लाखो रेल्वे प्रवाशांना धक्का, भारतीय रेल्वेकडून प्रवासभाड्यात वाढ, 26 डिसेंबरपासून नवे दर लागू

नवी दिल्ली : भारतीय रेल्वेनं रेल्वे प्रवास भाड्यात वाढ करण्याचा निर्णय घेतला आहे. याबाबतची घोषणा रेल्वे मंत्रालयाकडून आज करण्यात आली आहे. रेल्वेनं नव्य दरांची अंमलबजावणी येत्या  26 डिसेंबरपासून करण्यात येणार असल्याचं म्हटलं. रेल्वेचा खर्च आणि प्रवाशांवरील खर्चाचा भार याचं संतुलन साधण्याचा प्रयत्न करण्यात आल्याचं भारतीय रेल्वेनं म्हटलं.

भारतीय रेल्वेनं उपनगरीय सेवा आणि मासिक सिझन तिकीटाच्या दरात वाढ केलेली नाही. याशिवाय ऑर्डिनरी क्लास म्हणजेच जनरल तिकीटावर प्रवास करणाऱ्यांसाठी 215 किमीपर्यंत कोणतेही दर वाढवण्यात आलेले नाहीत.

Railway Fare Hike : रेल्वे प्रवास भाडेवाढ

जनरल तिकीटाचे दर 215 किमीपासून पुढील अंतरासाठी प्रति किलोमीटर 1 पैसा अशा प्रकारे वाढवण्यात आले आहेत. मेल आणि एक्सप्रेस नॉ एसीसाठी 2 पैसे प्रति किमीची वाढ करण्यात आली आहे. तर, वातानुकुलित डब्यातून प्रवास करणाऱ्या प्रवाशांना प्रति किमी 2 पैसे अधिक मोजावे लागतील.

रेल्वेनं प्रवास भाडेवाढ करताना आर्थिक स्थिती समोर मांडली आहे. प्रवास भाडे वाढवल्यानं रेल्वेला या वर्षात 600 कोटी रुपये मिळणार आहेत. 500 किलोमीटर पर्यंतच्या अंतरात नॉन एसी कोचमधून प्रवास करणाऱ्या प्रवाशांना 10 रुपये अधिक द्यावे लागतील.

गेल्या 10 वर्षात रेल्वेनं नेटवर्क आणि पायाभूत सुविधा वढवल्या आहेत. चांगल्या प्रकारची सेवा देण्यासाठी आणि सुरक्षा वाढवण्यासाठी मनुष्यबळ वाढवण्याची गरज आहे. मनुष्यबळात वाढ केल्यानं खर्च 1,15,000 कोटी रुपयांनी वाढला आहे. पेन्शनवरील खर्च देखील 60 हजार कोटींनी वाढला आहे. 2024-25 मधील रेल्वे चालवण्याचा खर्च  263000 कोटी रुपये झाला आहे.

रेल्वेनं वाढता मनुष्यबळ खर्च भागवण्यासाठी मालवाहतूक वाढवण्याकडे लक्ष दिलं आहे. त्यामुळं प्रवास भाडं कमी प्रमाणात वाढवण्यात आल्याचं रेल्वेनं म्हटलं आहे. या प्रयत्नांमुळं सुरक्षा वाढेल आणि रेल्वे सेवेची गुणवत्ता वाढेल.  जगातील रेल्वे मालवाहतुकीत भारताचा दुसरा क्रमांक असल्याचं रेल्वेनं म्हटलं आहे.

भारतीय रेल्वेनं काही दिवसांपूर्वी दिवाळी आणि इतर सणांच्या कालावधीत 12000 पेक्षा अधिक विशेष फेस्टिवल ट्रेन चालवल्याचं म्हटलं आहे.

दुसऱ्यांदा प्रवास भाडे वाढ

भारतीय रेल्वेनं 2025 मध्ये दुसऱ्यांदा  प्रवास भाडे वाढवलं आहे. यापूर्वी जून महिन्यात रेल्वेनं प्रवासभाडे वाढवण्याचा निर्णय घेतला होता. 1 जुलै 2025 पासून रेल्वे प्रवास भाडे वाढवण्यात आले होते. त्यानंतर आता पाच महिन्यातच रेल्वेनं प्रवास भाडे वाढवण्याचा निर्णय घेतला आहे.

लोकल प्रवाशांना दिलासा

उपनगरीय रेल्वे आणि मासिक सिझन तिकीट म्हणजेच एमएसटीचे दर वाढवण्यात आलेले नाहीत. त्यामुळं मुंबईकरांना मात्र दिलासा कायम आहे.

आणखी वाचा

Comments are closed.