रवी बिश्नोईची ओव्हर नाही, तर 'या' मोठ्या चुकीमुळे भारताचा पराभव; इशान किशनचा खुलासा

भारत आणि इंग्लंड या दोन्ही संघांमध्ये 5 टी20 सामन्यांची मालिका सुरू आहे. या मालिकेतील दुसरा सामना ओल्ड ट्रॅफर्डच्या मैदानावर पार पडला. या सामन्यात भारतीय संघाला 4 गडी राखून पराभवाचा सामना करावा लागला आहे. भारतीय संघाने इंग्लंडसमोर 191 धावांचे आव्हान ठेवले होते. पण हे आव्हान इंग्लंडने सहज पूर्ण केलं आणि विजय मिळवला. या विजयासह इंग्लंडने 1-0 ने आघाडी घेतली आहे. दरम्यान या विजयानंतर भारताचा स्टार यष्टिरक्षक फलंदाज इशान किशनने भारतीय संघाच्या पराभवाचं कारण सांगितलं आहे.

भारतीय संघाच्या पराभवानंतर इशान किशन पत्रकार परिषदेत आला होता. यादरम्यान त्याला भारतीय संघाच्या प्लॅनिंगबाबत प्रश्न विचारण्यात आला. त्यावेळी तो म्हणाला, “इंग्लंडकडे खरंच खूप चांगले गोलंदाज आहेत, त्यांना इथलं वातावरण कसं आहे हे चांगल्याप्रकारे माहीत आहे. आम्ही पण आमच्या खेळत सुधारणा करण्याचा प्रयत्न करत आहोत. आम्ही हेच समजून घेण्याचा प्रयत्न करतोय की, ते आमच्याविरुद्ध कुठल्या रणनीतीचा वापर करत आहेत. एक संघ म्हणून आम्हाला विचार करावा लागेल की, मधल्या षटकांमध्ये आम्ही 20 धावा कशा करू शकतो. पुढील सामन्यात आम्ही यावर चर्चा करू आणि चांगला खेळ करू.” भारताच्या मधल्या फळीतील फलंदाज हवी तशी कामगिरी करु शकलेले नाहीत, त्यामुळे मधल्या फळीतील फलंदाजांनी योगदान द्यायला हवं, असं इशान किशनचं म्हणणं आहे.

भारतीय संघाला सलग तिसऱ्या सामन्यात पराभवाचा सामना करावा लागला आहे. सतत पराभव होण्याचा खेळाडूंच्या मानसिकतेवर परिणाम होतो. याबाबत बोलताना इशान किशन म्हणाला, “आम्ही जरी सामना जिंकू शकलो नसलो, तरीदेखील आम्ही चांगलं क्रिकेट खेळतोय. महत्वाची बाब म्हणजे, आम्हाला कुठे सुधारणा करण्याची गरज आहे, हे आम्ही हे समजून घेण्याचा प्रयत्न करतोय.”

भारतीय संघाची विजयाच्या दिशेने वाटचाल सुरु होती, पण जेकब बेथेलने भारताकडून सामना हिसकावून घेतला. याबाबत बोलताना इशान किशन म्हणाला, “सुरुवातीला सामना आमच्या हातात होता. पण 2 फ्री हिट मिळाल्याने इंग्लंडच्या फलंदाजांचं काम सोपं झालं. मला तरी हेच वाटतं की, आम्ही चांगली गोलंदाजी केली. आमचीही रणनीती होती, पण जेकब बेथेलचं कौतुक करावं लागेल. कारण तो खेळपट्टीवर टिकून राहिला आणि मिळालेल्या संधीचा पुरेपूर फायदा घेतला.”

Comments are closed.