दिनेश त्रिवेदी, बांगलादेशातील भारताचे उच्चायुक्त
पश्चिम बंगाल निवडणुकीपूर्वी भाजपची मोठी खेळी
वृत्तसंस्था/ नवी दिल्ली
भारत सरकारने दिनेश त्रिवेदी यांची बांगलादेशात नवे उच्चायुक्त म्हणून नियुक्ती केली आहे. भारत आणि बांगलादेश अनेक महत्त्वाच्या मुद्यांवर चर्चा करत असताना हा निर्णय घेण्यात आला आहे. सध्या दोन्ही देश संतुलित व मजबूत संबंध टिकवून ठेवण्याचा प्रयत्न करत आहेत. माजी केंद्रीय रेल्वेमंत्री आणि भाजपचे ज्येष्ठ नेते दिनेश त्रिवेदी यांची ही नियुक्ती राजकीयदृष्ट्याही महत्त्वपूर्ण मानली जात आहे. विशेषत: पश्चिम बंगालचे राजकारण पाहता, भाजपने उचललेले हे एक धोरणात्मक पाऊल मानले जात आहे. कारण याचा आगामी निवडणुकीच्या समीकरणांवर परिणाम होऊ शकतो.
दिनेश त्रिवेदी यांच्या राजकीय कारकिर्दीत अनेक महत्त्वपूर्ण वळणे आली आहेत. भाजपमध्ये सामील होण्यापूर्वी ते तृणमूल काँग्रेसचे एक प्रमुख नेते होते. त्यांनी संयुक्त पुरोगामी आघाडी सरकारमध्ये असताना रेल्वेमंत्री म्हणून काम पाहिले होते. तथापि, नंतर त्यांनी तृणमूल काँग्रेसपासून फारकत घेत 2021 मध्ये भाजपमध्ये प्रवेश केला होता.
दिनेश त्रिवेदी आता बांगलादेशातील भारताचे उच्चायुक्त म्हणून प्रणय वर्मा यांची जागा घेतील. वर्मा यांची आता ब्रुसेल्स येथे बदली होत असून ते युरोपियन युनियनमधील भारताचे राजदूत म्हणून काम पाहतील. हा बदल भारताच्या राजनैतिक धोरणाचा एक भाग मानला जात आहे.
दिनेश त्रिवेदी यांचा अनुभव
4 जून 1950 रोजी जन्मलेले दिनेश त्रिवेदी 2009 ते 2019 या काळात पश्चिम बंगालमधील बॅरकपूर लोकसभा मतदारसंघातून खासदार होते. त्यांनी 1990-96 आणि 2002-08 या काळात राज्यसभा खासदार म्हणूनही काम केले. त्यांचा राजकीय अनुभव आणि प्रशासकीय कौशल्य आता बांगलादेशमध्ये भारताचे प्रतिनिधी म्हणून महत्त्वाची भूमिका बजावू शकते.
Comments are closed.