ओबीसी आरक्षणाच्या विवंचनेतून दुसरा बळी, मुलाच्या नोकरीची चिंता, धाराशिवमध्ये 55 वर्षीय शेतकऱ्य

धारशिव: धाराशिव जिल्ह्यातील वाशी तालुक्यातील सारोळा मांडवा गावात 55 वर्षीय शेतकऱ्याने गळफास घेऊन आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. मयत शेतकऱ्याचे नाव माणिकराव डोईफोडे असे असून, ओबीसी आरक्षण जाणार या विवंचनेतून त्यांनी आत्महत्या केली असल्याचा दावा त्यांच्या नातेवाईकांनी केला आहे.

राज्यात गेल्या काही दिवसांपासून मराठा आणि ओबीसी आरक्षणावरून वातावरण तापलेले असताना धाराशिवमध्ये 55 वर्षीय व्यक्तीने आत्महत्या केल्याची घटना घडलीय.  नुकतीच बीडमध्ये ओबीसी आरक्षणाच्या अनिश्चिततेमुळे एका हतबल बापाने आपल्या मुलीच्या नोकरीचे कसे? या  विवंचनेतून आत्महत्या केल्याची घटना ताजी असतानाच धाराशिवमध्ये तशीच घटना घडल्याने खळबळ उडाली आहे. ओबीसी आरक्षणावरील घडामोडी पाहता मुलाला नोकरी कशी मिळेल? याबाबत ते सतत चिंताग्रस्त होते. अशी माहिती त्यांच्या कुटुंबीयांनी दिली.

नेमके घडले काय?

माणिकराव डोईफोडे यांचा मुलगा पुण्यात उच्चशिक्षण घेत आहे. मात्र राज्यात सुरू असलेल्या ओबीसी आरक्षणावरील घडामोडी पाहता मुलाला नोकरी कशी मिळेल, याबाबत ते सतत चिंताग्रस्त होते. घरची हालाखीची परिस्थिती, मुलांच्या शिक्षणाचा वाढता खर्च आणि शेतीतून अपेक्षित उत्पन्न न मिळाल्यामुळे त्यांच्यावर आर्थिक संकट ओढावले होते. याच विवंचनेतून त्यांनी आयुष्य संपवण्याचा मार्ग स्वीकारला, अशी माहिती त्यांच्या कुटुंबीयांनी दिली आहे. माणिकराव डोईफोडे यांच्या नावावर कोरडवाहू शेती होती. मात्र गेल्या काही वर्षांत पाऊस अनियमित असल्याने त्यांना शेतीतून फारसं उत्पन्न मिळालं नाही. शिक्षणासाठी आणि घरखर्चासाठी कर्जाचा डोंगर वाढला होता. त्यातच आरक्षणाबाबत अनिश्चितता निर्माण झाल्याने त्यांची चिंता आणखी वाढली. ही घटना घडताच वाशी पोलिसांनी घटनास्थळाचा पंचनामा केला आहे. शवविच्छेदनासाठी मृतदेह जिल्हा रुग्णालयात पाठवण्यात आला असून पुढील तपास सुरू आहे. पोलिसांनी सांगितले की, नातेवाईकांचा जबाब नोंदवला आहे.

ओबीसी आरक्षण अन् मुलींच्या नोकरीची चिंता असह्य

राज्यभरात मराठा आणि ओबीसी आरक्षणावरून आक्रमक वातावरण पाहायला मिळत असताना बीड तालुक्यातील नाथापुर गावात गोरख नारायण देवडकर या 50 वर्षीय व्यक्तीने आत्महत्या केली आहे. ओबीसी आरक्षण जात असल्याच्या विवंचनेतून  या व्यक्तीने आत्महत्येचं पाऊल उचलल्याचं त्यांच्या कुटुंबाने सांगितले. गोरख देवडकर यांना पाच मुली असून दोन मुली पोलीस भरतीची तयारी करत आहेत. मात्र सध्या राज्यातील आरक्षणाची स्थिती पाहता मुलीच्या शिक्षणाचे कसे होईल? असा प्रश्न त्यांना सतावत होता. याच विवंचनेतून त्यांनी आत्महत्या केली. जिल्हा रुग्णालयात देवडकर यांचा मृतदेहाचे शवविच्छेदन सुरू असून राज्य सरकारने आमच्या कुटुंबाचा विचार करावा अशी मागणी पीडित कुटुंबाने केली आहे.

आणखी वाचा

Comments are closed.