कॉक्रोच जनता पार्टीचं अकाऊंट बंद, राज बब्बर संतापले; मोदी सरकारला लक्ष्य करत म्हणाले…

मुंबई : सोशल मीडियावर अल्पवधीतच कोट्यवधी फॉलोअर्सचा टप्पा गाठलेल्या कॉक्रोच जनता पार्टीच्या (Cockroach)अडचणी वाढत आहेत. आधी ट्विटर अकाऊंट हॅक झाल्यानंतर, आता इंस्टाग्राम अकाऊंट आणि वेबसाईटही बंद झाल्याने नेमकं चाललंय काय? असा प्रश्न नेटीझन्स आणि सीजेपीचे संस्थापक अभिजीत दिपके (Abhijit dipake) यांनाही पडला आहे. एकीकडे केवळ सोशल मीडियातून सक्रीय असलेल्या कॉक्रोच जनता पक्षाला मोठं समर्थन मिळत असताना सरकारकडूनच त्यांच्याविरोधात कारवाई होत असल्याचा आरोप विरोधी पक्षातील नेत्यांकडून होत आहे. काँग्रेस नेते नाना पटोले यांनी याबाबत भूमिका मांडल्यानंतर, आता अभिनेते आणि दिग्गज नेते राज बब्बर यांनीही यासंदर्भात ट्विट करत सरकारला लक्ष्य केलंय.

सरकारविरोधी भूमिका घेणाऱ्या ‘कॉक्रोच जनता पार्टी’वर कारवाई झाली असून त्यांचं इन्स्टाग्राम अंकाऊंट हॅक झालंय, ट्विटर अकाउंटही बंद करण्यात आलं आहे. तर, बॅकअप अकाउंटही हटवण्यात आलं. सोशल मीडियातून तरुणाईची एक वेगळी आणि प्रभावी डिजिटल मोहीम सुरू असतानाच आज कॉक्रोज जनता पक्षाच्या अकाऊंटबाबत सकाळी ही बातमी समोर आली. अर्थात, सरकारकडे अशी कारवाई करण्याची ताकद असते आणि ती वापरण्यात आली आहे, असे म्हणत काँग्रेस नेते तथा दिग्गज अभिनेते राज बब्बर यांनी ट्विटरवरुन मोदी सरकारला लक्ष्य केलंय. तसेच, कॉक्रोज जनता पक्षाच्या बाजुने ठामपणे भूमिका मांडली आहे.

भूतकाळात पाहिलं तर, आजचं सरकार सोशल मीडिया मोहिमांचं सर्वात मोठं लाभार्थी राहिलं आहे. मग आता त्याच मोहिमांना दडपण्याचा प्रयत्न होत असेल, तर त्याचा अर्थ काय घ्यायचा? असा सवाल राज बब्बर यांनी उपस्थित केलाय. बदल हा कुठल्याही प्लॅटफॉर्मवर अवलंबून नसतो. अपेक्षा पूर्ण झाल्या नाहीत, तर असंतोष निर्माण होणं स्वाभाविक आहे. बेरोजगारीच्या काळात पेपरफुटीसारख्या घटना म्हणजे जखमेवर मीठ चोळण्यासारखं आहे. भरती परीक्षा घेण्याच्या मागणीवर लाठीमार करणं म्हणजे उद्रेकाला निमंत्रण देण्यासारखं आहे. दोषींना संरक्षण मिळालं, तर तरुणांमध्ये संताप वाढणारच. तरुणांना आपल्या भावना व्यक्त करण्यासाठी असलेल्या माध्यमांवर पहारा ठेवण्यापेक्षा, त्यांच्या प्रश्नांकडे लक्ष देणं अधिक योग्य ठरेल, असे म्हणत राज बब्बर यांनी सरकारला आरसा दाखवण्याचं काम केलंय.

झुरळे कधीच मरत नाहीत – दिपके

केंद्र सरकारने आमचे संकेतस्थळ बंद केले आहे. 10 लाख जणांनी या संकेतस्थळावर नोंदणी केली होती. त्यापैकी 6 लाख जणांनी केंद्रीय शिक्षणमंत्री धर्मेंद्र प्रधान यांच्या राजीनाम्याची मागणी केली होती. सरकारला कॉक्रोचची इतकी भीती का वाटते? पण सरकारची हुकूमशाही वृत्ती भारतातील तरुणांचे डोळे उघडत आहे. आम्ही स्वतःसाठी एका चांगल्या भविष्याची मागणी करत होतो हाच आमचा एकमेव गुन्हा आहे. पण तुम्ही  इतक्या सहजपणे सुटका करून घेऊ शकत नाही. सध्या आम्ही आमच्या एका नवीन घराच्या उभारणीवर काम करत आहोत. झुरळे कधीच मरत नाहीत, अशी प्रतिक्रिया या कारवाईनंतर संस्थापक अभिजीत दिपके यांनी व्यक्त केली.

ट्विटर, इंस्टा आणि आता वेबसाईटही बंद

कॉक्रोच जनता पक्षाचे आधी एक्स अकाऊंट आणि नंतर इन्स्टा अकाऊंट बंद करण्यात आले होते. एक्स आणि इन्स्टाग्राम अकाऊंटवर कॉक्रोच जनता पार्टीला तुफान प्रतिसाद मिळाला होता. अवघ्या काही दिवसांमध्ये या दोन्ही समाज माध्यमांवर कॉक्रोच जनता पार्टीचे कोट्यवधी सदस्य झाले होते. मात्र,  कॉक्रोच जनता पार्टीचे एक्स अकाऊंट, इन्स्टा आणि आता वेबसाईट बंद झाल्याने त्यांना संबंधित यंत्रणांनी मोठा झटका दिल्याची चर्चा राजकीय वर्तुळात सुरू आहे. आता, कॉक्रोच जनता पार्टीचे प्रमुख अभिजीत दिपके काही प्रतिक्रिया देणार किंवा पाऊल उचलणार का? हे पाहणे महत्त्वाचे ठरेल.

हेही वाचा

कॉक्रोच जनता पार्टीचे संस्थापक अभिजीत दिपकेच्या घराबाहेर पोलिस तैनात; उपायुक्तांनी सांगितलं राज’कारण’

आणखी वाचा

Comments are closed.