न्यूझीलंडविरुद्ध फायनलमध्ये कशी असणार टीम इंडियाची प्लेइंग-11?, टीम इंडियाचा विश्वविजेता खेळाडू

भारत विरुद्ध न्यूझीलंड अंतिम T20 विश्वचषक 2026 : भारताला टी-20 वर्ल्ड कप 2026 चं विजेतेपद जिंकण्यासाठी आता फक्त न्यूझीलंडचा अडथळा पार करायचा आहे. या स्पर्धेचा अंतिम सामना अहमदाबादमधील नरेंद्र मोदी स्टेडियम येथे खेळवला जाणार आहे. या महत्त्वाच्या सामन्यासाठी टीम इंडियाने प्लेइंग-11 मध्ये बदल करावा का, याबाबत टीम इंडियाचा विश्वविजेता आणि माजी भारतीय सलामीवीर वीरेंद्र सेहवाग यांनी आपलं मत स्पष्टपणे मांडलं आहे.

प्लेइंग-11 मध्ये बदलाची गरज नाही…

भारत-इंग्लंड सेमीफायनल सामना संपल्यानंतर क्रिकबझवर बोलताना वीरेंद्र सेहवाग यांनी अंतिम सामन्याबाबत सविस्तर प्रतिक्रिया दिली. न्यूझीलंडविरुद्धच्या फायनलसाठी भारताने प्लेइंग-11 मध्ये बदल करावा का, असा प्रश्न त्यांना विचारण्यात आला होता. यावर उत्तर देताना सेहवाग म्हणाले की, त्यांच्या मते भारतीय संघाने फायनलसाठी प्लेइंग-11 मध्ये कोणताही बदल करू नये.

सेहवाग म्हणाले, “माझ्या मते फायनलमध्ये प्लेइंग-11 मध्ये बदल करण्याची गरज नाही. मात्र संघ जेव्हा अहमदाबादमध्ये पिच पाहील, ती लाल मातीची आहे की काळ्या मातीची, परिस्थिती कशी आहे आणि न्यूझीलंडची ताकद काय आहे. याचा अभ्यास केल्यानंतर एखादा टॅक्टिकल बदल केला जाऊ शकतो. पण एकूण पाहता भारतीय संघात मोठे बदल करण्याची गरज मला वाटत नाही.”

वरुण चक्रवर्तीला दिला पाठिंबा

इंग्लंडविरुद्धच्या सामन्यात फिरकीपटू वरुण चक्रवर्ती याने चार षटकांत 64 धावा दिल्या आणि जोस बटलर याचा एक महत्त्वाचा बळी घेतला. त्यावर बोलताना सेहवाग म्हणाले की, त्याची चांगलीच धुलाई झाली हे खरं, पण ती कोणत्या परिस्थितीत झाली हेही पाहणं गरजेचं आहे.

त्यांनी सांगितलं की कोलकाता असो किंवा मुंबई दोन्हीकडे फलंदाजांसाठी अतिशय अनुकूल खेळपट्ट्या होत्या. अशा परिस्थितीत किमान त्याने एक तरी फलंदाज बाद केला, हे महत्त्वाचं आहे. काही गोलंदाज तर धावा देऊनही एकही विकेट घेत नाहीत.

सेहवाग पुढे म्हणाले की, विकेट कितीही फलंदाजांसाठी अनुकूल असली तरी गोलंदाजांनी स्वतःला सावरायला शिकलं पाहिजे. “चार षटकांत साधारण 40 ते 45 धावा देऊन बाहेर पडणं योग्य ठरतं. पण इंग्लंडविरुद्ध वरुणने 15-20 धावा जास्त दिल्या,” असंही त्यांनी नमूद केलं.

टी-20 विश्वचषक 2026 साठी भारतीय संघ : सूर्यकुमार यादव (कर्णधार), अभिषेक शर्मा, तिलक वर्मा, संजू सॅमसन, शिवम दुबे, ईशान किशन, हार्दिक पांड्या, अर्शदीप सिंग, जसप्रीत बुमराह, हर्षित राणा, वरुण चक्रवर्ती, कुलदीप यादव, अक्षर पटेल, वॉशिंग्टन सुंदर, रिंकू सिंग.

हे ही वाचा –

Ind vs Nz Final T20 World Cup : टी-20 वर्ल्ड कपचा शेवटचा दिवस तोच गाजवणार….;  संजूचा ‘त्या’ फ्लॉप खेळाडूवर अजब भरोसा; न्यूझीलंडविरुद्ध येणार वादळ?

आणखी वाचा

Comments are closed.