नाशिकवर ढगफुटीचं संकट ओढावलं, रात्री 11 वाजता गिरीश महाजन थेट मैदानात; रात्रीच्या काळोखात 100 ह
नाशिक पाऊस गिरीश महाजन: नाशिक (Nashik) जिल्ह्यासह पालघर आणि वसई-विरार परिसरात पावसाने रौद्ररूप धारण केले आहे. हवामान विभागाने नाशिक जिल्ह्यातील त्र्यंबकेश्वर (Trimbakeshwar), नाशिक आणि इगतपुरी तालुक्यांना ‘हाय अलर्ट’ जारी केल्यानंतर, आपत्ती व्यवस्थापन मंत्री गिरीश महाजन (Girish Mahajan) स्वतः रात्री मैदानात उतरले. परिस्थितीचे गांभीर्य ओळखून मंत्री महाजन यांनी रात्री 11 वाजता त्र्यंबकेश्वर गाठले आणि रात्री 12 वाजताच्या सुमारास दुर्गम अशा मेटघर गावाची प्रत्यक्ष पाहणी केली.
Nashik Rain Girish Mahajan: मध्यरात्री 100 हून अधिक नागरिकांचे तातडीने स्थलांतर
इगतपुरी आणि घोटी परिसराची पाहणी केल्यानंतर मंत्री गिरीश महाजन त्र्यंबकेश्वर तालुक्यातील मेटघर गावात पोहोचले. रात्रीच्या वेळी सोसाट्याचा वारा आणि मुसळधार पावसाचा जोर प्रचंड वाढला होता. संभाव्य जीवितहानी टाळण्यासाठी मंत्री महाजन यांनी तातडीने निर्णय घेत, येथील 27 कुटुंबांतील तब्बल 100 हून अधिक नागरिकांना तातडीने सुरक्षित स्थळी हलवण्याचे आदेश प्रशासनाला दिले.
Nashik Rain Girish Mahajan: वसई-विरार, पालघरमध्येही पावसाचा कहर
केवळ नाशिकच नव्हे, तर वसई-विरार आणि पालघर (Palghar) जिल्ह्याचाही मंत्री महाजन यांनी आढावा घेतला. या संपूर्ण पट्ट्यात 350 ते 400 मिलीमीटर इतक्या उच्चांकी पावसाची नोंद झाली आहे. दरम्यान, पालघरमधील एका धरणाचे पिचिंग काही प्रमाणात सरकल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. धरण क्षेत्रातील या धोक्यामुळे प्रशासनाची चांगलीच तारांबळ उडाली. खबरदारीचा उपाय म्हणून धरणाभोवती राहणाऱ्या सुमारे 1 हजार नागरिकांना तातडीने सुरक्षित स्थळी हलविण्यात आले आहे. सध्या संपूर्ण आपत्ती व्यवस्थापन यंत्रणा हायअलर्टवर असून नागरिकांनी घाबरून न जाता प्रशासनाला सहकार्य करावे, असे आवाहन प्रशासनाने केले आहे.
Nashik Rain: नाशिक मध्ये सकाळपासून पावसाची काहीशी विश्रांती
दरम्यान, नाशिकमध्ये सकाळी सात वाजेनंतर पावसाने काहीशी विश्रांती घेतल्याच पाहायला मिळत आहे. नाशिकमध्ये त्र्यंबकेश्वर, इगतपुरी, पेठ या भागांमध्ये पावसाची संततधार सुरू असल्याने नाशिकमधील गोदावरी नदी देखील दुथडी भरून वाहत आहे. पावसाचा जोर दिवसभरात वाढण्याची शक्यता असून नदीकाठच्या नागरिकांना सतर्क राहण्याच्या सूचना प्रशासनाकडून देण्यात आले आहे. आपत्ती व्यवस्थापन विभाग देखील पावसाचा अंदाज घेऊन सर्व विभागांना अलर्ट मोडवर राहण्याच्या सूचना देत आहे.
Godavari Flood: गोदावरी नदीच्या पाणी पातळीत वाढ
नाशिकमध्ये रात्रभर सुरू असलेल्या पावसामुळे नाशिकच्या गोदावरी नदीची पाणी पातळी देखील वाढल्याचं पाहायला मिळत आहे. रामकुंड आणि गांधी तलाव हा संपूर्ण पाण्याखाली गेल्याचे चित्र पाहायला मिळत असून सकाळच्या वेळी धार्मिक विधींसाठी येणारे पर्यटक हे आपला जीव धोक्यात घालून या ठिकाणी पूजा विधी करताना पाहायला मिळत आहे. प्रशासनाकडून वारंवार आवाहन करून देखील पर्यटक आपला जीव धोक्यात घालत असल्याचे दिसून आले आहे.
Saptashrungi Gad: सप्तशृंगगड परिसरात 7, 8 आणि 9 जुलैपर्यंत प्रवेशबंदी
हवामान खात्याने जाहीर केल्यानुसार नाशिक जिल्ह्यातील अतिवृष्टी, दरड कोसळण्याचा धोका आणि संभाव्य दुर्घटना टाळण्यासाठी प्रशासनाने मोठा निर्णय घेतला आहे. आपत्ती व्यवस्थापन अधिनियम 2005 अंतर्गत सहायक जिल्हाधिकारी तथा उपविभागीय दंडाधिकारी, कळवण यांनी 7, 8 आणि 9 जुलै 2026 या कालावधीत श्री सप्तशृंगगड धार्मिक स्थळ, धबधबे, ट्रेकिंग पॉइंट्स, नदीकाठ तसेच पर्यटनस्थळांवरील प्रवेशास बंदीचे आदेश जारी केले आहेत.
Ahilyanagar Rain: भंडारदरा परिसरातील सर्व धोकादायक पर्यटनस्थळे पर्यटकांसाठी बंद
नाशिक जिल्ह्याला रेड अलर्ट जारी करण्यात आल्याने नगर-नाशिक सीमेवरील भंडारदरा परिसरातील धोकादायक पर्यटनस्थळे पुढील आदेशापर्यंत पर्यटकांसाठी बंद करण्यात आली आहेत. सततचा मुसळधार पाऊस आणि हवामान विभागाच्या इशाऱ्याच्या पार्श्वभूमीवर वनविभागाने हा निर्णय घेतला आहे. सांदन व्हॅली, कोकणकडा, रतनगड, अलंग, मदन, कुलंग, कळसूबाई शिखर तसेच रिव्हर्स वॉटरफॉलसह सर्व पर्यटन उपक्रमांवर तात्पुरती बंदी घालण्यात आली आहे. पर्यटकांनी आदेशाचे काटेकोर पालन करून भंडारदरा परिसरात जाणे टाळावे, असे आवाहन वनविभागाने केले आहे.
आणखी वाचा
Comments are closed.