संजूचं वादळ अन् टीम इंडियाने वेस्ट इंडिजचा काढला काटा; भारताची सेमीफायनलमध्ये धडक, कधी अन् कोणा
भारत विरुद्ध वेस्ट इंडिज T20 विश्वचषक 2026 : टी-20 विश्वचषकाच्या सुपर-8 फेरीतील सामन्यात टीम इंडियाने दबावाखाली दमदार कामगिरी करत वेस्ट इंडिजवर 5 विकेट्सने शानदार विजय मिळवला. 196 धावांचं आव्हान समोर असताना क्षणभर सामना विंडीजच्या बाजूने झुकला होता, मात्र संजू सॅमसनच्या तुफानी खेळीने भारताने खेळाचा चेहरामोहराच बदलला. रोमेन पॉवेल आणि जेसन होल्डर यांच्या फटकेबाजीमुळे उभ्या राहिलेल्या 195 धावांच्या भक्कम डोंगरावर भारतीय फलंदाजांनी धडाकेबाज चढाई करत सेमीफायनलचं तिकीट पक्कं केलं. आता 5 मार्चला मुंबईतील वानखेडे स्टेडियमवर इंग्लंडविरुद्ध होणाऱ्या महासंग्रामाकडे संपूर्ण देशाचं लक्ष लागलं आहे.
𝗧𝗵𝗲 𝘁𝗶𝘁𝗹𝗲 𝗱𝗲𝗳𝗲𝗻𝗰𝗲 𝗰𝗼𝗻𝘁𝗶𝗻𝘂𝗲𝗻𝘂𝗲#TeamIndia मध्ये उपांत्य फेरी गाठली आहे #T20WorldCup 👏
अपडेट्स ▶️ https://t.co/ur4pr8Bi3K#मेनइनब्लू | #INDvWI pic.twitter.com/45sjJydel9
— BCCI (@BCCI) 1 मार्च 2026
टीम इंडिया सेमीफायनलमध्ये इंग्लंडशी भिडणार (India vs England Semi-Final T20 World Cup 2026)
वेस्ट इंडिजला पराभूत केल्यानंतर आता टीम इंडियाचा आत्मविश्वास दुणावला आहे. भारताचा सेमीफायनलचा सामना 5 मार्च रोजी मुंबईतील ऐतिहासिक वानखेडे स्टेडियमवर खेळवला जाणार आहे. गतविजेत्या इंग्लंड विरुद्ध भारत हा सामना होणार असल्याने क्रिकेट चाहत्यांमध्ये मोठी उत्सुकता निर्माण झाली आहे.
जेसन होल्डर आणि रोवमॅन पॉवेलचं वादळ
नाणेफेक गमावून प्रथम फलंदाजीस उतरलेल्या संघाला कर्णधार शो होप आणि रोस्टन चेज यांनी सावध पण भक्कम अशी सुरुवात करून दिली. दोघांनी पहिल्या विकेटसाठी 68 धावांची भागीदारी रचत डावाचा पाया मजबूत केला. मात्र, त्यानंतर वरुण चक्रवर्तीने भारताला पहिले यश मिळवून दिले. यानंतर शिमरोन हेटमायरने आक्रमक फलंदाजी करत वेग वाढवण्याचा प्रयत्न केला. पण जसप्रीत बुमराहने 12व्या षटकात सामन्याचे चित्रच पालटले. त्याने एका षटकात दोन महत्त्वाच्या विकेट्स घेत वेस्टइंडीजला मोठे धक्के दिले. पण डावाच्या अखेरीस जेसन होल्डर आणि रोवमॅन पॉवेल यांनी पाचव्या विकेटसाठी 76 धावांची महत्त्वपूर्ण भागीदारी रचत संघाचा डाव 195 धावांपर्यंत पोहोचवला. होल्डरने 22 चेंडूत 2 चौकार आणि 3 षटकारांच्या जोरावर नाबाद 37 धावा केल्या, तर पॉवेलने 19 चेंडूत नाबाद 34 धावा जोडल्या. भारताकडून जसप्रीत बुमराहने 2 विकेट्स घेतल्या, तर हार्दिक पांड्या आणि वरुण चक्रवर्ती यांनी प्रत्येकी 1 यश मिळवले.
अभिषेक शर्मा अन् ईशान किशनचा फ्लॉप शो!
196 धावांच्या लक्ष्याचा पाठलाग करताना संजू सॅमसन आणि अभिषेक शर्मा या जोडीने सावध पण आत्मविश्वासपूर्ण सुरुवात केली. मात्र तिसऱ्या षटकाच्या अखेरच्या चेंडूवर अभिषेक (10 धावा) आऊट झाला. त्यानंतर पाचव्या षटकात ईशान किशनही (10 धावा) तंबुत परतला. दरम्यान, संजू सॅमसनने अवघ्या 26 चेंडूमध्ये अर्धशतक झळकावत संघाला भक्कम स्थितीत नेले. दहाव्या षटकातच भारताची धावसंख्या शंभरीच्या उंबरठ्यावर पोहोचली. 10 षटकांनंतर भारत 98 धावांवर 2 बाद असा मजबूत स्थितीत होता.
मोठा सामना प्रभाव 👊
पाठलाग करताना संजू सॅमसनसाठी अस्खलित 2⃣6⃣-बॉल FIFTY 🫡#TeamIndia 60 चेंडूंत 98 धावा हव्या आहेत.
अपडेट्स ▶️ https://t.co/ur4pr8Bi3K#T20WorldCup | #मेनइनब्लू | #INDvWI | @IamSanjuSamson pic.twitter.com/SZ0E1NRxHZ
— BCCI (@BCCI) 1 मार्च 2026
संजू सॅमसनचं वादळ अन् टीम इंडियाचा विजय
पण, दोघांमधील 58 धावांची भागीदारी 11व्या षटकात संपुष्टात आली, जेव्हा कर्णधार सूर्यकुमार यादव 18 धावा करून बाद झाला. मात्र त्यानंतर तिलक वर्मा आणि संजू सॅमसन यांनी डाव सावरत जबरदस्त भागीदारी उभी केली. दोघांनीही आक्रमक फलंदाजी करत धावफलक वेगाने हलवला. 25 चेंडूत 42 धावांची त्यांची भागीदारी रंगात आली होती, पण 15व्या षटकात तिलक वर्मा बाद झाल्याने ही जोडी तुटली. तिलकने 15 चेंडूत 27 धावांची झंझावाती खेळी केली.
अखेरच्या 5 षटकांत भारताला 50 धावांची गरज होती. मैदानात हार्दिक पांड्या आणि संजू सॅमसन ही जोडी होती. पण 19व्या षटकात हार्दिक पांड्या बाद झाला आणि समीकरण आणखी कठीण बनले. त्या क्षणी भारताला 10 चेंडूत 17 धावा करायच्या होत्या, त्यामुळे सामन्याचा थरार शिगेला पोहोचला. पण संजू सॅमसनने शेवटच्या षटकात टीम इंडियाचा विजय निश्चित केला. संजू सॅमसनच्या 97 धावांच्या स्फोटक खेळीच्या मदतीने 19.2 षटकांत पाच विकेट्सच्या मोबदल्यात 199 धावा केल्या आणि सामना जिंकला.
हे ही वाचा –
आणखी वाचा
Comments are closed.