वीजपुरवठ्याच्या समस्येविरोधात महावितरण कार्यालयात ‘झोपून आंदोलन’, संतप्त नागरिकाचा अनोखा निषेध
दापोली तालुक्यातील वारंवार खंडित होणाऱ्या वीजपुरवठ्यामुळे त्रस्त झालेल्या स्वरूप महाजन याने अखेर दापोली महावितरणच्या कारभाराविरोधात थेट आंदोलनाचा मार्ग स्वीकारला. दापोलीतील स्वरूप महाजन याने महावितरण कार्यालयाच्या प्रवेशद्वारातच रात्रभर झोपून आंदोलन करत प्रशासनाचे लक्ष वेधले. या अनोख्या आंदोलनाची चर्चा संपूर्ण तालुक्यात रंगली असून वीजपुरवठ्याच्या प्रश्नावर नागरिकांमध्ये असलेला तीव्र संताप पुन्हा एकदा समोर आला आहे.
गेल्या काही दिवसांपासून दापोली तालुक्यात वारंवार वीजपुरवठा खंडित होत असल्याच्या तक्रारी सातत्याने समोर येत आहेत. काही भागांमध्ये तासन्तास वीज गायब होत असल्याने नागरिकांचे दैनंदिन जीवन विस्कळीत झाले आहे. उकाड्याच्या दिवसांत नागरिकांना अंधारात रात्र काढावी लागत आहे. लहान मुले वृद्ध नागरिक यांच्यावर परिणाम होत असून व्यापारी, हॉटेल व्यावसायिक, पर्यटन व्यवसायाशी संबंधित उद्योजक आणि शेतकरी वर्गालाही मोठ्या अडचणींचा सामना करावा लागत आहे. या पार्श्वभूमीवर स्वरूप महाजन याने महावितरण कार्यालय गाठून आपला निषेध नोंदविला. मात्र केवळ निवेदन देऊन किंवा घोषणाबाजी करून थांबण्याऐवजी त्याने थेट कार्यालयाच्या दारात झोपून आंदोलन सुरू केले. “वीज नाही तर झोप तरी कुठे घ्यायची?” असा सवाल उपस्थित करत त्यांनी रात्रभर कार्यालयासमोर ठिय्या दिला. या आंदोलनामुळे परिसरात मोठी उत्सुकता निर्माण झाली होती.
दरम्यान, या आंदोलनाचा व्हिडिओ सोशल मीडियावर वेगाने व्हायरल झाला. अनेकांनी या आंदोलनाला पाठिंबा दर्शवित महावितरणच्या कार्यपद्धतीवर नाराजी व्यक्त केली. काहींनी तर “नागरिकांच्या सहनशीलतेचा अंत झाला आहे” अशा प्रतिक्रिया नोंदवत वीजपुरवठ्याच्या प्रश्नावर कायमस्वरूपी उपाययोजनांची मागणी केली. दापोली हा पर्यटनासाठी प्रसिद्ध तालुका असून दरवर्षी लाखो पर्यटक येथे भेट देतात. अशा परिस्थितीत वारंवार होणारा वीजपुरवठा खंडित होणे हे पर्यटन व्यवसायालाही धक्का देणारे ठरत असल्याची भावना व्यावसायिकांनी व्यक्त केली आहे. तसेच ग्रामीण भागातील अनेक नागरिकांनाही पिण्याच्या पाण्याच्या योजनांपासून शेतीच्या कामांपर्यंत विविध अडचणींचा सामना करावा लागत आहे.
विशेष म्हणजे, दापोलीत वीजपुरवठ्याबाबत यापूर्वीही अनेक तक्रारी, निवेदने आणि आंदोलने झाली आहेत. मात्र समस्या कायम असल्याने नागरिकांमधील असंतोष दिवसेंदिवस वाढत असल्याचे चित्र आहे. त्यामुळे महावितरणने केवळ तात्पुरती मलमपट्टी न करता वीज यंत्रणेतील त्रुटी दूर करून दर्जेदार सेवा देण्याची गरज व्यक्त होत आहे. दरम्यान, पहाटे सुमारे साडेतीन वाजण्याच्या सुमारास वीजपुरवठा पूर्ववत झाल्यानंतर आंदोलन स्थगित करण्यात आल्याची माहिती स्वरूप महाजन याने दिली. मात्र, “वीजपुरवठ्याचा प्रश्न कायमस्वरूपी सुटला नाही तर यापेक्षाही तीव्र आंदोलन छेडण्यात येईल,” असा इशाराही त्याने दिला आहे.
दापोलीकरांच्या वाढत्या नाराजीच्या पार्श्वभूमीवर आता महावितरण या प्रश्नाकडे किती गांभीर्याने पाहते आणि नागरिकांना दिलासा देण्यासाठी कोणती ठोस पावले उचलते, याकडे संपूर्ण तालुक्याचे लक्ष लागले आहे.
Comments are closed.