अजितदादांनी उद्घाटन केलेल्या ‘त्या’ सिटीस्कॅन मशीननेच शेवटी त्यांचा मृतदेह स्कॅन केला, जय पवारा

अजित पवार आणि जय पवार अजित पवार यांच्या विमान अपघातानंतर त्यांचा मृतदेह बारामतीच्या वैद्यकीय महाविद्यालयात नेण्यात आला होता. त्यावेळी पोस्टमार्टेम करताना अजितदादांचा (Ajit Pawar death) मृतदेह त्यांनीच काही महिन्यांपूर्वी उद्घाटन केलेल्या सिटीस्कॅन मशीनमध्ये ठेवण्यात आला होता. अजितदादा आपल्याला सोडून जातील आणि अशी वेळ कधी आपल्यावर येईल, असे आम्हाला वाटलेही नव्हते, असा भावनिक प्रसंग अजित पवार यांचे पुत्र जय पवार (Jay Pawar) यांनी सांगितला. राज्याचे दिवंगत उपमुख्यमंत्री अजित पवार यांची आज जयंती आहे. यानिमित्ताने त्यांचे पुत्र जय पवार यांनी ‘एबीपी माझा’ला दिलेल्या मुलाखतीत अजितदादांच्या निधनापूर्वीच्या काही घडामोडींविषयी भाष्य केले. यावेळी अजित पवार यांच्या शेवटच्या दिवसांतील काही आठवणी सांगताना जय पवार यांचा कंठ दाटून आला होता. (Ajit Pawar Plane Crash)

28 जानेवारीला मला सकाळी पार्थ दादाचा फोन आला, असं असं झालंय. मी फोन कट करुन गाडीत बसलो आणि स्वत: गाडी चालवत मेडिकल कॉलेजला पोहोचलो. मला वाटतं, अजितदादांचा मृतदेह पाहणारा पवार कुटुंबातील पहिली व्यक्ती मीच होतो. तिकडे पोहोचल्यानंतर आणखी एक महत्त्वाचा निर्णय घ्यायचा होता. दादांचं पोस्टमार्टेम करायचे की नाही? त्यावेळी पार्थ दादा आणि सुनेत्रा वहिनी विमानात होते. त्यांच्याशी संपर्क होत नव्हता. मात्र, पोस्टमार्टेम महत्त्वाचे असल्याने तो निर्णय घ्यावा लागला. आम्ही दादांना घेऊन पोस्टमार्टेमसाठी गेलो. काही महिन्यांपूर्वीच दादांनी त्या सीटीस्कॅन मशिनचं उद्घाटन केले होते, त्याच रुममध्ये दादांचा मृतदेह स्कॅन करत होते. कधी असं वाटलं नव्हतं, अशी वेळ येईल दादा असे सोडून जातील, असे जय पवार यांनी सांगितले.

Ajit Pawar: अजित पवार म्हणाले, ही निवडणूक शेवटी, मग आपण सुट्टीवर जाऊ: जय पवार

या मुलाखतीत जय पवार यांनी अजितदादांच्या शेवटच्या दिवसांतील काही आठवणी सांगितल्या. दादांशी आमचं शेवटचं बोलणं 27 तारखेला झालं, आमची शेवटची भेट 26 जानेवारीला झाली होती. का माहिती नाही, तो दिवस वेगळाच होता. त्यादिवशी मी सकाळी सात वाजता जिजाई बंगल्यावर पोहोचला. तिथे दादांची आणि माझी काही लोकांसोबत बैठक झाली. एरवी बैठक संपल्यावर मी माझ्या कामासाठी पुढे जायचो. पण त्यादिवशी मला मनातून वाटलं की, जिजाईमध्ये थोडं थांबायला हवं.  मग दादांच्या आणखी दोन बैठका होईपर्यंत थांबलो. त्यानंतर ते 26 जानेवारीच्या प्रजासत्ताक दिनाच्या परेडसाठी निघत होते.  तेव्हा मी दादांना सहज बोललो, मी येऊ का तुमच्यासोबत, ते म्हणाले तू काय करणार माझ्याबरोबर येऊन? मी त्यांच्यासोबत पोलीस ग्राऊंडवर गेलो, दादांची परेड बघितली, भाषण ऐकले. त्यानंतर आम्ही दोघं जिजाईला परत आलो. जिल्हा परिषद निवडणुका असल्यामुळे तेव्हा जिजाईवर भरपूर गर्दी होती. चार-पाच वाजताच्या सुमारास मी बंगल्याच्या हॉलमध्ये गेलो आणि म्हणालो, चार-पाच वाजता हॉलमध्ये गेलो, म्हणालो, डॅड बास ना आता तुम्ही किती काम करणार, किती कष्ट घेणार? तेव्हा दादा बोलले, जयड्या ही शेवटची निवडणूक आहे. याच्यानंतर आपण सर्व सुट्टीवर जाऊ. पण तो दिवस नाही आलाच नाही, असे जय पवार यांनी म्हटले.

Comments are closed.