सूर्याला बाहेर बसवून श्रेयस अय्यरला किंग बनवायला गेले, पण पहिल्याच मॅचमध्ये घात झाला! 7 चेंडूंत

आयर्लंड विरुद्ध भारत 1ली T20I : एकीकडे टी-20 वर्ल्ड कप चॅम्पियन टीम इंडिया आणि दुसरीकडे कमकुवत मानला जाणारा आयर्लंडचा संघ… पण बेलफास्टमध्ये असं काही घडलं ज्याचा विचारही कदाचित एखाद्या भारतीय चाहत्याने केला नसेल. आयर्लंडने पहिल्या टी-20 सामन्यात भारताला पराभवाचा मोठा धक्का दिला आहे. सर्वात आश्चर्यकारक गोष्ट म्हणजे, आंतरराष्ट्रीय क्रिकेटच्या इतिहासात आयर्लंडने भारताला हरवण्याची ही पहिलीच वेळ आहे. आयर्लंडच्या या ऐतिहासिक विजयाचा खरा हिरो त्याचा कर्णधार लॉर्कन टकर आणि त्यांचे गोलंदाज ठरले. या लाजीरवाण्या पराभवामुळे टीम इंडियाने पहिला टी-20 सामना तर गमावलाच, पण आता भारतीय संघ ही दोन सामन्यांची टी-20 मालिकाही जिंकू शकणार नाही. जर टीम इंडियाने पुढचा सामना जिंकला, तरीही ही मालिका 1-1 अशी बरोबरीत सुटेल. वर्ल्ड कप चॅम्पियन संघासाठी आयर्लंडविरुद्ध मालिका न जिंकता येणे हा एक खूप मोठा धक्का मानला जात आहे.

कर्णधारपदाच्या पदार्पणातच श्रेयसचा ‘फ्लॉप शो’

पहिल्याच सामन्यात भारतीय संघाचा नवा कर्णधार श्रेयस अय्यर याच्याकडून चाहत्यांना आणि बीसीसीआयला एका धडाकेबाज खेळीची अपेक्षा होती. मात्र, ‘ये रे माझ्या मागल्या’ या उक्तीप्रमाणे श्रेयसने पहिल्याच सामन्यात सपशेल निराशा केली. सूर्यकुमार यादवला ज्या कारणांमुळे टी-20 च्या गणितातून बाजूला व्हावे लागले, नेमकी तीच चूक श्रेयसने आपल्या कर्णधारपदाच्या पहिल्याच सामन्यात केल्याने आता निवडकर्त्यांचे आणि बीसीसीआयचे (BCCI) टेन्शन कमालीचे वाढले आहे. टी-20 संघाचा नवा कर्णधार म्हणून मैदानात उतरलेल्या श्रेयस अय्यरसाठी फलंदाजीचा अनुभव अत्यंत क्लेशदायक ठरला. भारताची सुरुवात खराब झाली होती आणि चौथ्या षटकात अवघ्या 45 धावांवर भारताने 2 विकेट्स गमावल्या होत्या. अशा कठीण प्रसंगी श्रेयस क्रीजवर आला. दुसऱ्या बाजूने अभिषेक शर्मा आयर्लंडच्या गोलंदाजांवर वर्चस्व गाजवत आक्रमक फलंदाजी करत असल्याने, श्रेयसला खेळपट्टीवर सेट होण्यासाठी उत्तम वातावरण होते.

मात्र, श्रेयसने अत्यंत संथ सुरुवात केली. त्याने पहिल्या 6 चेंडूंवर केवळ 3 सिंगल्स घेतल्या. खेळपट्टीवर नजर स्थिरावण्याआधीच त्याने धावांची गती वाढवण्याचा घाईघाईने प्रयत्न केला आणि 6 व्या षटकात हॉलाईडच्या गोलंदाजीवर एक बेजबाबदार शॉट मारून तो झेलबाद झाला. अवघ्या 7 चेंडूत 3 धावा करून भारतीय कर्णधार पॅव्हेलियनमध्ये परतला.

बीसीसीआयची चिंता का वाढली?

टी-20 प्रकारात भारतीय संघाला एका आक्रमक आणि सातत्यपूर्ण कामगिरी करणाऱ्या मधल्या फळीची गरज आहे. सूर्याच्या जागी श्रेयसकडे ही धुरा सोपवून बोर्डाने एका नव्या पर्वाची सुरुवात केली होती. मात्र, श्रेयसच्या या पहिल्याच अपयशामुळे पुन्हा एकदा मधल्या फळीतील संथ फलंदाजी आणि दबावाखाली विकेट फेकण्याचा जुनाच प्रश्न ऐरणीवर आला आहे.

श्रेयस अय्यरची लाजिरवाणी सुरुवात

टी-20 फॉरमॅटमध्ये एम.एस. धोनी, विराट कोहली, रोहित शर्मा आणि सूर्यकुमार यादव यांनी भारतीय संघाचे पूर्णवेळ कर्णधारपद भूषवले आहे. श्रेयस अय्यर टी-20 संघाचा पाचवा पूर्णवेळ कर्णधार बनला, पण त्याच्या कर्णधारपदाच्या कारकिर्दीची सुरुवात अत्यंत निराशाजनक झाली. काही महिन्यांपूर्वीच टी-20 विश्वचषक जिंकलेल्या भारतीय संघाला पहिल्याच सामन्यात पराभव पत्करावा लागला. अय्यर वैयक्तिकरित्याही चांगली कामगिरी करू शकला नाही. त्याने 7 चेंडूंमध्ये केवळ 3 धावा केल्या.

हे ही वाचा –

IND vs IRE 1st T20 : टी-20 क्रिकेटच्या इतिहासातील मोठा उलटफेर, आयर्लंडकडून भारताचा पहिलावहिला पराभव, श्रेयस अय्यरच्या नावावर लागला कधीही न पुसणारा डाग

Comments are closed.