इकडे कृष्णा आंधळे गावात येऊन गेल्याची चर्चा, तिकडे वाल्मिक कराडच्या जामीनावर मोठा निर्णय
बीड संतोष देशमुख प्रकरण अपडेट: नवी दिल्ली : बीडमधील (Beed News) संतोष देशमुख (Santosh Deshmukh Case) हत्याप्रकरणातील आरोपी वाल्मिक कराडच्या (Walmik Karad) जामीनाबाबत सुप्रीम कोर्टाने (Supreme Court) मोठा निर्णय घेतला आहे. वाल्मिक कराडचा जामीन अर्ज सर्वोच्च न्यायालयाने फेटाळला. न्यायमूर्ती एम एम सुंदरेश यांच्यासमोर आज वाल्मिक कराडच्या जामीन अर्जावर सुनावणी झाली. त्यावेळी सर्वोच्च न्यायालयाने सुनावणी करण्यास नकार दिला. दरम्यान, सुप्रीम कोर्टाने आज जरी जामीन नाकारला असला तरी वाल्मिक कराडला पुन्हा जामीनासाठी अर्ज करता येणार आहे, पण त्यासाठी वाट पाहावी लागणार आह. कारण जर ट्रायल पुढे जात नसेल तर वर्षभरात पुन्हा वाल्मिक कराड सर्वोच्च न्यायालयात येऊ शकतो. या प्रकरणाची पहिली सुनावणी 19 फेब्रुवारी रोजी करण्यात आली होती. त्यानंतर आज या प्रकरणाची सुनावणी पार पडल्यानंतर सुप्रीम कोर्टाने हा जामीन अर्ज फेटाळलाय. याआधी सुप्रीम कोर्टाच्या औरंगाबाद खंडपीठात आणि बीड जिल्हा न्यायालयात वाल्मीक कराड याचा जामीन अर्ज आणि दोष मुक्तीचा अर्ज फेटाळण्यात आला होता.
एकीकडे संतोष देशमुख हत्याप्रकरणातील फरार आरोपी कृष्णा आंधळे (Krishna Andhale) हा गावात तीनवेळा येऊन गेल्या आरोप, संतोष देशमुख यांचे बंधू धनंजय देशमुख (Dhananjay Deshmukh) यांनी केला होता. ते प्रकरण ताजे असतानाच, आता सुप्रीम कोर्टाने वाल्मिक कराडला झटका दिला आहे.
दरम्यान, सुप्रीम कोर्टातील आजच्या सुनावणीपूर्वी धनंजय देशमुख यांनी याबाबत कॅव्हेट दाखल केलं होतं. आमचे म्हणणे आम्ही न्यायालयात देणार असल्याचं देशमुख यांनी म्हटलं होतं. मागील दीड वर्षांपासून देशमुख कुटुंब आजही न्यायाच्या प्रतीक्षेत असल्याचेही ते म्हणाले.
संतोष देशमुख यांची हत्या (Santosh Deshmukh Case)
बीड जिल्ह्यातील मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख यांची 9 डिसेंबर 2024 रोजी हत्या झाली होती. 9 डिसेंबर संतोष देशमुख यांचा अपहरण झालं आणि त्यानंतर त्यांची हत्या झाल्याचे पुढे आले. 10 डिसेंबर या हत्या प्रकरणातील आरोपी जयराम चाटे आणि महेश केदार यांना केज तालुक्यातील तांबवा या ठिकाणाहून अटक झाली. 12 डिसेंबरला घुले या तिसऱ्या आरोपीला पुण्याच्या रांजणगाव येथून अटक झाली. 18 डिसेंबरला विष्णू चाटे याला बीडमधून अटक करण्यात आले. 4 जानेवारी ला सुदर्शन घुले, सुधीर सांगळे ला पुण्यातून अटक झाली..तर सिद्धार्थ सोनवणे याला कल्याण मधून अटक झाली. याप्रकरणी कृष्णा आंधळे हा एकमेव आरोपी सध्या फरार आहे.
कृष्णा आंधळे गावी येऊन गेल्याचा दावा
दरम्यान, संतोष देशमुख यांच्या हत्या प्रकरणातील (Santosh Deshmukh Murder Case) फरार आरोपी कृष्णा आंधळे (Krishna Andhale) आतापर्यंत तीन वेळा त्याच्या गावी येऊन गेल्याचा दावा धनंजय देशमुख (Dhananjay Deshmukh) यांनी केलाय. कृष्णा आंधळे गावी आल्याची माहिती त्यांनी सीआयडीला देखील दिल्याचं सांगितले. कृष्णा आंधळे मोबाईल वापरत नाही, मात्र त्याला जेलबंद कसे करायचे याचा विचार गरजेचा आहे. आमच्या कुटुंबाला या आरोपी पासून धोका आहे. हे आरोपी सैतानी वृत्तीचे असून कृष्णा आंधळेला अटक करून त्याची दिंड जिल्हाभरात काढावी, अशी मागणी धनंजय देशमुख यांनी केली.
वाल्मिक कराडच हत्येचा सूत्रधार
धनंजय मुंडे यांचे निकटवर्तीय वाल्मीक कराड हाच संतोष देशमुख यांच्या हत्या प्रकरणातील सूत्रधार आहे असं पोलिसांनी दाखल केलेल्या आरोपपत्रामध्ये म्हटलं आहे. आवादा कंपनीला खंडणी मागितल्याच्या वादामधून संतोष देशमुख यांची हत्या झाल्याचं या आरोप पत्रामध्ये म्हटलं आहे. खंडणी, ॲट्रॉसिटी, हत्या या तिन्ही घटनांचा आरोप पत्रात एकत्रित उल्लेख करण्यात आला आहे.
आणखी वाचा
Comments are closed.