संसदेतील कोंडी फुटली; आज चर्चा लोकसभा अध्यक्ष ओम बिर्ला यांची यशस्वी शिष्टाई

► वृत्तसंस्था नवी दिल्ली
संसदेच्या चालू पावसाळी अधिवेशनाच्या सुरुवातीपासून निर्माण झालेली कोंडी आता सुटली आहे. विरोधी पक्ष ‘सार्वजनिक परीक्षा (गैरप्रकारांना प्रतिबंध) सुधारणा विधेयक, 2026’ वर चर्चा करण्यास सहमत झाले आहेत.

लोकसभा अध्यक्ष ओम बिर्ला यांच्या पुढाकारानंतर प्रमुख राजकीय पक्षांचे सभागृह नेते सभागृहात सुधारणा विधेयकावर चर्चा करण्यास तयार झाले आहेत. अध्यक्षांच्या शिष्टाईपूर्वी सोमवारीही संसदेच्या दोन्ही सभागृहात वेळोवेळी गदारोळ सुरू राहिल्याने कामकाजात वारंवार व्यत्यय सुरू राहिला होता.

प्रश्नपत्रिका फुटीला आळा घालण्याच्या उद्देशाने आणलेल्या ‘सार्वजनिक परीक्षा (गैरप्रकारांना प्रतिबंध) विधेयक, 2026’वर मंगळवार, 28 जुलै रोजी दुपारी 12 वाजता चर्चा सुरू होण्याची शक्यता आहे. सभागृहाच्या कामकाजादरम्यान अध्यक्ष ओम बिर्ला यांनी सर्व पक्षांना आवाहन केले होते. हा मुद्दा लाखो विद्यार्थी आणि तरुणांशी तसेच स्पर्धा परीक्षांच्या पारदर्शकतेशी संबंधित असल्यामुळे एक व्यापक आणि अर्थपूर्ण चर्चा होणे उचित असल्याचे ते म्हणाले होते.

याचदरम्यान अध्यक्षांनी सत्ताधारी पक्ष आणि विरोधी पक्ष या दोघांनाही सायंकाळी 5 वाजेपर्यंत चर्चा सुरू करण्यासाठी तोडगा काढण्याकरिता वाटाघाटी करण्याचे आवाहन केले. त्यानंतर अध्यक्षांनी विविध राजकीय पक्षांच्या सभागृह नेत्यांशी वैयक्तिकरित्या संवाद साधला. परिणामी, सत्ताधारी पक्ष आणि विरोधी पक्ष दोघेही विधेयकावर चर्चा करण्यास सहमत झाल्यामुळे आता मंगळवारी सविस्तर चर्चा सुरू करण्याचे ठरले. त्यानुसार आता संसदेचे कामकाज रुळावर येण्याची चिन्हे दिसत आहेत.

‘सार्वजनिक परीक्षा (गैरप्रकारांना प्रतिबंध) सुधारणा विधेयक, 2026’ विधेयक सोमवारी लोकसभेमध्ये मांडण्यात आले आहे. या विधेयकाचा उद्देश प्रश्नपत्रिका फुटणे, कॉपी करणे, संघटित परीक्षा माफिया आणि इतर गैरप्रकारांना प्रभावीपणे आळा घालणे हा आहे.

मंगळवारच्या चर्चेदरम्यान, विविध पक्ष विधेयकाच्या तरतुदींवर सूचना आणि दुरुस्त्या सुचवू शकतात. चर्चेनंतर सरकार या सूचनांना प्रतिसाद देईल आणि त्यानंतर हे विधेयक सभागृहात मंजुरीसाठी सादर केले जाईल. चर्चा पूर्ण झाल्यानंतर विधेयकावर मतदानही घेतले जाऊ शकते.

पंतप्रधान कार्यालयातील राज्यमंत्री डॉ. जितेंद्र सिंह यांनी दुपारी 12 वाजता लोकसभेचे कामकाज सुरू झाल्यावर ‘सार्वजनिक परीक्षा (गैरप्रकारांना प्रतिबंध) सुधारणा विधेयक, 2026’ विधेयक सादर केले होते. विरोधी पक्षांच्या गदारोळात डॉ. जितेंद्र सिंह यांनी हे विधेयक सादर केले होते. यादरम्यान अध्यक्षांच्या आवाहनानंतरही विरोधी पक्षाचे सदस्य सभागृहाच्या मध्यभागीच थांबले. विरोधकांच्या गदारोळामुळे अध्यक्षांनी प्रथम दुपारी 2 वाजेपर्यंत आणि नंतर सायंकाळी 5 वाजेपर्यंत कामकाज तहकूब केले होते.

आज होणारी चर्चा महत्त्वाची
जर मंगळवारी प्रस्तावित चर्चा ठरल्याप्रमाणे पार पडली, तर पावसाळी अधिवेशनात गेल्या अनेक दिवसांपासून सुरू असलेला तिढा सुटू शकतो. पेपरफुटी रोखण्यासाठी सरकारने प्रस्तावित केलेल्या कठोर कायदेशीर तरतुदींवरही संसदेत सविस्तर चर्चा होईल. यामुळे सत्ताधारी पक्ष आणि विरोधी पक्ष या दोघांनाही आपापली भूमिका मांडण्याची आणि विद्यार्थ्यांशी संबंधित या महत्त्वाच्या मुद्यावर पुढील कृतीची दिशा ठरवण्याची संधी मिळेल.

ही लोकशाहीची सर्वात मोठी ताकद
संसदीय परंपरेनुसार, लोकसभा अध्यक्ष ओम बिर्ला यांच्या पुढाकाराने पुन्हा एकदा महत्त्वपूर्ण मध्यस्थी साधता आली आहे. महत्त्वाच्या राष्ट्रीय मुद्यांवर संवाद, एकमत आणि सविस्तर चर्चा ही लोकशाहीची सर्वात मोठी ताकद आहे. सर्व पक्षांना चर्चेसाठी एकत्र आणण्याचे ओम बिर्ला यांचे प्रयत्न हे संसदीय प्रतिष्ठा आणि लोकशाही मूल्यांचे एक सकारात्मक उदाहरण म्हणून पाहिले जात आहे.

Comments are closed.