अभिषेक शर्मा पुन्हा फ्लॉप, वैभव सूर्यवंशीनं हरारेचं मैदान गाजवलं,झिम्बाब्वेत वादळी फलंदाजी
हरारे: भारत आणि झिम्बाब्वे यांच्यात हरारे येथे पहिली टी 20 मॅच सुरु आहे. या मॅचमध्ये झिम्बाब्वेनं प्रथम फलंदाजी करताना 7 बाद 125 धावा केल्या. भारतासमोर विजयासाठी 126 धावांचं आव्हान होतं. भारताच्या डावाची सुरुवात खराब झाली. अनुभवी सलामीवीर अभिषेक शर्मा केवळ 1 रन करुन बाद झाला. टीम इंडियाचा बेबी बॉस अशी ओळख मिळालेल्या वैभव सूर्यवंशीनं झिम्बाब्वे विरोधात 18 बॉल 50 धावा केल्या. अर्धशतक झाल्यानंतर वैभव सूर्यवंशी लगेचच बाद झाला.
वैभव सूर्यवंशीचं पहिलं अर्धशतक
वैभव सूर्यवंशीनं इंग्लंड विरोधातील टी 20 मालिकेत आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये पदार्पण केलं होतं. त्या मालिकेत वैभवला मोठी खेळी करता आली नव्हती. मात्र, झिम्बाब्वेमध्ये वैभव सूर्यवंशीनं पुन्हा वादळी फलंदाजी केली आहे. वैभवनं अर्धशतकी खेळीमध्ये 4 षटकार आणि 4 चौकार मारले. अर्धशतक केल्यानंतर वैभव सूर्यवंशी रिचर्ज नगरावा याच्या गोलंदाजीवर बाद झाला. वैभव सूर्यवंशीनं अंडर-19 वर्ल्ड कपमध्ये इंग्लंड विरोधातील फायनलमध्ये हरारेच्या स्टेडियमवरच 175 धावांची खेळी केली होती. वैभव सूर्यवंशींन आजच्या 50 धावांच्या खेळीसह आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधील पहिलं अर्धशतक केलं आहे.
झिम्बाब्वेचं भारतासमोर 125 धावांचं आव्हान
भारताचा कर्णधार श्रेयस अय्यर यानं टॉस जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला होता. झिम्बाब्वेनं प्रथम फलंदाजी करताना 7 बाद 125 धावा केल्या आहेत. युवा गोलंदाज मयंक यादव यानं पहिल्याच बॉलवर झिम्बाब्वेला धक्का दिला. मयंक यादव, अशोक शर्मा, प्रिन्स यादव या तिघांच्या माऱ्यासमोर झिम्बाब्वेचे फलंदाज टिकू शकले नाहीत.
मयंक यादवनं पहिल्याच बॉलवर ब्रायन बेनेट याला बाद केलं. टी 20 मॅचमध्ये पहिल्याच बॉलवर विकेट घेणारा मयंक यादव हा भारताचा चौथा फलंदाज ठरला आहे. भुवनेश्वर कुमार, हार्दिक पांड्या या दोघांनी तीन तीन वेळा अशी कामगिरी केली आहे. अर्शदीप सिंग यानं दोन वेळा पहिल्या बॉलवर विकेट घेतली आहे.
भारताचा वेगवान गोलंदाज अशोक शर्मा यानं आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये पदार्पण केलं आहे. आजच्या मॅचमध्ये अशोक शर्माला एकही विकेट मिळाली नाही. मात्र, त्यानं 4 ओव्हरमध्ये 29 धावा दिल्या. झिम्बाब्वेचा निम्मा संघ 64 धावांवर बाद झाला. वेसली मधेवेरे आणि तादिवानाशे मारुमानी यांच्यातील 57 धावांच्या भागीदारीमुळं झिम्बाब्वेला 100 धावांचा टप्पा पार करता आला.
Comments are closed.