140 कोटींच्या देशाने सीमेवर सू सू केली तरी पाकिस्तान वाहून जाईल : विजय वडेट्टीवार
भारत पाकिस्तान युद्धावरील विजय वाडेटीवार: जम्मू-काश्मीरमधील पहलगाम येथे झालेल्या दहशतवादी हल्ल्यानंतर भारत-पाकिस्तानदरम्यान तणाव (India Pakistan Tension) वाढत चालला आहे. दोन्ही देशांमध्ये युद्धसदृश परिस्थिती निर्माण झाली असून, भारत लवकरच दहशतवाद्यांविरोधात मोठी कारवाई करणार असल्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. त्याला प्रत्युत्तर म्हणून पाकिस्तानकडूनही प्रतिक्रिया येऊ शकते, हे नाकारता येत नाही. या पार्श्वभूमीवर नागरिकांनी संभाव्य संकटाचा सामना कसा करावा यासाठी नागरी संरक्षणाचे (Civil Defence) प्रशिक्षण दिले जाणार आहे. केंद्रीय गृह मंत्रालयाने देशभरातील सर्व राज्यांना उद्या बुधवारी दि. 7 मे रोजी मॉक ड्रील (युद्धसराव) राबवण्याचे आदेश दिले आहेत. केंद्र सरकारच्या (Central Government) या निर्देशावर आता राजकीय वर्तुळातून विविध प्रतिक्रिया येत आहेत. आता यावर काँग्रेस नेते विजय वडेट्टीवार (Vijay Wadettiwar) यांनी केलेले वक्तव्य चांगलेच चर्चेत आले आहे.
विजय वडेट्टीवार म्हणाले की, राजकीय परिस्थिती पाहता अतिरेकी अजूनही सापडलेले नाही, ते कुठे आहे माहित नाही, मोठ्या प्रमाणावर स्फोटक आणली गेली ती कोणी आणली हे अजून माहित पडलेले नाही. सरकारने सुरक्षेचा प्रश्न वाऱ्यावर सोडला होता. काँग्रेस पक्षाची भूमिका आहे की, सरकार जी पावलं उचलेल त्याच्या पाठीशी आम्ही राहू, असे आम्ही जाहीर केले आहे. सरकारची भूमिका युद्धाची असेल तर काँग्रेस (Congress) पक्ष सरकारला पाठिंबा देईल. मात्र वेळ का घालवत आहात? युद्ध फक्त प्रसारमाध्यमांवर सुरू आहे. प्रसारमाध्यमांवरील युद्धापेक्षा प्रत्यक्ष युद्ध करून पाकिस्तानला धडा शिकवा. सरकारने ते तातडीने करावे, अशी आमची अपेक्षा असल्याचे त्यांनी यावेळी म्हटले.
140 कोटींच्या देशाने सीमेवर सू सू केली तरी पाकिस्तान वाहून जाईल
मॉकड्रील फक्त देखावा ठरू नये. इंदिरा गांधींनी पाकिस्तानचे दोन तुकडे केले होते. लाहोरपर्यंत सैन्य घुसवले होते. आता तर युद्ध सज्जता खूप मोठी आहे. ती अनेक वर्षांच्या तयारीचा परिणाम आहे. 140 कोटींच्या देशाने सीमेवर सू सू केले तरी पाकिस्तान वाहून जाईल. पाकिस्तानची अवकात काय? त्यामुळे एक घाव दोन तुकडे करा. काँग्रेस पक्ष म्हणून आमचा त्यांना पाठिंबा आहे, असे विजय वडेट्टीवार यांनी म्हटले आहे.
चौंडीच्या मंत्रिमंडळ बैठकीवरून विजय वडेट्टीवारांचा हल्लाबोल
दरम्यान, मुंबई, नागपूर आणि छत्रपती संभाजीनगर नंतर आज इतिहासात प्रथमच अहिल्यानगरच्या चौंडीत राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीचे आयोजन करण्यात आले आहे. याबाबत विचारले असता विजय वडेट्टीवार म्हणाले की, चौंडीला कॅबिनेट होत आहे, तो सरकारचा निर्णय आहे. हे राजकीय हेतून होत आहे. धनगर समाजाची मते मिळवण्यासाठी होत आहे. धनगर समाजासाठी निर्णय घ्यायचे होते तर मंत्रालयात बसून घेता आले असते आणि शंभर दीडशे कोटींचा मंत्रिमंडळ बैठकीवर होणारा खर्च धनगरांसाठी वापरता आला असता, असा हल्लाबोल त्यांनी यावेळी केला आहे.
https://www.youtube.com/watch?v=t_oahy_obfm
आणखी वाचा
अधिक पाहा..
Comments are closed.