अति तिथे माती म्हणत शंभूराज देसाईंचा दोन मंत्र्यांवर निशाणा; भाजपला सत्तेपासून दूर ठेवणार?
सातारा : राज्यात अनेक जिल्ह्यात जिल्हा परिषद निवडणुकांसाठी युती असताना सातारा (Satara) जिल्हा परिषद निवडणुकीत भाजपने स्वबळावर निवडणुका लढवल्या. तर एकनाथ शिंदेंची शिवसेना, अजित पवार गट आणि शरद पवार गट एकत्रितपणे लढले होते. येथील निकालात कोणत्याही एका पक्षाला स्पष्ट बहुमत मिळालं नाही. मात्र, निकालानंतर भाजपला दूर ठेवत शिवसेना आणि राष्ट्रवादी सत्ता स्थापनेच्या हालचाली सुरू झाल्या आहेत. त्याच अनुषंगाने जिल्हा परिषद पंचायत समितीच्या निकालानंतर पाटणमधील विजयी सभेत मंत्री शंभूराज देसाई यांनी सूचक वक्तव्य करत मंत्री जयकुमार गोरेंना टोला लगावला. तर, गणेश नाईक यांच्यावरही टीका केली.
“निवडणुकीत पाटणमध्ये मोठे नेते आले, भाषणं झाली पण जिल्हा परिषदेचा निकाल बघा.एकीकडे राष्ट्रवादीचे दोन्ही गट आणि शिवसेना तर दुसरीकडे भाजप. मात्र, बेरीज काय झाली, अति तिथे माती होते. अति जाऊन कुठे केलं तर माणसं योग्य वेळेची योग्य संधीची वाट बघत असतात, असे शंभूराज देसाईंनी म्हटले. शंभूराज देसाईंनी नाव न घेता भाजपचे मंत्री जयकुमार गोरे आणि मंत्री गणेश नाईक यांच्यावर निशाणा साधला. दरम्यान, पालकमंत्रीऐवजी मालकमंत्री म्हणत गणेश नाईक यांनी शंभूराज देसाईंवर टीका केली होती.तर, साताऱ्यातील माणमध्ये जयकुमार गोरे यांचे बंधू आणि वहिनींचा पराभव झाला आहे.
सातारा जिल्ह्यात भाजपला शह देण्यासाठी राष्ट्रवादी शिवसेना एकत्र ?
सातारा जिल्हा परिषदच्या पंचवार्षिक निवडणुकीत कोणत्या एका पक्षाला स्पष्ट बहुमत मिळाले नाही. त्यामुळे जिल्हा परिषदेत सत्तेसाठी त्रिशंकू परिस्थिती निर्माण झाली आहे. भाजपा सर्वात मोठा पक्ष ठरला असला तरी राष्ट्रवादी काँग्रेस, शिवसेना, राष्ट्रीय काँग्रेस, स्वाभिमान शेतकरी संघटना आणि अपक्ष यांच्या भाजपविरोधी आघाडीने एकत्र ताकद दाखवत सत्ता स्थापनेच्या शर्यतीत आघाडी घेतली आहे. त्यामुळे जिल्हा परिषदेत सत्ता कोणाच्या हाती जाणार याबाबत राजकीय हालचालींना वेग आला आहे. साताऱ्यात जिल्हा परिषदेच्या सत्ता स्थापनेत राजकीय समीकरणे बदलताना दिसत आहेत. एका पंचतारांकित हॉटेलमध्ये राष्ट्रवादी आणि शिवसेना नेत्यांची बैठक पार पडली. भाजपला सत्तेपासून दूर ठेवण्यासाठी युतीतील दोन्हीही पक्षांमध्ये चर्चा सुरू झाल्या आहेत. थेट सत्ता स्थापनेसाठी प्राथमिक चर्चा झाली असल्याचे देखील मंत्री मकरंद पाटील आणि शिवसेना मंत्री शंभूराज देसाई यांनी स्पष्ट केलं आहे. त्यामुळे जिल्हा परिषदेत सत्तेचा खेळ आणखी रंगण्याची शक्यता वाढली आहे.
जिल्हा परिषदच्या निकालानुसार भाजप 27 जागेवर सर्वात मोठा पक्ष ठरला आहे. मात्र, बहुमतासाठीचा आवश्यक असलेला आकडा गाठण्यात भाजप अपयशी ठरला. राष्ट्रवादी काँग्रेसला 20 जागा, शिवसेनेला 15, स्वाभिमानी शेतकरी संघटनेला 1, अपक्ष 1, राष्ट्रीय काँग्रेसला 1, अशाच जागा मिळाल्या आहेत एकूण 65 सदस्यांच्या जिल्हा परिषदेत बहुमतासाठी 33 जागांची गरज असते यातील राष्ट्रवादी शिवसेना मिळून 35 चा आकडा होत आहे. त्यामुळे, सत्ता स्थापनेसाठी शिवसेना आणि राष्ट्रवादी यांच्यात बैठक होत आहेत. त्यामुळे भाजपने हातची संधी घालवली असल्याची सातारा जिल्ह्यात चर्चा सुरू झाली आहे.
