BCCI कडून टीम इंडियाचं संपूर्ण वेळापत्रक जाहीर, विराट-रोहित कधी आणि कुठे मैदानात दिसणार?

BCCI ने टीम इंडियाच्या सामन्यांचे वेळापत्रक जाहीर केले: भारतीय क्रिकेट नियामक मंडळाने (BCCI) टीम इंडियाच्या आगामी घरच्या हंगामाचे वेळापत्रक जाहीर केले आहे. गुरुवारी जाहीर झालेल्या या शेड्यूलनुसार 27 सप्टेंबरपासून सुरू होणारा हा हंगाम पुढील वर्षी 27 फेब्रुवारीपर्यंत चालणार आहे. या काळात भारतीय संघ देशातील 17 शहरांमध्ये एकूण 22 आंतरराष्ट्रीय सामने खेळणार आहे. वेस्ट इंडिज (West Indies), श्रीलंका (Sri Lanka), झिम्बाब्वे (Zimbabwe) आणि ऑस्ट्रेलिया (Australia) या संघांचे भारत दौरे होणार आहेत. या सहा महिन्यांच्या कालावधीत भारत या संघांविरुद्ध 5 कसोटी, 9 एकदिवसीय (ODI) आणि 8 टी-20 सामने खेळणार आहे.

वनडेमध्ये दिसणार रोहित शर्मा आणि विराट कोहली

कसोटी आणि टी-20 फॉरमॅटमधून निवृत्ती जाहीर केलेले भारताचे माजी कर्णधार रोहित शर्मा (Rohit Sharma) आणि विराट कोहली (Virat Kohli) हे या हंगामात घरच्या मैदानावर 9 वनडे सामने खेळताना दिसू शकतात. दोन्ही दिग्गज आता 2027 च्या वर्ल्ड कपच्या तयारीसाठी फक्त वनडे क्रिकेटवर लक्ष केंद्रित करत आहेत.

गुवाहाटी स्टेडियमवर पुन्हा होणार कसोटी सामना

गेल्या नोव्हेंबरमध्ये दक्षिण आफ्रिकेविरुद्ध कसोटी सामन्याचे यशस्वी आयोजन केल्यानंतर गुवाहाटीच्या बारसपारा स्टेडियमला पुन्हा एकदा मोठी संधी मिळाली आहे. 2027 मध्ये होणाऱ्या बॉर्डर गावसकर ट्रॉफी मधील पाच कसोटींपैकी एका सामन्याचे आयोजन येथे होणार आहे. या मालिकेसाठी नागपूरचेन्नई, रांची आणि अहमदाबाद या शहरांनाही बीसीसीआयच्या रोटेशन पॉलिसीनुसार संधी देण्यात आली आहे.

24 वर्षांनंतर झिम्बाब्वेचा भारत दौरा

या घरच्या हंगामातील आणखी एक मोठे आकर्षण म्हणजे झिम्बाब्वेचा दौरा. तब्बल 24 वर्षांनंतर झिम्बाब्वेची टीम भारतात द्विपक्षीय मालिका खेळणार आहे. 2002 मध्ये शेवटचा दौरा झाला होता, तेव्हा भारतीय संघाचे नेतृत्व सौरव गांगुली करत होते. जानेवारी 2027 मध्ये तीन सामन्यांची वनडे मालिका खेळवली जाईल. हे सामने कोलकाता (3 जानेवारी), हैदराबाद (6 जानेवारी) आणि मुंबई (9 जानेवारी) येथे होणार आहेत.

मुंबई-कोलकात्याचा कसोटीतील ‘वेटिंग’ कायम

ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या पाच कसोटी सामन्यांच्या मालिकेसाठी जाहीर झालेल्या स्थळांमध्ये कोलकात्याचे ईडन गार्डन्स आणि मुंबईचे वानखेडे स्टेडियम यांचा समावेश नाही. कोलकात्यात भारत-ऑस्ट्रेलिया यांच्यातील शेवटचा कसोटी सामना 2001 साली झाला होता, ज्यात भारताने फॉलोऑननंतर ऐतिहासिक विजय मिळवला होता. त्यानंतर ऑस्ट्रेलिया अनेकदा भारतात आली, पण ईडन गार्डन्सला कसोटीची संधी मिळाली नाही. मुंबईतही भारत-ऑस्ट्रेलिया यांच्यातील शेवटचा कसोटी सामना 2004 मध्ये झाला होता. त्यामुळे या दोन ऐतिहासिक मैदानांवरील प्रतीक्षा अजूनही संपलेली नाही.

हे ही वाचा –

मुंबईच्या पोरांचा रुबाब यंदाही दिसणार… ‘या’ दिवशी रंगणार MI vs CSK हाय-व्होल्टेज मॅच! Mumbai Indians च्या IPL 2026 सामन्याचं संपूर्ण Schedule एकाच क्लिकवर

आणखी वाचा

Comments are closed.