उत्तराखंडमध्ये मुसळधार पाऊस; बिहारमध्ये पुराचा धोका
उत्तर प्रदेशसह 19 राज्यांमध्ये पाऊस-वाऱ्याचा इशारा जारी
वृत्तसंस्था/नवी दिल्ली
देशभरात मान्सूनचा प्रभाव अधिक तीव्र होत आहे. हवामान विभागाने 3 सप्टेंबर रोजी उत्तर प्रदेश आणि बिहारसह 19 राज्यांमध्ये मुसळधार पाऊस आणि वादळाचा इशारा दिला आहे. या काळात अनेक भागांमध्ये सोसाट्याचा वारा अपेक्षित आहे. काही ठिकाणी वाऱ्याचा वेग ताशी 65 किलोमीटरपर्यंत पोहोचण्याची शक्यता आहे. सोसाट्याच्या वाऱ्यामुळे झाडे आणि विजेचे खांब पडण्याचाही धोका आहे. उत्तराखंडमध्ये गेल्या तीन दिवसांपासून संततधार पाऊस पडत आहे. मंगळवारी पावसामुळे झालेल्या वेगवेगळ्या घटनांमध्ये 12 जणांचा मृत्यू झाला. नैनिताल तलावातील पाण्याची पातळी 88 फुटांच्या वर गेल्याने कालवे उघडण्यात आले. राज्यात 172 रस्ते बंद आहेत. बुधवारी नैनिताल, बागेश्वर आणि देहराडूनसाठी ऑरेंज अलर्ट जारी करण्यात आला आहे. पाच जिह्यांतील शाळा आणि अंगणवाडी केंद्रे बंद ठेवण्यात आली आहेत. दरम्यान, बिहारमध्ये पुराचा धोका वाढला आहे.
गंगा आणि पुनपुनसह अनेक नद्या धोक्याच्या पातळीच्या वर वाहत आहेत. पाटणामध्ये बुधवारी सकाळपासून मुसळधार पावसामुळे शहरातील अनेक भाग पाण्याखाली गेले. भागलपूरमधील 100 वर्षे जुने दुर्गा मंदिर भूस्खलनामुळे गंगेत वाहून गेले. दमदार पावसामुळे पर्वतीय राज्यांमध्ये भूस्खलनाची शक्यता आहे. दरम्यान, पूर्व भारतातील अनेक भागांमध्ये विजांचा कडकडाट आणि वादळाचा इशारा देण्यात आला आहे. समुद्रातील खवळलेल्या लाटांमुळे मच्छिमारांना किनारपट्टीच्या भागांपासून दूर राहून सुरक्षित ठिकाणी जाण्याचा सल्ला देण्यात आला आहे. हवामान विभागाच्या मते, बंगालच्या उपसागरातून येणाऱ्या वाऱ्यांमुळे पावसाचा जोर वाढू शकतो. पाचपेक्षा जास्त राज्यांमध्ये गारपिटीची शक्यता आहे. पुढील 24 तासांत दक्षिण उत्तर प्रदेश आणि उत्तर मध्य प्रदेशवर चक्रीवादळ तयार होण्याची शक्यता आहे. याशिवाय पश्चिम बंगाल, उत्तर किनारपट्टीवरील ओडिशा आणि झारखंडमध्येही चक्रीवादळी स्थिती निर्माण होण्याची चिन्हे आहेत.
उत्तर प्रदेशातही दमदार पाऊस
उत्तर प्रदेशातील सीतापूरमध्ये मुसळधार पावसामुळे भिंत कोसळून दोन जणांचा मृत्यू झाला. गाझीपूरमध्ये गंगेत स्नान करत असताना दोन अल्पवयीन मुले वाहून गेली. उन्नावमध्ये पावसामुळे गंगा एक्सप्रेसवेवर सुमारे 7 फूट खोल ख•ा पडला आहे. या पावसाळ्यात गंगा एक्स्प्रेस-वे कोसळण्याची ही दुसरी घटना आहे. दरम्यान, बलियामध्ये पुरामुळे सुमारे 20,000 लोकांना फटका बसला आहे. पूर्व मध्य प्रदेशात जोरदार मान्सून प्रणाली सक्रिय झाली आहे. जबलपूर, रेवा, शहडोल आणि सागर विभागांमध्ये मुसळधार पाऊस पडत आहे. चित्रकूटमधील मंदाकिनी नदी धोक्याच्या पातळीच्या वर गेली आहे. रामघाट येथील सुमारे 400 दुकाने आणि 20-25 हॉटेल्स पाण्याखाली गेली आहेत. सतनामध्ये 3 सप्टेंबर रोजी शाळा, महाविद्यालये आणि अंगणवाडी केंद्रे बंद ठेवण्याचे आदेश जारी करण्यात आले आहेत.
Comments are closed.