भाजपला साताऱ्यात सत्तेपासून दूर ठेवण्याची कारणे
स्थानिक स्वराज्याच्या निवडणुका लागतात मंत्री शंभूराजे देसाई यांच्याकडून युतीमधील तिन्ही पक्षांना निमंत्रण देण्यात आले होते. मात्र भाजपने स्वबळाचा नारा देऊन युतीच्या बैठकीस भाजपच्या मंत्र्यांनी जाणे टाळले. नगरपालिकेला भाजपला घवघवीत यश मिळाल्याने भाजपने जिल्हा परिषद, पंचायत समिती मध्ये सुद्धा स्वबळाचा नारा देऊन युतीतील प्रमुख दोन पक्षांना प्रतिस्पर्धी करत त्यांच्या विरोधात मोर्चे बांधणी करण्यास सुरुवात केली. मंत्री शंभूराज देसाई यांच्या पाटण विधानसभा मतदारसंघांमध्ये मंत्री जयकुमार गोरे, मंत्री गणेश नाईक,मंत्री शिवेंद्रराजे भोसले, चित्रा वाघ यांसारख्या बड्या नेत्यांनी मंत्री शंभूराज देसाई यांना टार्गेट करून कोंडीत पकडण्याचा प्रयत्न केले होते. त्याचबरोबर दुसरीकडे राष्ट्रवादी अजितदादा गटाचे मंत्री मकरंद पाटील यांच्या वाई विधानसभा मतदारसंघात देखील मोठी मोर्चे बांधणी करून त्यांना अडचणीत आणण्यात आले. मंत्री जयकुमार गोरे ठाणमांडून खंडाळा,वाई, महाबळेश्वर या ठिकाणी जाऊन भाजप पक्ष वाढवण्याचा प्रयत्न केला होता.. त्यामुळे शिवसेना आणि राष्ट्रवादीचे दोन्हीही नेते भाजपच्या नेत्यांवर नाराज असल्याने जिल्हा परिषद च्या निवडणुकीत शिवसेना आणि राष्ट्रवादी दोन्ही एकत्र येऊन भाजप विरोधी निवडणूक लढले आणि मोठे यश या तिन्ही पक्षांना आल्याने जिल्हा परिषदेमध्ये हे तिन्ही पक्ष सत्ता स्थापन करून भाजपला विरोधी बाकावर बसू शकतात अशी चर्चा सुरू झाली आहे.
सत्ता स्थापनेचे रणधुमाळी निर्णय वरिष्ठ पातळीवर होणार की जिल्ह्यातील नेते, पदाधिकारी निर्णय घेणार
वरिष्ठ पातळीवर जिल्हा परिषदेच्या अध्यक्ष उपाध्यक्षची चर्चा होऊन निर्णय होणार की स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीमध्ये जसं स्थानिक नेत्यांना विचारून निवडणुकीमध्ये युतीमध्ये निवडणूक लढाईची केस व बळाव लढायची याचा निर्णय तसा स्थानिक नेत्यांनी घेतला त्याचप्रमाणे जिल्हा परिषदेच्या सत्ता समीकरणात देखील स्थानिक नेत्यांना विचारून निर्णय घेतला जाणार हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे..
सातारा जिल्हा परिषदेत त्रिशंकू परिस्थिती निर्माण झाली असून राष्ट्रवादी आणि शिवसेना एकत्र येऊन भाजपला सत्ता स्थापनेपासून दूर ठेवू शकते असे राजकीय जाणकारांचे मत आहे. अध्यक्ष,उपाध्यक्ष पदासाठी कोणत्या पक्षाचा उमेदवार पुढे येणार कोण कोणाला पाठिंबा देणार याकडे संपूर्ण जिल्ह्याचे लक्ष लागून राहिला आहे.
सातारा जिल्ह्यातील जिल्हा परिषद गटामध्ये पक्षीय बलाबल :
जिल्हा परिषद 65 सदस्य सत्ता स्थापनेसाठी 33 संख्या आवश्यक
भाजप २७, राष्ट्रवादी २0, शिवसेना १५, काँग्रेस १, स्वाभिमानी १, अपक्ष १
सातारा : ८ जागांमध्ये भाजप ५, राष्ट्रवादी २, स्वाभिमानी शेतकरी संघटना १
कराड दक्षिण व उत्तर : १२ जागांमध्ये भाजप ८, राष्ट्रवादी (अजित पवार गट) २, राष्ट्रीय काँग्रेस १, अपक्ष १
महाबळेश्वर : २ जागांमध्ये राष्ट्रवादी १, शिवसेना १
खंडाळा : ३ गटामध्ये राष्ट्रवादी २, भाजप १
कोरेगाव : ६ जागांमध्ये भाजप १, राष्ट्रवादी ३, शिवसेना २
पाटण : ७ जागांपैकी शिवसेना ६, भाजप १
फलटण : ८ जागांपैकी शिवसेना ५, भाजप २, राष्ट्रवादी १
माण : ५ जागांपैकी राष्ट्रवादी ३, भाजप २
खटाव : ७ जागांपैकी भाजप ४, राष्ट्रवादी ३
वाई : ४ जागांपैकी राष्ट्रवादी ३, भाजप १,
जावळी : ३ जागांपैकी भाजप २, शिवसेना १
हेही वाचा
Comments are closed.