IND vs SL: ऋषभ पंत कोलंबो कसोटीत पुढे फलंदाजी करणार की नाही? फलंदाजी प्रशिक्षकांनी दिली महत्वाची अपडेट

भारत आणि श्रीलंका (India vs Srilanka) यांच्यात कोलंबोच्या सिंहलीज स्पोर्ट्स क्लब मैदानावर कसोटी मालिकेतील दुसरा सामना खेळला जात आहे. पहिल्या दिवशीचा खेळ संपला तेव्हा टॉस जिंकून प्रथम फलंदाजी करणाऱ्या भारतीय संघाने 5 बाद 300 धावा केल्या होत्या.

पहिल्या दिवसाच्या शेवटच्या शॉर्ट बॉलवर पुल शॉट खेळण्याच्या प्रयत्नात ऋषभ पंतच्या (Rishbh Pant Injury) मनगटावर चेंडू लागला, ज्यामुळे तो दुखापतग्रस्त झाला. या दुखापतीमुळे पंत 3 धावा करून ‘रिटायर्ड हर्ट’ होऊन तंबूत परतला. त्यानंतर भारताने आणखी 2 विकेट गमावल्या, पण पंत फलंदाजीसाठी परतला नाही. त्यामुळे पंत दुसऱ्या दिवशी फलंदाजीसाठी येणार की नाही, याकडे सर्वांचे लक्ष लागले होते. यावर दिवसाचा खेळ संपल्यानंतर टीम इंडियाच्या फलंदाजी प्रशिक्षकांनी मोठी अपडेट दिलेली आहे.

कोलंबो कसोटीच्या पहिल्या दिवसाचा खेळ संपल्यानंतर पत्रकार परिषदेत आलेले टीम इंडियाचे फलंदाजी प्रशिक्षक सितांशु कोटक (Team india’s Batting Coach Sitanshu Kotak on Rishbh Pant Injury) यांनी ऋषभ पंतच्या फिटनेसबाबत विचारलेल्या प्रश्नावर उत्तर दिले. ते म्हणाले की, तो आता पूर्णपणे बरा आहे आणि मला वाटते की उद्या त्याला फलंदाजी करताना कोणतीही अडचण येणार नाही. त्यांच्या या वक्तव्यावरून स्पष्ट होते की पंतची दुखापत आता ठीक असून, दुसऱ्या दिवशीच्या खेळात तो पुन्हा मैदानावर फलंदाजी करताना दिसू शकतो.

भारतीय संघाला त्यांची धावसंख्या 400 किंवा त्याहून अधिक करायची असेल, तर या डावात पंतने फलंदाजी करणे अत्यंत महत्त्वाचे आहे. गॉल कसोटी सामन्याच्या दुसऱ्या डावात पंतने शानदार अर्धशतकी खेळी केली होती. कोलंबो कसोटीच्या पहिल्या दिवशी भारतीय संघाला 300 धावांच्या टप्प्यापर्यंत नेण्यात देवदत्त पडिक्कलने (Devdatta paddikal) पुन्हा एकदा महत्त्वाची भूमिका बजावली. त्याने 117 धावांची शानदार शतकी खेळी केली. पडिक्कलशिवाय कर्णधार शुबमन गिल, जो गॉल कसोटीत काही विशेष करू शकला नव्हता, त्यानेही 50 धावांची खेळी केली. तर दिवसाच्या शेवटच्या सत्रात फलंदाजीला आलेल्या रवींद्र जडेजाने (Ravindra Jadeja) 43 धावांवर आपली विकेट गमावली.

Comments are closed.