'विराटला त्याच्या भविष्याबद्दल निर्णय घेण्याचा पूर्ण अधिकार', माजी निवडकर्त्याचे 2027 विश्वचषकासंदर्भात वक्तव्य

भारतीय क्रिकेट संघाचे माजी कर्णधार आणि २०११ विश्वचषक विजेत्या संघाचे मुख्य निवडकर्त्यांनी विराट कोहलीबद्दल मोठे वक्तव्य केले आहे. केवळ एकाच फॉरमॅटमध्ये खेळणाऱ्या विराटची २०२७ च्या वनडे विश्वचषकासाठी संघात निवड होण्याची शक्यता कमी आहे. माजी राष्ट्रीय निवडकर्ता के श्रीकांत यांच्या मते, ज्याप्रमाणे सचिन तेंडुलकरने आपल्या भविष्याबद्दल स्वत: निर्णय घेतला, त्याप्रमाणे विराटनेही स्वत: च्या भविष्याचा निर्णय स्वत:च घ्यावा.

‘विराट हा एक उत्तम कर्णधार होता, मात्र त्याच्याकडे केवळ आयसीसी ट्रॉफीची कमतरता होती’, असा दावाही श्रीकांत यांनी केला आहे. एका वृत्त वाहिनीशी बोलताना श्रीकांत यांनी विराटबद्दल आपले हे मत मांडले आहे. ते म्हणाले, “माझ्या मते, विराटसारख्या खेळाडूला त्याचे भविष्य स्वत: च ठरवू दिले पाहिजे, जसे सचिन तेंडुलकरने केले होते. विराट एक महान खेळाडू आहे. काय करावे आणि काय करू नये, हे त्याला माहित आहे. तो एक खूप संतुलित व्यक्ती आहे. मला त्याच्याबद्दल सर्वात जास्त आवडणारी गोष्ट म्हणजे खेळाप्रती असलेली त्याची निष्ठा आणि तो एक उत्तम ‘टीम मॅन’ (संघाला प्राधान्य देणारा खेळाडू) असणे.”

“भारताला लाभलेल्या सर्वोत्तम कसोटी कर्णधारांपैकी विराट एक आहे. त्याच्या कर्णधारपदाच्या कारकिर्दीत केवळ एका आयसीसी (ICC) ट्रॉफीची कमतरता आहे. अन्यथा, माझ्या मते, विराट कोहली हा भारताचा एक उत्कृष्ट कर्णधार ठरला आहे,” असेही श्रीकांत यांनी पुढे म्हटले आहे.

सध्या विराट आयपीएल २०२६ च्या अंतिम सामन्यात झालेल्या हॅमस्ट्रिंगच्या दुखापतीमुळे संघाबाहेर आहे. त्यामुळे तो सुरू असलेल्या अफगाणिस्तान विरुद्धच्या वनडे मालिकेला मुकला आहे. त्यामुळे चाहत्यांना तो जुलैमध्ये खेळताना दिसणार आहे. भारत जुलै महिन्यात इंग्लंडमध्ये तीन सामन्यांची वनडे मालिका खेळणार आहे. या मालिकेसाठी अद्याप भारती संघ जाहीर झालेला नाही, मात्र तो या संघात असण्याची दाट शक्यता आहे. कारण तोपर्यंत विराट दुखापतीतून बरा होईल.

Comments are closed.