राज्यसभेच्या जागा 4 आणि भाजपमध्ये 25 इच्छूक, माधव भंडारींचं नाव पुन्हा चर्चेत, यंदा संधी मिळणार
राज्यसभा निवडणूक 2026: आगामी राज्यसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर सध्या भाजपच्या गोटात उमेदवारांची नावे निश्चित करण्यासाठी खलबतं सुरु आहेत. महाराष्ट्रातील राज्यसभेच्या 7 जागांसाठी येत्या 16 मार्चला निवडणूक होत आहे. या निवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज भरण्यासाठी आता फक्त पाच दिवस शिल्लक राहिले आहेत. या पार्श्वभूमीवर भाजपच्या गोटात चार उमेदवारांची नावे निश्चित करण्यासाठी खल सुरु आहे. त्यासाठी मंगळवारी रात्री मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांचे निवासस्थान असलेल्या वर्षा बंगल्यावर भाजपच्या (BJP) कोअर कमिटीची महत्त्वाची बैठक पार पडली होती. या बैठकीत सुरुवातीला भाजपकडून चार ते पाच नावांवर शिक्कामोर्तब केल्याचे सांगितले जात असले तरी प्रत्यक्षात कोअर कमिटी दिल्लीतील पक्षश्रेष्ठींकडे 25 जणांची यादी पाठवणार आहे. या 25 जणांच्या यादीत भाजपचे निष्ठावंत माधव भंडारी यांचे नाव असल्याचेही समजते. परिणामी प्रत्येक राज्यसभा निवडणुकीप्रमाणे (Rajya sabha Election 2026) यंदाही माधव भंडारी (Madhav Bhandari) यांचे नाव चर्चेत आले आहे. त्यामुळे भाजप यंदा तरी माधव भंडारी यांना राज्यसभेवर पाठवणार का, याकडे सर्वांच्या नजरा लागल्या आहेत.
सूत्रांच्या माहितीनुसार, राज्यसभा उमेदवारांसाठी केंद्रीय भाजपकडे पाठवण्यात येणाऱ्या 25 जणांच्या यादीत विनोद तावडे, रावसाहेब दानवे, डॉ. भागवत कराड, विजया रहाटकर, मिलिंद कांबळे, कुणाल पाटील, भारती पवार, दिलीप कांबळे, माधव भंडारी, अमर साबळे, प्रीतम मुंडे, डॉ. संगीता फुसाटे यांच्या नावांचा समावेश असल्याचे समजते. दरम्यान, गेल्या अनेक वर्षांपासून भाजपसोबत असणारे रिपाईचे सर्वेसर्वा रामदास आठवले यांच्या राज्यसभेचा कार्यकाळ संपत आहे. त्यामुळे भाजपकडून त्यांना राज्यसभेवर पाठवले जाऊ शकते. परिणामी त्यांचे नाव निश्चित मानले जात आहे. त्यामुळे आता उर्वरित तीन जागांवर 25 जणांपैकी कोणाची वर्णी लागणार, हे बघावे लागेल.
Rajyasabha Election 2026: कसं असणार राज्यसभेतल्या जागांसाठीचं गणित?
राज्यसभेच्या एकूण जागा : 7
विद्यमान विधानसभा सदस्यः २८६
(अजित पवार आणि शिवाजी कर्डिले या दोन जागा रिक्त)
कोटा : 3576 (म्हणजे 3600 मते) ( येथे एका आमदाराचे मत म्हणजे 100, म्हणून 36 आमदार हा कोटा)
(फॉर्म्युला : 286 गुणिला 100/भागिला 7 जागा+1/अधिक+1)
(अर्थात एकूण झालेल्या मतदानावरुन कोटा निश्चित होतो)
भाजपा : 136 (कर्डिले 1 वगळता)
तीन जागांसाठी लागणार : 108
भाजपाकडे अतिरिक्त मते : 28
शिवसेना : 56
एक जागेसाठी लागणार : 36
अतिरिक्त मते : 20
राष्ट्रवादी : 40 (अजित पवार वगळता)
एक जागेसाठी लागणार : 36
अतिरिक्त मते : 4
…..
महायुती : 52 अतिरिक्त मते
सहाव्या जागेची 36 मते वजा केली तरी 16 मते अतिरिक्त
म्हणजे सातवा उमेदवार निवडून आणायचा असेल तर 20 मते अतिरिक्त आणावी लागतील.
…..
उबाथा: २०
एका जागेसाठी अतिरिक्त लागतील : 16
शरद पवार : १०
एका जागेसाठी अतिरिक्त लागतील : 26
काँग्रेस : 16
एका जागेसाठी अतिरिक्त मते लागतील : 20
(त्यामुळे महाविकास आघाडीचा एक उमेदवार जिंकायचा असेल तर दोन शक्यता: तिन्ही पक्षांनी एकत्र येऊन एक उमेदवार देणे, किंवा काँग्रेस आणि उबाठा हे दोनच पक्ष एकत्र आले तरी 36 असे काठावरचे बहुमत त्यांना लाभते)
आणखी वाचा
आणखी वाचा
Comments are closed.