एका लुगड्यानं कोणी म्हातारं होत नाही, भाजपची भूमिका नेहमी सोयीस्कर; शंभूराज देसाईंनी डिवचलं

सातारा: राज्यातील जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या निवडणुकांमध्ये भाजपने (BJP) सर्वाधिक जागा जिंकल्या आहेत. मात्र, शिंदेंच्या शिवसेनेनं देखील लक्षवेधी कामगिरी केली आहे. त्यातच, सातारा जिल्ह्यातही शिवसेनेला सत्ता स्थापनेची संधी आहे. मात्र, भाजपशिवाय जिल्हा परिषदेवर सत्ता स्थापनेच्या हालचाली शिवसेना आणि राष्ट्रवादीकडून गतीमान झाल्या आहेत. त्याच पार्श्वभूमीवर शिवसेना नेते तथा मंत्री शंभूराज देसाई(Shambhuraj Desai) यांनी भाजपला खोचक टोला लगावला. एका लुगडयाने कोण म्हातारे होत नाही, सत्ता स्थापनेसाठी भाजपची भूमिका नेहमी सोयीस्कर असते, असे म्हणत देसाई यांनी भाजपला डिवचलं. साताऱ्यातील जिल्हा परिषदेवर सत्ता स्थापनेवरुन भाजपला चांगलाच टोला लगावला. तसेच, जिल्हा परिषदेमध्ये (ZP) भाजपला पाठिंबा द्यायचा का नाही? याबाबत शिवसेनेचा कोणताही निर्णय अद्याप झालेला नाही, असेही शंभूराजेंनी स्पष्ट केले.

निवडणुकीच्या अगोदर मित्र पक्षांना डावलायचं आणि नंतर सत्ता स्थापन करताना सोबत असल्याचे सांगायचं ही भाजपची सोयस्कर भूमिका नेहमी असते. शिवसेनेची भूमिका ठरवणारे भाजप कोण ? जिल्हा परिषदेमध्ये पाठिंबा द्यायचा किंवा नाही याबाबतचा निर्णय अद्याप झालेला नाही. शिवसेनेचे प्रमुख उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे जो आदेश येतील त्या पद्धतीने आमचा पुढील निर्णय असणार आहे, अशी प्रतिक्रिया साताऱ्यातील सत्तास्थापनेवर मंत्री शंभूराज देसाई यांनी दिली. सांगलीमध्ये ते प्रसारमध्यमांशी बोलत होते.

एका लुडग्याने कोण म्हातारी होत नाही

एका लुगड्याने कोण म्हातारी होत नाही, निवडणुकीच्या अगोदर आणि त्यानंतर महापालिकेमध्ये भाजपने निर्णय घेतले. जिल्हा परिषदेवर सत्ता स्थापन करताना आम्ही जो निर्णय घ्यायचा तो घेऊ. सांगली जिल्ह्यात निवडून आलेल्या शिवसैनिकांशी चर्चा करून त्यांची भूमिका उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडे सांगितली जाईल. त्यानंतर शिंदे साहेब सांगतील तो निर्णय आम्ही घेऊ, असेही शंभूराज देसाई यांनी यावेळी स्पष्ट केले. विशेष म्हणजे, कालच देसाई यांनी भाजपच्या दोन मंत्र्‍यांवरही बोचरी टीका केली होती. पाटण दौऱ्यात असताना त्यांनी नाव न घेता मंत्री गणेश नाईक आणि मंत्री जयकुमार गोरे यांच्यावर निशाणा साधला होता.

साताऱ्यात सत्तास्थापनेचं गणित कसं?

जिल्हा परिषदच्या निकालानुसार भाजप 27 जागेवर सर्वात मोठा पक्ष ठरला आहे. मात्र, बहुमतासाठीचा आवश्यक असलेला आकडा गाठण्यात भाजप अपयशी ठरला. राष्ट्रवादी काँग्रेसला 20 जागा, शिवसेनेला 15, स्वाभिमानी शेतकरी संघटनेला 1, अपक्ष 1, राष्ट्रीय काँग्रेसला 1, अशाच जागा मिळाल्या आहेत एकूण 65 सदस्यांच्या जिल्हा परिषदेत बहुमतासाठी 33 जागांची गरज असते यातील राष्ट्रवादी शिवसेना मिळून 35 चा आकडा होत आहे. त्यामुळे, सत्ता स्थापनेसाठी शिवसेना आणि राष्ट्रवादी यांच्यात बैठक होत आहेत. त्यामुळे भाजपने हातची संधी घालवली असल्याची सातारा जिल्ह्यात चर्चा सुरू झाली आहे.

हेही वाचा

मराठी: परभणीत ठाकरेंच्या शिवसेनाचा मुस्लीम महापौर; एकनाथ शिंदेंची पहिली प्रतिक्रिया, उद्धव ठाकरेंना टोला

आणखी वाचा

Comments are closed.