अभिमन्यू पवारांसाठी मी ब्राह्मण समाजाची मतं मागितली, मेधा कुलकर्णींनी निवडणुकीचा इतिहास काढला

पुणे : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीतच भाजपच्या खासदार मेधा कुलकर्णी (Medha Kulkarni) आणि आमदार अभिमन्यू पवार (Abhimanyu Pawar) यांच्यामध्ये नाराजीनाट्य रंगल्याचं दिसून आलं. पहिल्या रांगेत बसण्यावरून त्याच्यामध्ये वाद झाल्यांच दिसून आलं. त्यानंतर मेधा कुलकर्णी यांनी अभिमन्यू पवार यांच्यावर जोरदार टीका केली. अभिमन्यू पवार यांच्या निवडणुकीत आपण मतदानासाठी ब्राह्मण समाजाला आवाहन करण्यासाठी गेल्याचं त्यांनी सांगितलं. तसेच अभिमन्यू पवारांना सर्वकाही आपल्याच हाती असावं असं वाटतं, त्यामुळेच त्यांनी आपल्याला मुख्यमंत्र्यांना भेटू दिलं नसल्याचा दावाही त्यांनी केला.

पुण्यात मुख्यमंत्र्यांच्या हस्ते यूपीएससी आणि एमपीएससी उपक्रमात यशस्वी विद्यार्थी आणि त्यांच्या पालकांचा सन्मान सोहळा आयोजित करण्यात आला होता. या कार्यक्रमात पहिल्या रांगेत बसण्यावरून भाजप खासदार मेधा कुलकर्णी आणि भाजपचे औसा मतदारसंघाचे आमदार अभिमन्यू पवार यांच्यात नाराजीनाट्य रंगलं.

मेधा कुलकर्णी विरुद्ध अभिमन्यू पवार : मेधा कुलकर्णीचा दावा

हा कार्यक्रम मराठा समाजाचा आहे, तुम्ही पहिल्या रांगेत बसला तर वाद निर्माण होऊ शकतो, असं अभिमन्यू पवारांनी म्हटलाचा दावा मेधा कुलकर्णी यांनी केला. मेधा कुलकर्णी म्हणाल्या की, “पहिल्या रांगेमध्ये काही रिकाम्या खुर्च्या होत्या. त्या रिकाम्या असतील तर खासदार म्हणून माझी जागा पहिला येते. पण अभिमन्यू पवारांना त्या ठिकाणी बसायचं होतं, म्हणून धावधाव सुरू होती. प्रोटोकॉलनुसार, मी तिथे बसायला हवी होती. त्यावेळी अभिमन्यू पवार म्हणाले, हा कार्यक्रम मराठा समाजाचा आहे, तुम्ही तिथे बसाल तर वाद निर्माण होईल.”

हा कार्यक्रम मराठा समाजातील यशस्वी विद्यार्थ्यांचा होता. शासकीय प्रोटोकॉलनुसार खुर्च्यांची रचना असते, जातीप्रमाणे नसते, असं मेधा कुलकर्णी म्हणाल्या. मी कोणत्याही कार्यक्रमात गेल्यानंतर हिंदू म्हणून आपण पुढे आलं पाहिजे असं आवाहन करते, असंही त्या म्हणाल्या.

Pune Politics : पवारांसाठी ब्राह्मण समाजाची मतं मागितली

मेधा कुलकर्णी म्हणाल्या की, “अभिमन्यू पवार ज्यावेळी निवडणुकीला सामोरे जात होते त्यावेळी ते मला फोन करून करून विनंती करत होते. माझ्याकडे या, ब्राह्मण समाजाच्या मेळाव्यात मतदानासाठी आवाहन करा, अशी विनंती त्यांनी केली. त्यावेळी माझी तब्येत ठिक नसतानाही मी त्यांच्यासाठी गेले आणि ब्राह्मण समाजाला एकगठ्ठा मतदान करण्याचं आवाहन केलं. आमच्या समाजाने त्यांना मतदान केलं.”

जातीचा विषय आला कुठे?

कार्यक्रम काय सुरू आहे आणि तुम्ही काय बोलता? इथे समाजाचा विषय येतो कुठे? आपल्यासमोर देशात मोठं आव्हान आहे. त्यासाठी हिंदू म्हणून एकत्र येणं हा मुद्दा आहे. एकमेकांच्या जाती काढून काय फायदा? असा प्रश्न मेधा कुलकर्णी यांनी केला.

देवेंद्र फडणवीसांना भेटू दिलं नाही

आपल्याला या कार्यक्रमाच्या आधी देवेंद्र फडणवीसांना भेटू दिलं नसल्याचा आरोप मेधा कुलकर्णी यांनी केला. त्या म्हणाल्या की, “या कार्यक्रमाच्या आधी देवेंद्र फडणवीस व्हीआयपी लाऊंजमध्ये बसले होते. त्यावेळी मी एक गंभीर केस घेऊन आले होते. मराठा समाजाचे बांधव त्यांच्या न्यायासाठी झगडत होते, त्यांना मी घेऊन गेले होते. पण अभिमन्यू पवार यांनी अडवलं. तुम्ही आत यायचं नाही, यांना आत सोडू नका, असं त्यांनी पोलिसांना सांगितलं. देवेंद्र फडणवीसांनी कुणाला भेटायचं आणि कुणाला नाही हे आता अभिमन्यू पवार ठरवणार का?”

बसण्यावरून कोणताही वाद नाही, पण यामध्ये जातीचा संबंध कोणता आला? अभिमन्यू पवार हे स्वतःला कुणीतरी सुपिरिअर व्यक्ती समजतात असं दिसतंय. त्यामुळे मी माझ्या बॉससोबत बोलेन, असं मेधा कुलकर्णींनी स्पष्ट केलं.

आपल्याला पुण्यातील अनेक कार्यक्रमांचं निमंत्रण नसतं. आपणही पक्षाचे लहान कार्यकर्ते आहोत, पण डावललं जातं. मला मेट्रोच्या कामाचं निमंत्रण नव्हतं, पीएमआरडीएच्या पुलाच्या कार्यक्रमाचंही निमंत्रण नव्हतं. तरीही मी पेपरमध्ये वाचून कार्यक्रमाला जाते, असं सांगत मेधा कुलकर्णींनी नाराजी व्यक्त केली.

Comments are closed.