मृत्यूनंतरही मरणयातना सुरूच; जळत्या चितेवर कोसळली धूर चिमणी, सुदैवाने नातेवाईक बचावले
ठाणे : रस्त्यावरील खड्डे असो किंवा कधी एखादा पुल पडून होणारी दुर्घटना असो, जिवंतपणी नागरिकांच्यासुरक्षिततेची हमी नाही. मात्र, आता मृत्यूनंतरही मरणयातना भोगाव्या लागत असल्याची, संतप्त भावना व्यक्त करण्याची वेळ मीरा-भाईंदरकरांवर (Mira bhaindar) आली आहे. मीरा रोड येथील स्मशानभूमीत अंत्यसंस्कार सुरू असतानाच मृतदेह ठेवण्यात आलेल्या लोखंडी चिता स्टँडवर वरुन धूर निघणाऱ्या चिमणीचा काही भाग अचानक कोसळल्याची धक्कादायक घटना घडली. सुदैवाने त्यावेळी चिता जळत असल्याने मृताच्या नातेवाईकांसह उपस्थित नागरिक तेथून सुरक्षित अंतरावर उभे होते. त्यामुळे, मोठी दुर्घटना टळली. मात्र, काही क्षणांसाठी स्मशानभूमीत भीती आणि गोंधळाचे वातावरण निर्माण झाले. दरम्यान, या घटनेनंतर मनसेसह शिवसेनाही (Shivsena) आक्रमक झाल्याचे दिसून आले.
राज्यातील अनेक गावात सध्याही स्मशानभूमी नसल्याने मृतदेहांवर अंत्यसंस्कार करण्यासाठी अग्निपरीक्षाच द्यावी लागते. अनेकदा पावसाच्या पाण्यातून वाट काढत, नदी, नाल्यातून वाट काढत स्मशानात पोहोचावे लागते. मात्र, जिथं स्मशानभूमी आहे, तिथं स्थानिक महापालिका, किंवा तत्सम जबाबदार प्रशासनाचं लक्ष नसल्याचं दिसून येत आहे. मीरा भाईंदर येथील स्मशानभूमीत चिमणी पडलेल्या घटनेवरूनही हे दिसून आले.
मीरा-भाईंदर महापालिकेच्या निष्काळजीपणावर या घटनेनंतर संतापाची लाट उसळली आहे. मनसेनंतर आता शिवसेनेनेही प्रशासनावर जोरदार हल्लाबोल करत, संबंधित अधिकाऱ्यांवर तात्काळ कारवाई करण्याची मागणी केली. तसेच, स्मशानभूमीचे स्ट्रक्चरल ऑडिट, धोकादायक भागाची त्वरित दुरुस्ती आणि संपूर्ण सुरक्षा तपासणीची मागणी केली आहे. “आज चिमणी चिता स्टँडवर कोसळली, उद्या एखाद्याचा जीव गेला तर त्याला जबाबदार कोण?” असा सवालही उपस्थित करण्यात आला आहे. आपल्या मागण्या तातडीने पूर्ण न झाल्यास तीव्र आंदोलन छेडण्याचा इशाराही देण्यात आला आहे. या घटनेमुळे महापालिकेच्या देखभाल व्यवस्थेचा बुरखा पुन्हा एकदा फाटल्याची चर्चा शहरात सुरू झाली आहे.
हेही वाचा
सोनम वांगचुकांची प्रकृती खालावली, उपोषणाकडे सरकारचे दुर्लक्ष ; दिल्ली हायकोर्टाकडून सरकारला नोटीस
Comments are closed.