रोहित पवारांनी घेतली नितीन गडकरींची भेट, दोन प्रकल्पास अजित पवारांचं नाव देण्याची मागणी

नवी दिल्ली: दिवंगत उपमुख्यमंत्री अजित पवार (Ajit Pawar) यांच्या निधनानंतर अनेक प्रश्न उपस्थित होत आहेत. बारामतीमधील विमान अपघात हा घातपात होता की अपघात असा संशय अनेकांना वाटतो. त्याच पार्श्वभूमीवर या विमान अपघाताची सीबीआय चौकशी करावी, अशी मागणी राष्ट्रवादी काँग्रेसच्या सर्व आमदारांकडून करण्यात आली आहे. दुसरीकडे डीजीसीएच्या अहवालावर आक्षेप घेत आमदार रोहित पवार यांनी काही प्रेझेंटेशन दाखवून व्हिसीआर कंपनीच्या मालकांचे नागरी उड्डाणमंत्र्यांशी थेट संबंध असल्याने त्यांच्यावर कारवाई होत नसल्याचे म्हटले. त्यामुळे, अजित पवारांच्या विमान अपघाताचा मुद्दा संसदेत उपस्थित करावा, अशी मागणी करत त्यांनी दिल्लीत बड्या नेत्यांची भेट घेतली. त्याच पार्श्वभूमीवर ते आज केंद्रीयमंत्री नितीन गडकरी यांनाही भेटले.

संसदेच्या अधिवेशनात अजित दादांच्या अपघाताच्या पारदर्शक चौकशीसाठी खा. सुप्रियाताईंच्या मदतीने आम्ही इंडिया आघाडीतील सर्व नेत्यांना भेटून पाठपुरावा करत आहोत. काँग्रेससह इंडिया आघाडीतील सर्वच पक्ष हे पारदर्शक चौकशीची मागणी करणार आहेत, असे रोहित पवार यांनी म्हटले. रोहित पवार यांनी काल काँग्रेस नेत्या सोनिया गांधी, काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे यांची भेट घेतली होती. त्यानंतर, आज त्यांनी भाजप नेते तथा केंद्रीयमंत्री नितीन गडकरी यांची भेट घेत अजित पवारांच्या विमान अपघाताच्या तपासाच्या अनुषंगाने चर्चा केली.

अजित पवारांचे नाव द्या – रोहित पवार

गडकरी साहेबांचे आणि अजित दादांचे अतिशय जिव्हाळ्याचे संबंध होते. ’कामाचा माणूस’ हे या दोन्ही व्यक्तिमत्त्वामधील साम्य आहे. दिल्लीत आज गडकरींची भेट घेऊन पुणे रिंग रोड, तळेगाव-चाकण-शिक्रापूर उन्नत महामार्ग यासह पुणे-शिरूर उन्नत महामार्गास स्व. अजित दादांचे नाव देण्याची विनंती केली. एखाद्या विकास प्रकल्पाला किंवा वास्तूला नाव दिल्यानंतर दुसरं नाव देणं हे योग्य ठरणार नाही. त्यामुळे संबंधित प्रकल्पाची उभारणी होत असतानाच त्यामागे मेहनत असलेल्या व्यक्तिमत्त्वाचं नाव देणं हे अधिक योग्य ठरेल. गडकरी साहेबांनी यासाठी एक प्रक्रिया असल्याचे सांगत त्या प्रक्रियेसाठी आवश्यक त्या सर्व बाबींची पूर्तता करून पाठपुरावा करण्याचा शब्द दिला, अशी माहिती रोहित पवारांनी या भेटीनंतर दिली.

संसदेतही चर्चेला विषय नाही

अजित पवारांच्या विमान अपघातासंदर्भाने मराठी स्वाभिमान जपणाऱ्या उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेकडून खा.अरविंद सावंत यांनी स्थगन प्रस्तावाच्या माध्यमातून चर्चा घडवून आणण्याचा प्रयत्न केला परंतु त्यांना बोलू दिले गेले नाही. हे पाहता, ज्याप्रमाणे राज्याच्या विधिमंडळात चर्चा होऊ दिली जात नाही त्याचप्रकारे संसदेत देखील चर्चेला कुठेतरी अडथळे आणले जात आहेत का ? असा प्रश्न पडतो. असो कितीही अडथळे आणले तरी दोषींना कोणीही वाचवू शकणार नाही हे मात्र नक्की, असे रोहित पवार यांनी म्हटले आहे.

अभिषेक मनु सिंघवींचीही भेट

दरम्यान, रोहित पवार यांनी काँग्रेसचे राज्यसभा खासदार आणि ज्येष्ठ विधीज्ञ अभिषेक मनु सिंघवी यांचीही दिल्लीत सर्वोच्च न्यायालयात भेट घेऊन अजितदादांच्या संशयास्पद विमान अपघातासंदर्भात त्यांच्याशी सल्लामसलत केली. याबाबत आम्ही जमा केलेल्या माहितीची कागदपत्रेही त्यांना दिली. त्यांनीही यासंदर्भात आम्हाला मोलाचं मार्गदर्शन केलं.

हेही वाचा

घरगुती गॅसचा तुटवडा, एजन्सीबाहेर नागरिकांच्या रांगाच रांगा; दुचाकी, चारचाकी घेऊन सिलिंडरसाठी धाव

आणखी वाचा

Comments are closed.