अरे किती रडणार! रनआऊटवरुन राडा, भर मैदानात अम्पायरशी भिडली पाकिस्तान कर्णधार, नेमकं काय घडलं?
भारत विरुद्ध पाकिस्तान महिला विश्वचषक 2025: आयसीसी महिला वनडे वर्ल्ड कपमध्ये भारतीय संघाने सलग दुसरा विजय नोंदवला आहे. श्रीलंकेला पराभूत केल्यानंतर, टीम इंडियाने पाकिस्तानला (India beat Pakistan Women’s World Cup 2025) 88 धावांनी पराभूत करून विजयी मालिका सुरू ठेवली. या विजयासह, भारताने सलग 12 व्यांदा पाकिस्तानला पराभूत करून आपला एकदिवसीय विक्रम कायम ठेवला. पाकिस्तान महिला संघाने अद्याप एकदिवसीय सामन्यात टीम इंडियावर विजय मिळवलेला नाही.
दरम्यान, भारत-पाकिस्तान सामना म्हटला की राडा होत नाही, असं कधी झालंच नाही. महिला वनडे वर्ल्ड कपमध्ये भारत आणि पाकिस्तान यांच्यात झालेल्या सामन्यात रनआऊटवरुन मोठा वाद निर्माण झाला. या वादामुळे काही काळ खेळ थांबवावा लागला. पाकिस्तानची कर्णधार फातिमा सना पण नाराज झाली आणि ती अम्पायरशी भिडली. या घटनेचा व्हिडिओ सोशल मीडियावर सध्या जोरदार व्हायरल होत आहे.
वाद नेमका कशामुळे झाला?
या सामन्यात भारतीय महिला संघाने 50 षटकांत 247 धावा केल्या. लक्ष्याचा पाठलाग करताना पाकिस्तानला सुरुवातीलाच मोठा धक्का बसला आणि हाच क्षण वादाचे कारण ठरला. चौथ्या षटकातील शेवटच्या चेंडूवर क्रांती गौडचा चेंडू सलामी फलंदाज मुनीबा अलीच्या पायाला लागला. क्रांतीने लगेच एलबीडब्ल्यूची अपील केली, पण अंपायरने ती नाकारली.
इतक्यात मुनीबा अली क्रीजच्या बाहेर गेली होती. हे पाहून दीप्ती शर्माने पटकन थ्रो मारला. त्यावेळी मुनीबाने आपला बॅट जमिनीवर ठेवला होता, पण चेंडू स्टंप्सवर लागतानाच तिची बॅट थोडी हवेत होती. आणि ती पण क्रीजच्या बाहेर होती. थर्ड अंपायरकडे निर्णय गेल्यावर त्यांनी तिला आउट ठरवलं. या निर्णयामुळे मुनीबा आणि पाकिस्तान संघ दोघेही नाराज झाले.
भर मैदानात अम्पायरशी भिडली पाकिस्तान कर्णधार
मैदानाबाहेर असलेल्या पाकिस्तानच्या कर्णधार फातिमा सनाने या निर्णयावर तीव्र नाराजी व्यक्त केली. तिने चौथ्या अंपायरशी बराच वेळ वाद घातला. मैदानावर मुनीबा काही काळ उभी राहिली आणि पाकिस्तानच्या खेळाडूंनी हा निर्णय अन्यायकारक असल्याचे म्हटले. मात्र अंपायरांनी आपला निर्णय कायम ठेवला आणि मुनीबाला परत जावे लागले. या घटनेने सामन्यात चांगलाच तणाव निर्माण झाला.
आयसीसीचा नियम काय सांगतो?
आयसीसीच्या नियम 30.1 नुसार, जर चेंडू स्टंप्सवर लागतानाच्या क्षणी फलंदाजाचा बॅट किंवा खेळाडू क्रीजच्या बाहेर असेल, तर तो रनआऊट मानला जातो. नियम 30.1.2 मध्ये स्पष्ट करण्यात आले आहे की, जर फलंदाजाने क्रीजच्या आत बॅट ठेवलेली नसेल आणि त्याचं शरीर क्रीजच्या बाहेर असेल, तर तो बाद ठरतो. फलंदाजाने क्रीजच्या आत राहणे आवश्यक असते, जोपर्यंत चेंडू डेड घोषित होत नाही. मुनीबा अलीच्या बाबतीत ती ना रन घेत होती, ना डाइव्ह मारत होती. तिचा बॅट जमिनीवरून वर गेला आणि ती क्रीजच्या बाहेर होती, त्यामुळे नियमांनुसार अंपायरांनी तिला योग्यच आउट दिले.
हे ही वाचा –
आणखी वाचा
Comments are closed.