IPL 2026 – अंतिम सामना नरेंद्र मोदी स्टेडियमवर; कर्नाटक क्रिकेट बोर्डाने व्यक्त केली नाराजी
IPL 2026 आता निर्णायक टप्प्यावर पोहोचली असून, बीसीसीआयने 6 मे रोजी प्लेऑफ आणि अंतिम सामन्यांच्या तारखा व ठिकाणांची अधिकृत घोषणा केली आहे. या घोषणेनुसार, आयपीएल 2026 चा अंतिम सामना अहमदाबादच्या नरेंद्र मोदी स्टेडियमवर खेळवला जाणार आहे. सुरुवातीला हा सामना बंगळुरूच्या एम. चिन्नास्वामी स्टेडियमवर होईल, अशी दाट शक्यता वर्तवण्यात येत होती, मात्र बीसीसीआयने अहमदाबादची निवड केल्यामुळे कर्नाटक राज्य क्रिकेट संघटनेने (केएससीए) आपली निराशा व्यक्त केली आहे.
केएससीएचे अध्यक्ष आणि माजी क्रिकेटपटू व्यंकटेश प्रसाद यांनी या निर्णयावर प्रतिक्रिया देताना सांगितले की, या मोठ्या सामन्यांच्या आयोजनासाठी ते सातत्याने बीसीसीआयच्या संपर्कात होते आणि चिन्नास्वामी स्टेडियममध्ये सामने घेण्याबाबत औपचारिक प्रस्तावही दिला होता. या मोसमात बंगळुरूने ज्या प्रकारे आयपीएल सामन्यांचे यशस्वी आयोजन केले होते, त्यानंतर त्यांना अंतिम सामन्याची आशा होती. विशेष म्हणजे, मागील विजेता ज्या शहराचा असतो, त्याच शहरात अंतिम सामना खेळवण्याची परंपरा पाळली जाते, ज्यामुळे बंगळुरूचा दावा अधिक प्रबळ मानला जात होता.
बीसीसीआयने अंतिम सामना अन्यत्र हलवण्यामागची नेमकी कारणे केएससीएला अद्याप अधिकृतपणे कळवलेली नाहीत. या निर्णयाबाबत कर्नाटक क्रिकेट संघटनेने नाराजी व्यक्त केली असली, तरीही बीसीसीआयच्या निर्णयाचा पूर्णपणे सन्मान करणार असल्याचेही स्पष्ट केले आहे. या घडामोडींमुळे क्रिकेट वर्तुळात आता बीसीसीआयच्या या धोरणाबद्दल चर्चा सुरू झाली आहे.
Comments are closed.