एटीएसच्या कारवाईत धक्कादायक बाबी समोर! आक्षेपार्ह कागदपत्रांसह इलेक्ट्रॉनिक उपकरणे जप्त

गुन्हे बातम्या: रविवारी झालेल्या एटीएसच्या कारवाईत अनेक धक्कादायक बाबी समोर येत आहे. महाराष्ट्र एटीएसने तीन दिवसांपूर्वी पुसद (जि. यवतमाळ) आणि अहिल्यानगर जिल्ह्यातील तब्बल 21 ठिकाणी सर्च ऑपरेशन राबवले होते. एटीएसच्या सूत्रांच्या माहितीनुसार, या सर्च ऑपरेशनदरम्यान पुसद येथे राहणाऱ्या काही मुस्लिम युवकांचे मोठ्या प्रमाणावर रॅडिकलायझेशन (कट्टरपंथी विचारांकडे वळवणे) केले जात असल्याची माहिती समोर आली आहे.

फुटबॉल खेळणाऱ्या किंवा फुटबॉलप्रेमी मुलांना टार्गेट केले जात होते

मिळालेल्या माहितीनुसार, तपासात असेही उघड झाले आहे की, फुटबॉल खेळणाऱ्या किंवा फुटबॉलप्रेमी मुलांना विशेषतः टार्गेट केले जात होते. पुसद परिसरात मोठ्या संख्येने मुस्लिम मुले फुटबॉलकडे आकर्षित असून तेथे अनेक फुटबॉल क्लबही कार्यरत आहेत.एटीएसच्या प्राथमिक चौकशीत असेही समोर आले आहे की, काही युवकांना रॅडिकलायझेशनसाठी महाराष्ट्राबाहेरही पाठवण्यात आले होते. दरम्यान, या प्रकरणी अद्याप कोणताही अधिकृत गुन्हा नोंदवलेला नसल्याची माहिती आहे. छाप्यादरम्यान एटीएसने तलवारी, इलेक्ट्रॉनिक उपकरणे आणि काही आक्षेपार्ह कागदपत्रे जप्त केली आहेत. तसेच विविध ठिकाणांवरील सीसीटीव्ही फुटेज जप्त करून त्यांची सखोल तपासणी सुरू आहे. सर्च ऑपरेशनदरम्यान पुसद येथे राहणाऱ्या काही मुस्लिम युवकांचे मोठ्या प्रमाणावर रॅडिकलायझेशन (कट्टरपंथी विचारांकडे वळवणे) केले जात असल्याची माहिती समोर आली आहे.

कारवाईत अनेक संशयितांना ताब्यात घेतलं आहे

या कारवाईत अद्याप कोणालाही अधिकृतपणे अटक करण्यात आलेली नाही. मात्र, प्राथमिक चौकशीसाठी 12 पेक्षा जास्त संशयितांना ताब्यात घेण्यात आले आहे. ताब्यात घेतलेल्या व्यक्तींचे देशविरोधी संघटनांशी काही संबंध आहेत का, याचा कसून तपास एटीएस करत आहे. महाशिवरात्रीच्या मुहूर्तावर संपूर्ण देशात धार्मिक उत्सवांचे वातावरण असताना, सुरक्षा यंत्रणांनी सतर्क राहून ही मोठी कारवाई केल्याने राज्याच्या सुरक्षेचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे. गेल्या काही महिन्यांपासून महाराष्ट्र एटीएसने अल-कायदा आणि इतर प्रतिबंधित संघटनांशी संबंधित असलेल्या नेटवर्कवर लक्ष केंद्रित केले आहे. राज्यातील तरुणांना ऑनलाईन माध्यमातून कट्टरपंथी बनवण्याचे प्रयत्न होत असल्याची माहिती यंत्रणांना मिळाली होती. याच पार्श्वभूमीवर ही 21 ठिकाणची छापेमारी अत्यंत महत्त्वाची मानली जात आहे. तपास अधिकारी सध्या जप्त केलेल्या तांत्रिक पुराव्यांचे विश्लेषण करत असून, यातून मोठे रॅकेट उघड होण्याची शक्यता आहे. या छापेमारीत एटीएसच्या हाती महत्त्वाचे पुरावे लागले आहेत. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, संशयितांच्या ठिकाणांहून अनेक आक्षेपार्ह कागदपत्रे, मोबाईल फोन, लॅपटॉप आणि इतर इलेक्ट्रॉनिक गॅझेट्स जप्त करण्यात आली आहेत.

आणखी वाचा

Comments are closed.