मुलींसाठी स्वतंत्र ITI, तुळजापूर मंदिरासाठी 165 कोटी; मंत्रिमंडळाच्या बैठकीतील 10 मोठे निर्णय

Maharashtra Cabinet Meeting at Chaundi Ahilyanagar : पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकर यांच्या 300व्या जयंतीनिमित्त फडणवीस सरकारने प्रथमच अहिल्यानगरच्या चौंडीत राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीचे आयोजन केलंय. आजच्या (6 मे 2025) या ऐतिहासिक कॅबिनेट बैठकीच्या (Maharashtra Cabinet Meeting) माध्यमातून राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांनी अतिशय महत्वाच्या निर्णयांची घोषणा केली आहे. आज बैठकीच्या निमित्ताने चौंडीला स्मृतीस्थळाच्या जतन आणि संवर्धन करण्यासाठी 681 कोटी रुपयांचा आराखडा मान्य केलाय. या निधीतून विविध प्रकारची कामं  होतील असेही मुख्यमंत्र्यांनी सांगितलंय.

दरम्यान, अष्टविनायक मंदिरासाठी 147 कोटी रुपये,  तुळजापूर मंदिरासाठी 165 कोटी रुपये, नाशिकच्या त्र्यंबकेश्वर मंदिर विकास आराखड्यासाठी 275 कोटी रुपये, सोबतच विदर्भातील माहूरगड विकास आराखड्यासाठी 829 कोटी रुपये, असे एकूण 5 हजार 520 कोटी रुपयांच्या कामांना मान्यता देण्यात आली आहे. तर दुसरीकडे अहिल्यानगर जिल्ह्यात पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या नावे  शासकीय वैद्यकीय महाविद्यालय उभारणार असल्याची घोषणा ही मुख्यमंत्र्‍यांनी यावेळी केलीय. सोबतच मुलींचे स्वतंत्र आयटीआय देखील असणार असल्याचे ते म्हणाले.

राज्यात आदिशक्ती अभियान, पुण्यश्लोक अहिल्यादेवींच्या नावे चित्रपटाची निर्माती

राज्यात महिला सक्षमीकरणासाठी सरकार आदिशक्ती अभियान राबवणार आहे. समाजात संवेदनशीलता निर्माण करणे आणि जागृती करण्याचा आमचा प्रयत्न असेल. जे काम पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांनी केले तेच काम आमचं सरकार करणार आहे. अहिल्यादेवींचे जीवन आणि कार्याचा सन्मान झाला पाहिजे, यासाठी चित्रपटाची निर्मिती केली जाणार आहे. तो चित्रपट बहुभाषिक असेल. शिवाय हा केवळ जीवनपट नसेल तर प्रभावी मांडणी करण्याचा प्रयत्न आम्ही करणार आहोत. असेही मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले.

धनगर समाजाच्या विद्यार्थ्यांसाठी यशवंत योजना, नामांकित शाळांमध्ये प्रवेश

परक्रियांच्या आक्रमणामुळे आमची श्रद्धास्थानं नष्ट करण्यात आली. मात्र त्याचे पुनरुज्जीवन करण्याचे काम अहिल्यादेवींनी केलं. आज बैठकीच्या निमित्ताने चौंडीला स्मृतीस्थळाचे जतन करण्यासाठी 681 कोटी रुपयांचा आराखडा मान्य केलाय. अखिल भारतीय स्थरावर प्रेरणा आणि तीर्थस्थळ तयार झाले पाहिजे, असं काम आपण केलंय. समाजात संवेदनशीलता निर्माण करणे आणि जागृती करण्याचा आमचा प्रयत्न आहे. महिला केंद्रीत एनजीओ उभा करण्याचे काम हाती घेतले आहे. धनगर समाजाच्या विद्यार्थ्यांना नामांकित शाळांमध्ये प्रवेश द्यायचा यासाठी यशवंत योजना सुरु केली आहे. आता 10 हजार विद्यार्थी आपण यातून शिकवणार आहोत. सोबतच गुणवत्ताधारक विद्यार्थ्यांसाठी वसतीगृह योजना सुरु करत आहोत.अशी महत्वपूर्ण घोषणा ही मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केलीय.

अहिल्यादेवींच्या काळातील  19 विहिरी 6 कुंड 34 जलाशयांचे होणार संवर्धन

अहिल्यादेवी होळकर यांनी उभारलेल्या विहिरींसाठी जलसंधारण विभागाने हाती काम घेतलंय ज्यात त्यांचे पुनरुज्जीवन आपण करणार आहोत. ज्यामध्ये  19 विहिरी 6  कुंड 34 जलाशयाच्या संवर्धनाचे काम करणार आहोत. सोबतच राहुरी दिवाणी न्यायालयाला ही मान्यता दिली आहे. नाशिक आणि त्र्यंबकेश्वरला मेळावा होतो त्यात कुंभमेळा प्राधिकरणाच्या कायद्याला मंजुरी दिली आहे. अहिल्यादेवींच्या त्रिशताब्दीनिमित्ताने डाक तिकीटसह प्रेरणा गीत देखील जारी केलंय. ज्याप्रकारे या देशात सांस्कृतिक पुनरुत्थानाचे काम पुण्यश्लोक अहिल्यादेवींच्या माध्यामातून केलं गेलं त्याच पावलावर पाऊल टाकत सरकार पुढे जात आहे. असेही मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यावेळी म्हणाले.

https://www.youtube.com/watch?v=gdnyxysbzp0

हे ही वाचा

अधिक पाहा..

Comments are closed.