'नॉटी बॉय' कक्षेत स्थिरावतो
इओएस-05’ या अत्याधुनिक उपग्रहाचे यशस्वी प्रक्षेपण : देश आनंदला, राष्ट्रपती-पंतप्रधानांकडून शास्त्रज्ञांचे अभिनंदन
वृत्तसंस्था / श्रीहरिकोटा (आंध्रप्रदेश)
शुक्रवारी पहाटे 2 वाजून 55 मिनिटांनी, बव्हंशी सारा देश गाढ झोपेत असताना, भारताची जगद्विख्यात अवकाश संशोधन संस्था ‘इस्रो’ने इतिहास घडविला आहे. आंध्रप्रदेशातील श्रीहरिकोटा येथील प्रक्षेपण केंद्रावरून ‘जीएसएलव्ही-एफ17’च्या माध्यमातून भारतनिर्मित ‘ईओएस-05’ या अत्याधुनिक उपग्रहाचे यशस्वी प्रक्षेपण इस्रो या संस्थेने केले आहे. प्रक्षेपण झाल्यानंतर 19 मिनिटांनी हा उपग्रह त्याच्या पूर्वनिर्धारित कक्षेत स्थिरावला आहे. या यशामुळे सारा देश आनंदला असून इस्रोच्या वैज्ञानिकांच्या आणि कर्मचाऱ्यांच्या आनंदाला तर उधाण आले आहे. भारताचे अवकाशातील ‘नेत्र’ मानला जाणारा हा उप्रग्रह ‘नॉटी बॉय’ म्हणून परिचित आहे. याचा उपयोग दूरसंचार आणि टेहळणी यासाठी केला जाणार आहे.
या यशामुळे पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी इस्रोच्या सर्व संशोधकांचे, अभियंत्यांचे आणि कर्मचाऱ्यांचे मन:पूर्वक अभिनंदन केले आहे. इस्रोच्या यशाचा हा क्षण साऱ्या देशासाठी अतिव अभिमानाचा आहे. भारताने पुन्हा एकदा अवकाश क्षेत्रातील आपले स्थान सिद्ध केले आहे, असा संदेश पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी दिला आहे.
दोन प्रयत्नांनंतरचे यश
या उपग्रहाचे प्रक्षेपण करण्याचा प्रयत्न इस्रोने यापूर्वी दोनदा केला होता. तथापि, उपग्रहाला अंतराळात घेऊन जाणाऱ्या ‘पीएसएलव्ही’ या अग्निबाणात तांत्रिक दोष निर्माण झाल्याने दोन्ही वेळा अभियानात अपयश आले होते. तरीही, प्रयत्न न सोडण्याचे आवाहन पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि केंद्र सरकारने केले होते. दोनदा अपयश आल्याने आता तिसऱ्या वेळेला काय होणार, या चिंतेने इस्रोचे सर्व 16 हजार 500 संशोधक, शास्त्रज्ञ, अभियंते आणि कर्मचारी तणावात होते. तथापि, शुक्रवारी पहाटे 2 वाजून 55 मिनिटे या पूर्वनिर्धारित वेळेला अग्निबाणाने अवकाशात उ•ाण केले. ते यशस्वी झाल्याने निम्मा तणाव दूर झाला होता. प्रक्षेपणानंतर 19 मिनिटांनी उपग्रह यशस्वीरित्या त्याच्या निर्धारीत भूस्थिर कक्षेत स्थिरावला आणि हे अभियान 100 टक्के यशस्वी झाल्याची घोषणा करण्यात आली. यावेळी सर्व संशोधक आणि कर्मचाऱ्यांच्या आनंदाला उधाण आले होते.
अग्निबाणात परिवर्तन
पोलार सॅटेलाईट लाँच व्हेईकल (पीएसएलव्ही) अग्निबाणाला सलग दोनदा अपयश आल्याने इस्रोने तिसऱ्या प्रयत्नासाठी जिओसिंक्रोनस लाँच व्हेईकलचा (जीएसएलव्ही) उपयोग करण्याचा निर्णय घेतला. हे परिवर्तन यशस्वी ठरले आणि हा महत्त्वाचा उपग्रह अवकाशात यशस्वीरित्या स्थानापन्न करण्याचे स्वप्न साकार झाले आहे. या देदिप्यमान यशामुळे देशाच्या अंतराळ सामर्थ्यात भर पडणार आहे.
