‘केतन अग्रवालसोबत असंच व्हायला हवं होतं… सियाला जामीन द्या’; महिलेच्या ट्वीटनं सारे हैराण

पुणे केतन अग्रवाल प्रकरण: ज्या घरात लग्नाचे सनई चौघडे वाजणार होते, त्या घरात आज स्मशान शांतता पसरली आहे. ज्या घरात मंडळी वऱ्हाडी म्हणून येणार होती, तीच मंडळी आता सांत्वन करण्यासाठी येताहेत. पुण्यातील बांधकाम व्यावसायिक विशाल अग्रवाल यांचा मुलगा केतन अग्रवालची हत्या करण्यात आलीय. सिया गोयलशी (Siya Goyal) लग्न करून सुखी संसाराचं स्वप्न केतननं पाहिलं होतं. पण तिनंच केतनचा (Ketan Agarwal Murder Case) केसानं गळा कापलाय आणि या हत्येत सियाला साथ दिली ती, तिचा प्रियकर चेतन चौधरीनं (Chetan Chaudhary).

सिया आणि केतनचा फेब्रुवारी महिन्यात साखरपुडा झाला. नोव्हेंबरमध्ये हे दोघे बोहल्यावर चढणार होते. त्यासाठी जयपूरमध्ये 14 कोटींचा पॅलेस आणि दोन खासगी विमानं बुक करण्यात आली होती. मात्र त्याआधी काहीही करून केतनचा काटा काढण्याचं सियान आणि चेतननं ठरवलं आणि लोहगडावरुन ढकलून त्याची हत्या केली. आता या प्रकरणानं संपूर्ण देशभरात संतापाची लाट उसळली आहे. सिया आणि चेतनला फाशीची शिक्षा देण्यात यावी, अशी मागणी केतनचे कुटुंबीय करत आहेत. तसेच, इतरही अनेकजण सिया गोयलला कठोरता कठोर शिक्षा दिली जावी, अशी मागणी करत आहेत. पण, अशातच एका महिलेनं मात्र, सियाची बाजू घेत तिला जामीन दिला जावा, अशी मागणी केलीय. तर, केतन अग्रवालसोबत असंच व्हायला हवं होतं, असं म्हटलंय.

सियाची बाजू घेत महिला नेमकं काय म्हणाली?

पुण्याच्या केतन अग्रवाल प्रकरणणानं संपूर्ण देश हादरला आहे. सिया गोयल आणि चेतन चौधरी यांनी रचलेल्या कटाचा पर्दाफाश झाल्यानंतर केतन अग्रवाल लोहगडावरुन पाय घसरुन पडला नव्हता, तर त्याला धक्का दिला होता, हे स्पष्ट झालंय. सगळीकडे सिया आणि चेतन यांनी उचललेल्या पावलावर संताप व्यक्त करत आहेत. पण, एका महिलेनं सिया गोयलची बाजू घेत ट्वीट केलंय. जे सध्या प्रचंड व्हायरल होत आहे. केतन अग्रवाल याच्यासोबत असेच व्हायला हवं होतं, असं या महिलेनं म्हटलं आहे. तसेच, या प्रकरणात सिया गोयलच्या जामीनाची मागणी केली आहे.

प्रियांका देशमुख नावाच्या महिलेनं ट्विटरवर पुण्यातील एका हत्या प्रकरणाबाबत खळबळजनक वक्तव्य केली आहेत, ज्यामुळे ती चर्चेचा विषय बनली आहे. तिनं केतन अग्रवाल याच्या हत्येप्रकरणी आरोपी असलेल्या सियाच्या जामिनाची मागणी केली आहे. दरम्यान, ही महिला स्वतःची ओळख ‘सामाजिक-राजकीय भाष्यकार’ आणि ‘मूलगामी बहुजन स्त्रीवादी’ (Radical Bahujan Feminist) अशी करून देतेय.

विशेष म्हणजे, तिचा असा दावा आहे की, सियाला तिच्या पालकांनी एका नको असलेल्या विवाहात अडकवलं होतं आणि तिला कदाचित केवळ उच्च शिक्षण घ्यायचं होतं… प्रियांकाचा असाही आरोप आहे की, केतन अग्रवालचा मृत्यू एका ‘अपघातात’ झाला होता, पण त्यानंतर सियाला त्याच्या हत्येच्या प्रकरणात गोवण्यात आलं. तसेच, तिनं पोलिसांवर हे प्रकरण बनावट तयार केल्याचा आणि ‘पालकांच्या सामाजिक दबावामुळे’ बळजबरीनं कबुलीजबाब घेतल्याचा आरोप केला आहे. इतकंच नाही तर, तिनं आपल्या ट्वीटमध्ये स्पष्टपणे म्हटलंय की, “केतन अग्रवाल याच्यासोबत असंच व्हायला हवं होतं…”

धक्कादायक बाब म्हणजे, तिनं पुढे असंही म्हटलंय की, “प्रत्येक ‘अरेंज मॅरेज’चा  शेवट असाच तार्किक निष्कर्ष गाठणारा असावा…” याशिवाय, तिनं असंही वक्तव्य केलंय की, सियाच्या वडिलांनीही “अशाच प्रकारच्या रोषाचा सामना केला पाहिजे…”

दरम्यान, स्वतःला ‘सामाजिक-राजकीय भाष्यकार’ आणि ‘मूलगामी बहुजन स्त्रीवादी’ म्हणवणाऱ्या महिलेच्या वक्तव्यांमुळे जनता हादरली असून, एका युजरनं तिच्याबद्दल म्हटलंय की, “या विकृत मानसिकतेच्या व्यक्तीला नक्की काय झालंय? ती खरोखरंच दृष्ट आहे… ही नक्कीच ड्रग्ज घेत असावी.” तर, अनेकांनी या महिलेच्या बोलण्यावर संताप व्यक्त केलाय. तसेच, अनेकांनी सर्वांना तिच्या बोलण्याकडे दुर्लक्ष करण्याचा सल्लाही दिलाय.

महत्त्वाच्या इतर बातम्या :

Pune Ketan Agrawal Case Hina Khan Comment: पुण्यातील केतन अग्रवाल प्रकरणानं प्रसिद्ध अभिनेत्री हळहळली, संतापून सिया गोयललाच विचारला प्रश्न, म्हणाली…

Comments are closed.