कोळी बांधवांसाठी का खास असते नारळी पौर्णिमा?

नारळी पौर्णिमेचा सण आज मोठ्या उत्साहाने साजरा होत आहे. समुद्रपुत्र मानल्या जाणाऱ्या कोळी बांधवांसाठी हा सण महत्त्वाचा असतो. या दिवशी दर्याराजाला सोन्याचा किंवा सोन्याचा वर्ख लावलेला नारळ अर्पण करून त्याची पूजा करण्याची पूर्वापार चालत आलेली परंपरा आहे, जी आजही जपली जाते. आजच्या या दिनी जाणून घेऊयात नारळी पौर्णिमेचा सण कोळीबांधवासाठी का महत्त्वाचा आहे.

नारळी पौर्णिमा हा कोळी बांधवाचा महत्त्वाचा सण आहे. या दिवशी घरात नारळापासून बनणारे विविध गोडाधोडाचे पदार्थ बनवले जातात. जसे की नारळी भात, नारळ वडी आदी पदार्थ.
पोर्णिमेच्या दिवशी सूर्यास्तावेळी पुरुष मंडळी कमरेला रुमाल बांधून तर स्त्रिया पारंपरिक वेशभूषेत नटलेले पाहायला मिळतात.
महिला आणि पुरुष कोळी गीतांवर नाचत गाजत समुद्राकडे सोन्याचा नारळ घेऊन जातात आणि तिथे पूजा करतात.
सोन्याचं नारळ म्हणजे नारळाला सोनेरी कागदाचे वेष्टण गुंडाळले जाते आणि तो नारळ सागराला अर्पण केला जातो. पूर्वी काही कोळी बांधव सोन्याचा नारळ सुद्धा अर्पण करायचे.
नारळ अर्पण केल्यानंतर गोडाधोडाचा नैवैद्य दाखवून सागराला गाऱ्हाणं घातलं जातं.
कोळी बांधव खवळलेल्या समुद्राला नारळ अर्पण करून दर्याराजाला शांत राहण्याची विनंती करतात.
तसेच कोळीबांधव आपल्या होड्या स्वच्छ करतात, त्यांना नवीन रंग देतात, पताका व फुलांच्या माळांनी सजवतात. नवीन हंगामात होड्या आणि जाळी सुरक्षित राहोत, यासाठी त्यांचीही पूजा करतात.
नवीन हंगामात चांगली मासेमारी व्हावी, उत्तम व्यवसाय व्हावा अशी प्रार्थना केली जाते.
नारळी पौर्णिमेच्या दिवशी ढोल-ताशांच्या आणि कोळीगीतांच्या गजरात मिरवणुका काढल्या जातात.

हेही वाचा – नारळी पौर्णिमेला समुद्राला सोन्या-चांदीचा नारळ का अर्पण केला जातो?

Comments are closed.