साडेतीन दशकांचे प्रयत्न
वजनदार उपग्रह अवकाशात सोडण्यासाठी क्रायोजेनिक इंजिनची आवश्यकता असते. तथापि, 1990 च्या दशकात भारताकडे अशा प्रकारचे इंजिन नव्हते. त्यामुळे छोटे उपग्रह प्रक्षेपित करण्यापलिकडे जाता येत नव्हते. भारताला या इंजिनाचे तंत्रज्ञान देण्यास कोणताही देश राजी नव्हता. त्यामुळे भारताने रशियाचे साहाय्य घेण्याचा प्रयत्न केला. पण भारताला हे तंत्रज्ञान मिळू नये, यासाठी रशियावरही आंतरराष्ट्रीय दबाव आणण्यात आला. त्यामुळे रशियाने भारताला केवळ काही क्रायोजेनिक इंजिन्स पुरविली पण पूर्ण तंत्रज्ञान देण्यास नकार दिला. भारताने क्रायोजेनिक इंजिने आणि अग्निबाण आमच्याकडून विकत घ्यावेत, पण स्वत: निर्माण करू नयेत, अशी त्यावेळच्या बलाढ्या देशांची इच्छा होती.
आव्हानाचा स्वीकार
भारताच्या शास्त्रज्ञांनी आणि अभियंत्यांनी बलाढ्या देशांचे हे आव्हान स्वीकारले. क्रायोजेनिक इंजिनयुक्त अग्निबाणाची स्वदेशातच निर्मिती करण्याचा निश्चय करण्यात आला. इस्रोच्या शास्त्रज्ञांनी 20 वर्षे दिवस-रात्र प्रयत्न केले. आपली बुद्धिमत्ता आणि तंत्रवैज्ञानिक कौशल्य पणाला लावले आणि यशही मिळविले. भारताने जगाच्या नाकावर टिच्चून स्वदेशी क्रायोजेनिक इंजिन आणि अग्निबाण निर्माण केला आणि आज त्या जोरावर कोणत्याही वजनाचे आणि प्रकारचे उपग्रह अवकाशात प्रक्षेपित करण्याची ‘आत्मनिर्भर’ क्षमता भारताने प्राप्त केलेली आहे.
कसा आहे हा उपग्रह…
‘ईओएस-05’ या उपग्रहाची वैशिष्ट्यो पुढीलप्रमाणे…
- वजन : 2 हजार 376 किलोग्रॅम
- प्रकार : जीओ इमेजिंग स्पेसक्राफ्ट (पृथ्वीची छायाचित्रे घेण्याची क्षमता)
- कक्षा : पृथ्वीच्या पृष्ठभागापासून साधारणत: 36,000 किलोमीटर
- स्थान : भूस्थिर उपग्रह असल्याने सातत्याने भारताच्या वर राहणार
- लक्ष्य : भारताच्या चीन आणि पाकिस्तानला लागून असणाऱ्या सीमा
- कव्हरेज : सतत भारताच्या सीमाभागाचे व अंतर्गत भागाचे निरीक्षण
- क्षमता : संपूर्ण भारत भूमीची प्रत्येक 30 मिनिटांमध्ये छायाचित्रे
- क्षमता संवर्धन : आवश्यकता भासल्यास प्रत्येक 5 मिनिटांनी कव्हरेज
उपग्रहावरील सामग्री
- दुर्बिण : अत्याधुनिक 700 एमएम रिची-क्रेटियन 42 मीटर स्पेटियल
- स्पेक्ट्रल ब्रेड्थ : 158 स्पेक्ट्रल बँडस्, भूगर्भ निरीक्षणाचीही क्षमता
- अत्याधुनिक अँटेना : वेगाने हालचाल करणारे अत्याधुनिक अँटेना
वापरा
- भारताच्या सीमांवर होणाऱ्या सूक्ष्म हालचालीही टिपण्यास उपयुक्त
- भारतात येणारी वादळे, पूर, अतिवृष्टी, ढगांचे स्थान यांच्यावर लक्ष
- शेतांमधील पिकांची स्थिती, तिच्यात होणारे परिवर्तन, ढगफुटीवर लक्ष
4. अनेक प्रकारची सामरिक आणि नागरी गुप्त माहिती देण्यास सक्षम
Comments are closed.