INDW VS BANW: शेफाली नव्हे; कर्णधार हरमनप्रीतने या 2 खेळाडूंचं केलं कौतुक, म्हणाली- गरज पडली तेव्हा…

भारताने बांगलादेशचा पराभव करत महिला आशिया कप 2026च्या फायनलमध्ये प्रवेश केला आहे. टीम इंडियाने दुबईत झालेल्या उपांत्य सामन्यात बांगलादेशवर 40 धावांनी मात केली. या विजयासह भारताने विक्रमी 10व्यांदा या स्पर्धेच्या फायनलमध्ये धडक मारली आहे.

गोलंदाजीला अनुकूल खेळपट्टीवर 64 धावांची खेळी केल्याबद्दल शेफाली वर्माला सामनावीर पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. मात्र, कर्णधार हरमनप्रीत कौरने तिच्याऐवजी इतर दोन खेळाडूंचे विशेष कौतुक केले. उपांत्य सामन्यातील भारताच्या अष्टपैलू कामगिरीवर हरमनप्रीत कौर खूप समाधानी दिसली. सामन्यांनंतर तिने काय सांगितले ते जाणून घेऊया.

तुम्ही आजच्या संघाच्या कामगिरीवर समाधानी आहात का?

नक्कीच. गोष्टी ज्या प्रकारे घडत आहेत आणि आम्ही ज्या प्रकारे फलंदाजी व गोलंदाजी करत आहोत, त्याबद्दल मी खरोखरच आनंदी आहे.

दुसऱ्या डावात खेळपट्टी कशी होती?

चांगल्या चेंडूंना योग्य फळ मिळाले. जर तुम्ही चेंडूला योग्य फिरकी (रिव्होल्यूशन) दिली, तर त्याचा फायदा झाला. आज दोन्ही संघांच्या फिरकी गोलंदाजांनी खूप चांगली गोलंदाजी केली. फलंदाज धावा काढण्यासाठी खूप प्रयत्न करत होते, पण खेळपट्टीवर फिरकी गोलंदाजांसाठी भरपूर संधी होती आणि त्यांनी खेळपट्टीचा प्रभावीपणे वापर केला.

छोट्या भागीदारी झाल्या विशेषतः अशा खेळपट्टीवर जिथे परिस्थिती कशी असेल याची खात्री नसते, तिथे छोटे योगदान खूप महत्त्वाचे ठरते. आज फलंदाजी करताना आम्ही केलेल्या भागीदारी निर्णायक होत्या, तसेच रिचा घोषची फलंदाजीही महत्त्वाची ठरली; तिने काही उत्कृष्ट फटके मारले. आणि गोलंदाजीमध्ये दीप्तीची कामगिरी अप्रतिम होती. जेव्हा जेव्हा गरज भासली, तेव्हा तिने पुढाकार घेतला आणि महत्त्वाचे बळी मिळवून दिले.

सलामीवीर शेफाली वर्माच्या अर्धशतकाच्या (64) जोरावर, सात वेळा विजेतेपद पटकावणाऱ्या भारतीय संघाने पहिल्या उपांत्य सामन्यात बांगलादेशचा 40 धावांनी पराभव केला आणि रविवारी होणाऱ्या महिला आशिया कपच्या अंतिम सामन्यात स्थान निश्चित केले. आता भारत अंतिम सामन्यात श्रीलंका आणि पाकिस्तान यांच्यातील दुसऱ्या उपांत्य सामन्याच्या विजेत्याशी भिडेल.

Comments are closed.