IPL 2026 – यशस्वी जैस्वाल पहिल्यांदाच कर्णधाराच्या भूमिकेत; रियान पराग का नाही उतरला मैदानात? कारण आलं समोर
राजस्थान रॉयल्स आणि गुजरात टायटन्स यांच्यामध्ये स्पर्धेतील 52 वा सामना जयपूरमध्ये खेळवला जात आहे. मात्र, या सामन्यात राजस्थान रॉयल्सचा कर्णधार रियान पराग मैदानात उतरला नाही. नाणेफेकीच्या दरम्यान रियान परागच्या जागी यशस्वी जैस्वालला पाहून सर्वचजण आश्चर्यचकित झाले. रियान परागच्या अनुपस्थितीत यशस्वी जैस्वालला पहिल्यांदाच आयपीएलमध्ये पूर्णवेळ संघाचे नेतृत्व करण्याची संधी मिळाली आहे. नाणेफेक जिंकून यशस्वीने प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. तसेच रियान पराग या सामन्यात का खेळत नाही, याचे कारणही सांगितले.
दिल्ली कॅपिटल्स विरुद्धच्या मागील सामन्यात क्षेत्ररक्षण करताना परागला दुखापत झाली होती. त्या सामन्यातही यशस्वीने उर्वरित वेळ मैदानावर नेतृत्व सांभाळले होते, मात्र शनिवारी त्याने पूर्णवेळ कर्णधार म्हणून मैदानात पाऊल ठेवले. नाणेफेकीच्या वेळी यशस्वीने सांगितले की, “परागच्या दुखापतीमुळे आम्ही हा बदल केला आहे, पण तो लवकरच पुनरागमन करेल अशी आम्हाला आशा आहे.” या सामन्यासाठी राजस्थानने आपल्या संघात हेटमायर आणि यश राज पुंजा यांचा समावेश केला आहे.
दुसरीकडे, गुजरात टायटन्सचा कर्णधार शुभमन गिल यानेही नाणेफेक जिंकली असती तर प्रथम गोलंदाजीच स्वीकारली असती असे स्पष्ट केले. गुजरातच्या संघात प्रसिद्ध कृष्णाचे पुनरागमन झाले असून मानव सुथारला विश्रांती देण्यात आली आहे. प्ले-ऑफची शर्यत आता अधिक तीव्र झाली असून, गुजरातने या हंगामात अनेक चुरशीचे सामने जिंकल्यामुळे त्यांचा आत्मविश्वास उंचावलेला आहे. दोन्ही संघांसाठी हा सामना गुणतालिकेतील स्थान मजबूत करण्यासाठी अत्यंत महत्त्वाचा ठरणार आहे.
Comments are closed.