धक्कादायक! अमळनेरमध्ये पती-पत्नीने दोन लहान मुलींसह रेल्वेखाली जीवन संपवले
जळगावमधील अमळनेर तालुक्यातील टकरेखेडा परिसरात गुरुवारी पहाटेच्या सुमारास एक धक्कादायक घटना समोर आली. या गावातील एका पती-पत्नीने आपल्या दोन चिमुकल्या मुलींसह भरधाव रेल्वेखाली झोकून देत जीवन संपवले. सुनील अमृत भिल, त्यांची पत्नी पार्वती सुनील भिल आणि त्यांच्या दोन लहान मुली अशी मृतांची नावे आहेत.
टकरेखेडा शिवारातील रेल्वे रुळावर गुरुवारी पहाटे ५ च्या सुमारास ही घटना घडली. अद्याप या आत्महत्येमागचं कारण समोर आलं नसलं तरी भिल दाम्पत्याने नैराश्यातून किंवा कौटुंबिक विवंचनेतून आपले जीवन संपवले, अशी प्राथमिक माहिती समोर आली आहे. रेल्वेचा वेग प्रचंड असल्याने चौघांचाही जागीच मृत्यू झाला. पहाटेच्या वेळी रेल्वे रुळाजवळ मृतदेह आढळून आल्यानंतर परिसरातील ग्रामस्थांनी तातडीने पोलिसांना माहिती दिली.
घटनेची माहिती मिळताच अमळनेर पोलीस ठाण्याचे पथक घटनास्थळी दाखल झाले. पोलिसांनी चौघांचेही मृतदेह ताब्यात घेऊन उत्तरीय तपासणीसाठी ग्रामीण रुग्णालयात रवाना केले आहेत. एवढे टोकाचे पाऊल उचलण्यामागे नेमके कारण काय होते, याचा तपास पोलीस करत आहेत.
या प्रकरणात प्रेमसंबंधातून वाद झाल्याची चर्चा परिसरात सुरू आहे. मात्र, या चर्चेला अद्याप अधिकृत दुजोरा मिळालेला नाही. नेमके कारण पोलिसांच्या तपासानंतरच स्पष्ट होणार आहे. घटनेची बातमी वाऱ्यासारखी पसरताच टकरेखेडा गावावर आणि भिल कुटुंबीयांच्या नातेवाईकांवर दुःखाचा डोंगर कोसळला आहे.
Comments are closed.