VIDEO: गॉलमध्ये गोंधळ! यशस्वी जायस्वाल पुन्हा रन-आऊट, विचित्र पद्धतीने बाद झाल्याने राहुल-टीम इंडिया हैरान

श्रीलंका विरुद्ध भारत यांच्यातील कसोटी मालिकेला शनिवारी (15 ऑगस्ट) सुरूवात झाली. दोन सामन्यांच्या या मालिकेतील पहिला कसोटी सामना गॉल येथे खेळला जात आहे. भारताचा हा 600 वा कसोटी सामना असून कर्णधार शुभमन गिलने नाणेफेक जिंकत प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. भारताची सुरूवात चांगली झाली असताना सलामीवीर यशस्वी जायस्वाल एका विचित्र पद्धतीने धावबाद झाला.
11 व्या षटकाच्या शेवटच्या चेंडूंवर केएल राहुल आणि यशस्वीमध्ये गोंधळ निर्माण झालेला दिसला. केशरा नुवांथाच्या या षटकातील त्या चेंडूवर राहुलने मिड-ऑनच्या दिशेने चांगला शॉट खेळला. तो चेंडू अडवण्यासाठी नुवांथाने झेप घेतली, मात्र तो अपयशी ठरला.
नुवांथाची यादरम्यान नॉन-स्ट्रायकर एंडला धडक यशस्वीशी झाली आणि भारताचा सलामीवीर जमिनीवर पडला. तोपर्यंत राहुल एकेरी धाव घेण्यासाठी क्रीज सोडून पळाला. तो अर्ध्यापर्यंत पोहोचलाही होता. जायस्वालही उठून उभा राहिला आणि तो धाव घेण्यासाठी धावणार, तोच त्याने आपला विचार बदलला. यशस्वी गोलंदाजाच्या टोकाकडे पळाला आणि भारताचे दोन्ही सलामीवीर एकाच ठिकाणी पोहोचला.
राहुल की यशस्वी आधी कोण पोहोचले, हे पाहिले असता राहुलची बॅट गोलंदाजाच्या एंडला पहिली टच झाली आणि यशस्वी बाद झाला. चेंडू प्रभात जयसूर्याच्या हातात होता. तो त्याने विकेटकीपर निरोशन डिकवेलाच्या दिशेने फेकला. डिकवेलाने कर्णधार धनंजया डी सिल्व्हाकडे पाहिले आणि मग बेल्स उडवल्या. त्यानंतर श्रीलंकेने अपील मागे घेतले होते का आणि फलंदाज बाद झाला का, हे तपासल्यानंतर पंचांनी त्यांचा निर्णय दिला.
यशस्वी 37 चेंडूंत 32 धावा करत बाद झाला. यामुळे तो आतापर्यंत आपल्या कसोटी कारकिर्दीत तिसऱ्यांदा धावबाद झाला आहे. याआधी तो 2024 मध्ये मेलबर्न क्रिकेट स्टेडियमवर ऑस्ट्रेलियाविरुद्ध आणि गेल्या वर्षी दिल्लीत वेस्ट इंडिजविरुद्ध धावबाद झाला होता. तेव्हा त्याने अनुक्रमे 82 आणि 175 धावा केल्या होत्या.
यशस्वी बाद झाल्यानंतर भारताची धावसंख्या 11 षटकांत 47 धावांवर एक विकेट अशी होती.
सध्या खेळपट्टीवर उपकर्णधार केएल राहुल (32) आणि देवदत्त पडिक्कल (35) उपस्थित आहेत. भारताची धावसंख्या 27 षटकांनंतर एक विकेट गमावत 101 अशी आहे.
Comments are closed.