिवसेनेच्या मेळाव्यात बोलताना ते असं म्हणाले आहेत.
या मेळाव्यात बोलताना आदित्य ठाकरे म्हणाले की, “छत्रपती शिवाजी महाराज यांचा राज्याभिषेक दिन सोहळा तिथीनुसार आपण साजरा करत आहोत. पण आज महाराष्ट्र आणि मुंबईवर एक मोठं संकट आपल्या दारी येऊन थांबलं आहे. निर्णय तुम्ही घ्यायचा आहे, या संकटाला तुम्ही घरात येऊ देणार आहे की, उंबरठ्यावरच परत पळवणार आहात? या निर्णय तुमच्या हातात आहे. हा निर्णय तुमचा तुम्ही मुंबईकर म्हणून घ्यायचा आहे. आपण अनेक निवडणुका पाहत आलो आहोत. पण 2017 आणि 2019 मधील आपली निवडणूक पाहिल्यानंतर पुन्हा एकदा 2024 जे वर्ष होतं, ते फार महत्त्वाचे होते. त्यात लोकसभेत महाविकास आघाडी आणि शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाला चांगलं यश मिळालं. त्याचसोबत नंतर दोन एमएलसीच्या निवडणुका आल्या, ज्या बॅलेट पेपवर झाल्या. त्याही आपण जिंकलो. सिनेटचीही निवडणूक जिंकलो.”
आदित्य ठाकरे म्हणाले, “राहुल गांधी यांची जो लेख लिहिला आहे, निवडणूक आयोगाने सेटिंग आणि मॅच फिक्सिंग करून ही मुंबईने आपल्याला 10 आमदार निवडून दिले. याचा अर्थ हाच होतो, त्यांना वर्षोनुवर्षे मुंबईला महाराष्ट्रपासून तोडायचं होतं, गिळायचं होतं. त्यांना मुंबईला गुजराल जोडायचं होतं किंवा वेगळं ठेवायचं होतं. मात्र हे प्रयत्न करून ही मुंबईला जिंकू शकले नाही. मग आता काय करायचं? तर, एका उद्यापगपतीच्या घशात घालायची मुंबई. मुंबई अशी खाजगी जमीन बनवून ठेवायची की, तुम्ही खासदार, आमदार, नगरसेवक, मंत्री, मुख्यमंत्री व्हा, तुमचा आवाज मुंबईत ऐकू जाणारच नाही. मुंबईत कोणी ऐकू शकणारच नाही, असा आवाज दाबून टाकायचा. यातच ‘लढा आपल्या मुंबई’चा या लढ्यात तुम्ही सहभागी होणार की नाही? हे तुम्हाला आज ठरवायचं आहे.”
ते म्हणाले, “गेली दोन वर्ष आपण सातत्याने जे विषय घेत आलो आहोत, मग त्यात रस्त्यांचा घोटाळा असेल. हा 6080 कोटींचा रस्ता घोटाळ्याचा विषय मी दोन वर्ष सतत मांडत आलो आहे. त्यावेळी मी पत्रकार परिषद घेऊन पंतप्रधान नरेंद्र मोदी याना विनंती केली होती की, पंतप्रधान महोदय कृपा करून तुम्ही या रस्त्याच्या भूमिपूजनाचा येऊ नका. तुमची यात बदनामी होईल. मात्र ते आले आणि त्यांनी 18 जानेवारीला भूमिपूजन केलं. त्यानंतर आपण पाहतोय, गेल्या दोन वर्षात काहीच कामे झाली नाहीत. मात्र संपूर्ण मुंबईत प्रत्येक गल्ली खोदून ठेवली आहे. आपल्या उपनगरात काही परिसर असे झाले आहेत की, गाडी, रिक्षा तर सोडा, आपणही चालत जाऊ शकत नाही. जे चांगले रस्ते होते, तेही खोदून ठेवले आहेत. मोठ्या कंत्राटदारांना अॅडव्हान्स मोबिलाइजेशनच्या नावाखाली मुंबईकरांचे पैसे दिलेले आहेत.”
ते पुढे म्हणाले, “1997 साली मुंबई महानगरपालिकेत आपली सत्ता आली. त्यावेळी 600 कोटींची तूट होती. आपण कामे करून कुठलाही टॅक्स न वाढवता 92 हजार कोटींचं सरप्लस मुंबई महानगपालिकेचं एकटीचं केलं होतं. कोणासमोर वाकायची आणि झुकायची वेळ आली नाही, दिल्लीसमोर तर कदापि नाही. पण आज एसएनशी आणि भाजपच्या घोटाळेबाज सरकारने याच 92 हजार कोटींना अडीच लाख कोटींचं परत एकदा वित्तीय तुटीत नेलं आहे. हे पैसे कोणाचे होते? तुमचे, आमचे मुंबईकरांचे होते. मात्र वापरले कोणासाठी तर, यांच्या लाडक्या कंत्राटदारांसाठी. भ्रष्टनाथ मिंधेमुळे.., मी भ्रष्टनाथ मिंधेचं म्हणणार, कारण ते भ्रष्ट आहेत. यामुळेच त्यांना गौहाटीला पाळावं लागलं होतं. याच भ्रष्टनाथ मिंधेमुळे आज आपण पाहतोय बीएसटीचे काय हाल झाले आहेत? दरवाढ झाली आहे की नाही? आपल्यावेळी बीएसटी बसने पाच किलोमीटर जाण्यासाठी पाच रुपये लागत होते. तसेच 15 किमीच्या पुढे कुठे जायचं असेल तर, 20 रुपयात आपण जाऊ शकत होतो. आता भाडेवाढ झाल्यानंतर हे दुप्पट झालं आहे. मात्र बसेस वाढले नाही, वेळेवर पगार मिळत नाही. पालिका कर्मचाऱ्यांनाही पगार मिळत नाहीय. हे हाल मुंबईचे कोणी करून ठेवले आहेत? सगळं काही चांगलं चाललं होतं, ते लुटायचं. हे लुटायचं म्हणजे यांना फक्त मुंबईची तिजोरी खाली करायची नाही तर, मुंबई आपली मराठी माणसांची आहे. तुमची-आमची मुंबई आहे, हे देखील त्यांना आपल्या हातातून खेचून घ्यायची आहे.”
धारावीच्या मुद्द्यावर बोलताना आदित्य ठाकरे म्हणाले की, “आपण धारावी अदानीच्या घशात घालायची नाही हे बोलतो, हे कशासाठी? कोणासाठी आपण लढत आहोत? का म्हणून आपण लढत आहोत? कदाचित उद्या हे आंदोलन पेटल्यानंतर तुमच्या आणि सगळ्यांच्या अंगांवर केसेस येतील. आपल्याला रस्त्यावर उतरावं लागेल. यांचे जे जेसीबी, बुलडोझर येतील, ते आपल्या खेचून काढावे लागतील.”
Comments are closed.