पहिल्याच चेंडूवर पाकिस्तानला आधी डिवचलं, मग झाला घात! टी-20 वर्ल्ड कपमध्ये पहिल्याच सामन्यात शे

भारत विरुद्ध पाक महिला T20 विश्वचषक 2026 : महिला टी-20 वर्ल्ड कप 2026 मधील हायव्होल्टेज सामन्याला सुरुवात झाली आहे. क्रिकेट जगतातील दोन प्रतिस्पर्धी भारत आणि पाकिस्तानचे महिला संघ बर्मिंगहॅमच्या एजबेस्टन मैदानावर आमनेसामने आले आहेत. या अत्यंत महत्त्वाच्या सामन्यात भारताची कर्णधार हरमनप्रीत कौरने टॉस जिंकून आधी फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. एजबेस्टनची खेळपट्टी फलंदाजीसाठी पूरक असल्याचा अंदाज हरमनप्रीतने वर्तवला होता. मात्र, सामन्याच्या पहिल्याच ओव्हरमध्ये भारतीय संघाला आणि चाहत्यांना मोठा धक्का बसला. पहिल्याच चेंडूवर षटकार ठोकून खणखणीत सुरुवात करणारी शेफाली पुढच्याच काही चेंडूंमध्ये बाद होऊन माघारी परतली.

पहिल्याच चेंडूवर सिक्स, अन्…

भारतीय डावाची सुरुवात करण्यासाठी शेफाली वर्मा आणि उपकर्णधार स्मृती मानधना ही जोडगोळी मैदानात उतरली होती. पाकिस्तानकडून डावाचे पहिले ओव्हर टाकण्याची जबाबदारी डावखुरी फिरकीपटू सादिया इक्बालकडे होती. सादियाच्या पहिल्याच चेंडूवर शेफाली वर्माने आपल्या नेहमीच्या आक्रमक शैलीत लॉंग-ऑफच्या दिशेने एक गगनचुंबी षटकार ठोकला. भारताला धडाकेबाज सुरुवात मिळणार असेच वाटत होते.

परंतु, हा आनंद फार काळ टिकू शकला नाही. पहिल्या चेंडूवर षटकार खाल्ल्यानंतर पाकिस्तानच्या सादिया इक्बालने कमबॅक केले. तिने पुढचे सलग तीन चेंडू अतिशय अचूक टाकत शफालीला शांत ठेवले. ओव्हरच्या पाचव्या चेंडूवर शेफालीने क्रीझमध्ये स्वतःसाठी जागा बनवून पुन्हा एकदा मोठा शॉट खेळण्याचा प्रयत्न केला. मात्र, सादियाने चेंडूची गती कमी केली होती. शेफालीच्या बॅटची बाहेरील कट घेऊन चेंडू थेट विकेटकीपर मुनीबा अलीच्या हातात गेला. मुनीबाने कोणतीही चूक न करता सोपा झेल टिपला. 5 चेंडूत 6 धावा करून शेफाली तंबूत परतली.

जेमिमा रॉड्रिग्जही अपयशी, स्मृती अन् हरमनप्रीतने सावरला डाव

शेफाली बाद झाल्यानंतर मैदानात आलेल्या जेमिमा रॉड्रिग्जलाही आज विशेष काही करता आले नाही. ती अत्यंत संथ खेळली आणि 7 चेंडूंत 1 धाव काढून तस्मिया रुबाबच्या गोलंदाजीवर नतालिया परवेझकडे झेल देऊन बाद झाली. अवघ्या 18 धावांवर भारताचे 2 फलंदाज बाद झाल्यामुळे संघ अडचणीत सापडला होता. दोन झटके लवकर बसल्यानंतर अनुभवी स्मृती मानधना आणि कर्णधार हरमनप्रीत कौर यांनी भारतीय डावाची धुरा आपल्या खांद्यावर घेतली. वृत्त लिहिपर्यंत, भारताने 12 ओव्हर्समध्ये 2 विकेट्स गमावून 85 धावा केल्या आहेत.

हे ही वाचा –

क्रीडा जगताला कलंक! जगप्रसिद्ध क्रिकेटपटूने पत्नीला गोळ्या झाडून संपवलं, कोर्टाचा तो एक निकाल अन् सगळेच हादरले

Comments are closed.