नागपूरचा हिंसाचार नियोजनबद्धच! सायबर पोलिसांच्या तपासात धक्कादायक माहिती उघड; दोघांना अटक
नागपूरचे उल्लंघन अद्यतनः नागपूरच्या (Nagpur) महल, हंसापुरी आणि भालदारपुरा या परिसरात औरंगजेबाची कबर हटवण्याच्या मुद्द्यावरुन हिंसाचार उसळलेला पाहायला मिळाला होता. मात्र, नागपूरचा हिंसाचार प्रकरणाच्या तपासात मोठी माहिती समोर आली असून ही दंगल नियोजनबद्द (Nagpur Riots) असल्याचे पुढे आले आहे. अशातच नागपूर हिंसाचार प्रकरणात मायनॉरिटी डेमोक्रॉटिक पार्टीचे कार्याध्यक्ष हमीद इंजिनिअर व मोहमद शहजाद खान दोंघांना आता अटक करण्यात आली आहे.
युट्युब चॅनेलच्या माध्यमातून भीती पसरवत असल्याचे उघड
सोशल मीडियाच्या माध्यमातून यांनी हिंसाचाराचा कट रचल्याचे सायबर पोलिसांच्या तपासात पुढे आले आहे. युट्युब चॅनेलच्या माध्यमातून हमीद इंजिनिअर हा हिंसाचाराच्या दिवशी सकाळी समाजात भीती पसरवत असल्याचे यात दिसून आले आहे. तो लोकांना मुजाहिदीनसाठी देणग्या गोळा करण्याची विंनती करत होता. त्यात त्यानं गाझा देणगीची मागणी केली, हे सायबर तपासात पुढे आले आहे.
मायनॉरिटी डेमोक्रॉटिक पक्षाच्या आणखी दोघांना अटक
नागपुरात जो हिंसाचार झाला, जे वातावरण निर्माण करण्यात आलं, ते सोशल मीडियाच्या माध्यमातूनच करण्यात आलं. त्या संदर्भात दुपारीच सोशल मीडिया योग्य पद्धतीने ट्रॅक केला असता तर कदाचित ही घटना घडली नसती, असे म्हणत राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी नागपूर हिंसाचार प्रकरणावर भाष्य केलं. ते एबीपी माझाच्या वतीने आयोजित करण्यात आलेल्या माझा महाराष्ट्र माझा, माझं व्हिजन या कार्यक्रमात बोलत होते. यावेळी त्यांनी सोशल मीडियावरुन हे प्रकरण चिघळलं असल्याचे मत मांडले होते. अशातच आता पोलीस तपासात पुढे आलेल्या माहितीनुसार, मुख्य आरोपी पैकी एक फहीम खान हा हमीद इंजीनिअरच्या पक्षाचा सदस्य असल्याने हिंसाचाराचे तार जुडतांना दिसत आहे.
तर नागपूरचा हिंसाचार हा नियोजनबद्द (Nagpur Riots) असल्याचे आता तपासातून पुढे आले आहे. नागपुरात उसळलेल्या हिंसाचाराच्या आधी आणि नंतर सोशल मीडियावर भडकाऊ पोस्ट करणाऱ्यांवर नागपूर पोलिसांचा सायबर सेल कारवाई करत आहे. अशी अनेक सोशल मिडिया खाती आणि त्यांचा वापर करणाऱ्यांची ओळख पटवून त्यांच्यावर कारवाईही केली जात आहे. अशातच ही मोठी माहिती पोलिसांच्या हाती लागली आहे.
हिंसाचाराच्या घटनेनंतर गृहमंत्री फडणवीस पहिल्यांदाच आज नागपुरात
औरंगजेबाची कबर हटविण्यावरुन झालेल्या आंदोलनानंतर दोन गटांत तेढ निर्माण होऊन जाळपोळ आणि पोलिसांवर दगडफेक करण्यात आली. या हिंसाचाराच्या घटनेनंतर आज (22 मार्च) मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे नागपुरात दाखल होणार आहे. नागपूर हिंसाचाराच्या घटनेनंतर गृहमंत्री फडणवीस हे पहिल्यांदाच नागपुरात येत आहे. पुढे आलेल्या माहितीनुसार, मुख्यमंत्र्यांनी नागपूरमध्ये वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांची बैठक बोलावली आहे. पोलीस आयुक्त कार्यालयात बोलावलेल्या या बैठकीत वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांकडून नागपूरमध्ये घडलेल्या हिंसाचाराचा आढावा घेतला जाणार आहे. सोबत हिंसाचारग्रस्त भागातील विद्यमान परिस्थितीची व उपायोजना संदर्भात मुख्यमंत्री चर्चा करणार असल्याचे सांगितलं जातंय.
हे ही वाचा
अधिक पाहा..
Comments are closed.