ठाकरेंचा फुटीर खासदार पहिल्यांदाच मीडियासमोर; आष्टीकरांनी सांगितलं शिवसेना सोडण्याचं राज’कारण’

मुंबई : ठाकरेंच्या शिवसेनेतील (Shivsena) 6 खासदारांनी आपला स्वतंत्र गट स्थापन केला असून ओमराजे निंबाळकर यांच्यासह हिंगोलीतील खासदार नागेश पाटील आष्टीकर (Nagesh patil) यांनीही ठाकरेंची साथ सोडत शिंदे गटात गेल्याचं स्पष्ट झालं आहे. कारण, स्वत: नागेश पाटील आष्टीकर यांनी फेसबुक लाईव्हच्या माध्यमातून आपली भूमिका मांडली असून मी दुसरीकडे कुठेही गेलो नाही, शिवसेनेतून शिवसेनेतच गेलोय, असे आष्टीकर यांनी सांगितले. त्यामुळे, पहिल्यांदाच ठाकरे गटातील फुटलेल्या 6 खासदारांपैकी एका खासदाराने समोर येऊन आपली भूमिका मांडली. सत्तेत असल्याशिवाय कामे होत नव्हती, म्हणूनच मी हा निर्णय घेतल्याचं आष्टीकर यांनी म्हटलं. तसेच, कार्यकर्त्यांना त्यांनी महत्त्वाचं आवाहन देखील केलंय.

नागेश पाटील आष्टीकर यांनी आज आपली भूमिका परखडपणे मांडली. आम्ही 18 जूनपर्यंत कुठेही गेलो नव्हतो, मात्र शिवसेना वर्धापन दिनाच्या मेळाव्यात आमच्यावर बोचऱ्या शब्दात टीका करण्यात आली, त्याने आमची मनं दुखावली. पण, खरं सांगायचं तर आपण पाहतोय गेल्या अनेक दिवसांपासून सत्तेशिवाय कुठलेही कामे होत नाहीत. मी जे काही पाऊल उचललं, ते लोकांनी मला ज्या आशेनं खासदार म्हणून निवडून दिलंय, ती त्यांची कामे पूर्ण करायची म्हणून. सत्तेत असल्याशिवाय लोकांची ही कामे होत नव्हती. अनेकांना माझी भूमिका पटली नसेल, काहींना पटलीही असेल. मी तुम्हाला म्हटल्याप्रमाणे, मला तुमच्याकडे सालानं ठेवा, मी तुमचं साल नेकीनं करेन. माझ्यावर तुम्ही जी जबाबदारी ठेवलीय, ती जबाबदारी निश्चितपणे पार पाडे, असे नागेश पाटील आष्टीकर यांनी म्हटले.

मी शिवसेनेतून शिवसेनेतच गेलोय

मी माझ्या कामातून नाराज कार्यकर्त्यांना दाखवून देईल, मी दुसरं कुठेही गेलो नाही, शिवसेनेतेून शिवसेनेतच गेलोय, मी विचारधारा सोडलेली नाही, असेही आष्टीकरांनी कार्यकर्त्यांना सांगितले. कृपया कुणीही असंवैधानिक बोलू नका, राग व्यक्त करा पण असंवैधानिकपणे बोलू नका, शब्द मनाला खूप लागतात. कारण, आपल्याच गावच्या बाभळी आणि आपल्याच गावच्या बोरी.. असे म्हणत मी कार्यकर्त्यांसोबत कायम असेल, असेही आष्टीकर यांनी म्हटले.

कुणीही कोणाला कमी नसतं

संजय राऊत साहेब म्हणाले की, झोडून काढ, हरकत नाही ते माझ्या वडिलांसारखे आहेत, त्यांनी बोलायला हरकत नाही. मात्र, झोडून काढू म्हटले तरी कोणीही कोणाला कमी नसतं, मात्र त्याचे परिणाम वाईट होतात, असेही नागेश पाटील आष्टीकर यांनी म्हटलं.

हेही वाचा

उद्धव ठाकरेंना भेटून मातोश्रीबाहेर पडताच संजय दिना पाटलांची लेक म्हणाली, ‘आमच्या घरात वैयक्तिक निर्णयाची पद्धत, मी उद्धव साहेंबासोबत’

Comments are closed.