जयंत पाटील-विनोद तावडेंची गुपचूप भेट, महायुतीत जाणार? सुप्रिया सुळे, रोहित पवारांची प्रतिक्रिया
मुंबई : राज्यात ऑपरेशन टायगरच्या माध्यमातून ठाकरेंच्या शिवसेनेतील सहा खासदार एकनाथ शिंदेंच्या शिवसेना पक्षात दाखल झाले आहेत. त्यामुळे, राज्याच्या राजकारणात मोठा भूकंप झाल्याचं दिसून आलं, त्यानंतर शिवसेना उबाठा पक्षप्रमुख उद्धव ठाकरेंनी सर्वच फुटीर खासदारांच्या मतदारसंघात जाऊन जाहीर सभा घेत हल्लाबोला केला होता. एकीकडे सहा खासदारांच्या फुटीची चर्चा सुरू असतानाच राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार (NCP) पक्षात देखील फूट पडणार असल्याची चर्चा होती. त्यातच, राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे माजी प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील (Jayant Patil) आणि भाजपचे वरिष्ठ नेते विनोद तावडे (Vinod Tawde) यांच्यात मुंबईत बैठकत झाल्याची माहिती समोर आली आहे. याबाबत, खासदार सुप्रिया सुळे (supriya Sule) आणि आमदार रोहित पवारांनी भूमिका मांडली.
राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्ष महायुतीत सहभागी झाल्यास पक्षाच्या वाट्याला काय येऊ शकतं? याबाबत भाजप नेते विनोद तावडे आणि जयंत पाटील यांच्या बैठकीत चर्चा झाल्याचे समजते. विनोद तावडे आणि जयंत पाटील यांच्यातील चर्चेनंतर जयंत पाटील आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या एका वरिष्ठ नेत्यांमध्येही याबाबत चर्चा झाल्याची माहिती आहे. विशेष म्हणजे, राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्ष सत्तेत येत असल्यास राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची नेमकी भूमिका काय? असणार याबाबत चर्चा झाल्याची माहिती ‘एबीपी माझा’ला विश्वसनीय सूत्रांनी दिली. दरम्यान, याबाबत जयंत पाटील यांना संपर्क साधला असता त्यांनी विनोद तावडे यांच्याशी भेट झाल्याचं मान्य केले. मात्र, बैठकीत अनौपचारिक चर्चा पार पडल्याची माहिती त्यांनी दिली.
पाटील आणि तावडे यांच्या बैठकीबाबत मला माहित नाही, अशी प्रतिक्रिया खासदार सुप्रिया सुळे यांनी दिली. तसेच, विनोदजी आणि आम्ही अनेक वेळा भेटलो आहोत, आम्ही एका कमिटीत आहोत. गेल्या महिन्याभरात मी आणि विनोदजी 21 वेळा भेटलो, यात भाजपचे अनेक नेते होते. भारतीय जनता पक्षाचे अध्यक्ष देखील त्यात असतात, असे अनेक नेते आमच्याबरोबर एकत्र असतात, असे म्हणत सुप्रिया सुळेंनी राजकीय चर्चेवर अधिक बोलणं टाळलं.
अशी कुठलीही चर्चा नाही
अशी कुठलीही चर्चा आमच्या पक्षात चालू नाही, ही फक्त चर्चा आहे. सामान्य लोकांचे प्रश्न मांडले जातात त्याला कुठेतरी मुख्यमंत्र्यांनी टिप्पणी केली, अशी फक्त चर्चा आहे, यात काही तथ्य नाही, अशी प्रतिक्रिया यासंदर्भात आमदार रोहित पवार यांनी दिली. आम्ही 60 वर्षे भाजपच्या विरोधात लढलेला पक्ष आहोत, आम्ही शेतकऱ्यांसाठी आंदोलन केलं तेव्हा चर्चा सरकारने केली नाही. दुसर आंदोलन केलं तेव्हा मुख्यमंत्र्यांनी परदेशी यांच्याशी बोला असं सांगितलं. उद्या आमदारांसोबत परदेशांची बैठक आहे, अशी माहिती देखील रोहित पवार यांनी दिली.
हेही वाचा
Comments are closed.