हे मंदिरच इथे ठेवू नका, हे पाडून टाका, यामध्ये नकारात्मक ऊर्जा ; खरातची विकृत खेळी, पुरातन शिवम

नाशिक: नाशिकचा भोंदू बाबा अशोक खरात (Ashok Kharat) याच्या अघोरी कृत्यांचा आणि फसवणुकीचा आणखी एक धक्कादायक प्रकार समोर आला आहे. एबीपी माझाच्या प्रतिनिधींनी खरातच्या मूळ वावी गावाला भेट दिली असता, तिथल्या पुरातन शिवमंदिराबाबत त्याने केलेला धक्कादायक प्रकार उघड झाला आहे. वावी गावात १२ व्या शतकातील यादवकालीन पुरातन शिवमंदिर आहे. या मंदिराच्या जिर्णोद्धारासाठी ग्रामस्थांनी खरातला आमंत्रित केले होते. मात्र, खरातने हे मंदिर पाडून टाकण्याचा अजब सल्ला दिला. “हे मंदिरच इथे ठेवू नका, हे पाडून टाका आणि यातले देवही ठेवू नका,” असे त्याने ग्रामस्थांना सांगितले. खरातने मंदिरातील शिवलिंगाकडे पाय करून उभे राहून “यात आता ऊर्जा शिल्लक राहिलेली नाही” अशी बतावणी केली. या मंदिरात ‘५० टक्के नकारात्मक ऊर्जा’ असल्याचे सांगून त्याने ग्रामस्थांच्या धार्मिक भावना दुखावल्या. (Ashok Kharat)

मोबाईल ॲपद्वारे फसवणूक

लोकांचा विश्वास संपादन करण्यासाठी खरात एका फेक मोबाईल ॲपचा वापर करत असे. हे ॲप एखाद्या वस्तूचा कालखंड किंवा त्यातील ‘एनर्जी’ मोजत असल्याचा आभास निर्माण करायचे. अलेक्सा (Alexa) सारख्या कमांड्स देऊन तो लोकांना दिशाभूल करत असे. खरातने मिरगाव येथे स्वतःचे ‘ईशान्येश्वर मंदिर’ बांधले होते. लोकांनी वावीच्या पुरातन मंदिराकडे न जाता स्वतःच्या मंदिराकडे यावे, या व्यावसायिक हेतूने त्याने या पुरातन मंदिराला नाव ठेवले, असा आरोप ग्रामस्थांनी केला आहे. सुदैवाने, गावातील तरुणांच्या ही भोंदुगिरी लक्षात आली आणि त्यांनी खरातचे सॉफ्टवेअर कसे ‘फेक’ आहे, हे शोधून काढले. “देवाची काठी चालली आहे, खरातचे जे काही रसातळाला गेले आहे तो या देवाचाच फटका आहे,” अशी भावना पुजाऱ्यांनी आणि ग्रामस्थांनी व्यक्त केली. (Ashok Kharat)

पुरातन वारसा नष्ट करण्याचा घाट

नाशिक जिल्ह्यातील वावी गावात १२ व्या शतकातील यादवकालीन पुरातन शिवमंदिर आहे. हे मंदिर काशी विश्वेश्वराचे स्थान मानले जाते आणि प्रभू रामचंद्रांचे येथून गमन झाले होते, अशी श्रद्धा आहे. सुमारे एक वर्षापूर्वी ग्रामस्थांनी या मंदिराच्या जिर्णोद्धारासाठी अशोक खरातला मार्गदर्शनासाठी आमंत्रित केले होते. मात्र, त्याने हे मंदिर दुरुस्त करण्याऐवजी चक्क पाडून टाकण्याचा सल्ला दिला, मात्र गावकऱ्यांनी याकडे लक्ष दिलं नाही.

गावकऱ्यांचा विश्वास बसावा यासाठी खरात एका विशिष्ट मोबाईल ॲपचा (ज्याला तो ‘जग्गो’ किंवा अलेक्सासारखे कमांड देणारा म्हणायचा) वापर करायचा. या ॲपद्वारे त्याने मंदिरातील दगड किंवा खांबांची ‘एनर्जी’ मोजत असल्याचा बनाव केला. “या मंदिरातून ऊर्जा निघून गेली आहे, येथे उणे ५० टक्के (-५०%) ऊर्जा आहे,” अशी खोटी माहिती त्याने ग्रामस्थांना दिली. स्वतःला मोठा आध्यात्मिक गुरू म्हणवून घेणाऱ्या खरातने मंदिरात शिवलिंगाकडे पाय करून उभे राहून देवतेचा अवमान केला. “येथे आता देव राहिलेला नाही, त्यामुळे तुम्ही येथे दर्शन घेऊ नका आणि हे मंदिर जमिनीदोस्त करा,” असे सांगून त्याने लोकांच्या पिढ्यानपिढ्यांच्या श्रद्धेवर घाला घातला. खरातने मिरगाव येथे स्वतःचे ‘शिवनिका’ (ईशान्येश्वर) मंदिर उभारले होते. वावीच्या पुरातन आणि ऐतिहासिक मंदिराचे महत्त्व कमी करून भाविकांचा ओघ स्वतःच्या मंदिराकडे वळवण्यासाठी त्याने हा सर्व बनाव रचला होता, असे आता उघड झाले आहे.

तरुणांच्या सतर्कतेमुळे भोंदुगिरी उघड

खरातच्या सांगण्यानुसार मंदिर पाडण्यास काही ज्येष्ठ लोक तयार झाले होते, मात्र गावातील सुशिक्षित तरुणांच्या लक्षात त्याची ही ‘डिजिटल भोंदुगिरी’ आली. अशा प्रकारचे फेक ॲप्स उपलब्ध आहेत हे मुलांनी सिद्ध केले आणि खरातचा खोटेपणा उघडकीस आणला. त्यामुळे हे ऐतिहासिक मंदिर वाचले. “मोठा माणूस आणि मोठे संबंध असल्याने त्यावेळी आम्ही गप्प बसलो होतो, पण आमचा पारा ११० वर गेला होता,” अशा शब्दांत मंदिराच्या पुजाऱ्यांनी आपला संताप व्यक्त केला.

आणखी वाचा

Comments are closed.