‘आयटीवाल्यांचं दादा शांतपणे ऐकतात, पण आम्हाला…’; हिंजवडीच्या सरपंचांचे अजित पवारांवर गंभीर आ

पुणे: राज्याचे उपमुख्यमंत्री तथा पुण्याचे पालकमंत्री अजित पवार (Ajit Pawar) यांनी हिंजवडी ग्रामपंचायतचे सरपंच गणेश जांभुळकर यांना गेल्या आठवड्याच चांगलेच खडेबोल सुनावले होते, दौऱ्यावेळी अजित पवारांचा सरपचांना झापतानाचा व्हिडीओ व्हायरल झाला होता. सरपंच अजित पवारांना काहीतरी सांगण्याचा प्रयत्न करत होते, मात्र त्यावेळी त्यांनी संताप व्यक्त करत बोलताना दिसले. हिंजवडी गावचे सरपंच गणेश जांभुळकर यांचं नेमकं म्हणणं काय होतं त्यावेळी समोर आलं नाही. पण आता सरपंचांनी थेट अजित पवारांवर गंभीर आरोप करत त्यांची नेमकी मागणी काय आहे हे सांगितलं आहे. त्याचबरोबर गणेश जांभूळकर यांनी अखेर त्यांची भूमिका मांडली आहे.

अजित पवारांच्या विकास कामांना आमचा विरोध नाही, परंतु ते आम्हाला विचारात घेऊन काम करत नाहीत, असा थेट आरोप त्यांनी अजित पवार यांच्यावर केला असून केवळ ते आयटीयन्स यांचं ऐकतात, आम्हाला बैठकीला बोलावलं जात नाही, मुळात हिंजवडी गावच्या समस्या नसताना नाव हिंजवडीच खराब होत आहे, गावकऱ्यांचं म्हणणं ऐकून घ्यावं अनेक मंदिर, शाळा, घरे रोडमध्ये जाणार आहेत, त्यामुळे अजित पवारांना सरपंच गणेश जांभुळकर यांनी हात जोडून विनंती केली आहे, की यापुढे तरी आम्हाला विश्वासात घेऊन हिंजवडीतील कामे करावीत.

सरपंच गणेश जांभुळकर नेमकं काय म्हणालेत?

सरपंचानी त्या व्हायरल व्हिडीओच्या दिवशी काय घडलं हे सांगितलं. ते म्हणाले, अजितदादांकडे मी गावातले प्रश्न मांडायला गेलो होते दादा आमचे दोन रस्ते आहेत. छत्रपती शिवाजी चौक ते डांगे चौक, छत्रपती शिवाजी चौक ते वाकड चौक, या रस्त्यांचे रुंदीकरण थोडं कमी व्हावं. कारण तिथे आमच्या शाळा आहेत आणि ग्रामपंचायती आहेत, तिथे रहिवासी लोक आहेत. जवळपास 200 परिवार तिथे वास्तव्यास आहेत. पुढे गणपती मंदिर आहे, साई मंदिर आहे. स्मशानभूमी आहे. वाकड रोडला देखील दोन-तीन मंदिर आहेत त्यामुळे मी त्या दिवशी दादांना विनंती करायला गेलो होतो. रस्त्याचं थोडं रुंदीकरण कमी करून घ्या, हे दादांना बोलायला गेलो. दादाचं तिथे शाब्दिक झालं. पण ते काय रागवले नाहीत. तो थोडा गैरसमज झाला. त्यामुळे ती बाईट आणि तो व्हिडिओ सगळीकडे व्हायरल झाला. त्यानंतर पुन्हा अजितदादांनी माध्यमासमोर सांगितलं आम्ही कोणावर रागवत नाही, त्यावेळी थोडासा गैरसमज झाला होता. काम करताना आम्हाला विश्वासात घेतला जात नाही. आम्ही दादांना तिथे पहाटे पाच वाजता भेटायला गेलो, ते 6 वाजता येणार आहेत असं समजलं म्हणून आम्ही तिथे जाऊन थांबलो. त्यांना भेटायला पुन्हा वेळ मिळत नाही म्हणून आम्ही आधी जाऊन थांबलो, गावच्या संदर्भातील प्रश्नांवर बोलण्यासाठी तिथे आम्ही त्यांना भेटायला गेलो. दादा आम्हाला विश्वासात घेत नाहीत. दादांना आयटीएन्स वेगळं सांगतात, दादा त्यांचं ऐकतात, ग्रामपंचायत विकासाच्या आड येते असा दादांच्या मनात आमच्याबद्दल चुकीचा मेसेज गेलेला आहे, असे पुढे सरपंच जांभुळकर म्हणालेत.

अजित पवारांच्या दौऱ्यानंतर हिंजवडीकर एकवटले

आयटीनगरी हिंजवडीच्या विकास कामांवरून हिंजवडी ग्रामस्थ आक्रमक झालेत, उपमुख्यमंत्री अजित पवारांनी मवाळकीची भूमिका घेऊन रस्त्यांविषयी योग्य मार्ग काढावा, अन्यथा आम्हाला न्यायालयात जावं लागेल असा इशारा हिंजवडचे सरपंच गणेश जांभूळकर यांनी दिला आहे, हिंजवडीची दुरावस्था झाल्याने अजित पवारांनी स्वतः लक्ष घालून विकासकामे करून घेत आहेत, सतत वाहतूक कोंडी आणि अरुंद रस्ता असलेल्या छत्रपती शिवाजी महाराज चौक ते वाकड आणि डांगे चौक च्या दिशेने नव्याने होणाऱ्या रस्त्यावरून ग्रामस्थ आक्रमक झालेत, आज हिंजवडीत ग्रामसभा घेण्यात आली त्यामध्ये ग्रामस्थांनी आक्रमक भूमिका घेतलीय, त्यांनी अनेक पर्यायी रस्ते सुद्धा असल्याचं म्हटलय या संदर्भात सोमवारी पी एम आर डी ए कार्यालयात गावकरी एक बैठक घेत आपली भूमिका स्पष्ट करणार आहेत, आता यावर उपमुख्यमंत्री अजित पवार किंवा पीएमआरडीए काय भुमीका घेणार ते पाहावं लागणार आहे.

आणखी वाचा

Comments are closed.