रोहा, नागोठणे, माणगाव, महाड, पेण भागात पूर ओसरला… आता धोका साथीच्या रोगांचा; अतिसार, गॅस्ट्रो, काविळ, टायफॉइड, कॉलरा
सलग आठ दिवस पावसाने झोडपल्याने रायगड जिल्ह्यातील अनेक गावांना पुराचा वेढा पडला. बाजारपेठा, घरे आणि पाण्याचे स्त्रोत पुरात बुडाले. आता पूर ओसरला असून पाणीचिंता संपली असली तरी दूषित पाणी आणि गावागावांत कुजलेले धान्य व खाद्यपदार्थांमुळे साथीच्या आजारांचे नवे संकट निर्माण झाले आहे. मुख्यतः रोहा, नागोठणे, माणगाव, महाड, पेण या पूरग्रस्त गावांना त्याची मोठी झळ बसण्याचा धोका आहे.
रायगड जिल्ह्यात १ ते ८ जुलैदरम्यान सलग जोरदार पाऊस पडला. या पावसाने पाण्याची चिंता दूर केली असली तरी पुरानंतर निर्माण झालेले दूषित पाण्याचे संकट अधिक गडद केले आहे. पुराच्या पाण्यासोबत मोठ्या प्रमाणावर गाळ, चिखल, कचरा, सांडपाणी आणि इतर घाण पिण्याच्या पाण्याच्या स्त्रोतात मिसळले आहे. अनेक ठिकाणच्या विहिरी, बोअरवेल, तलाव, लहान पाणी पुरवठा योजना पाण्याखाली बुडाल्याने या स्त्रोतातील पाणी दूषित आणि गढूळ झाले आहे.
तातडीने जलशुद्धीकरण करा – जिल्हाधिकाऱ्यांचे आदेश
अशुद्ध पाण्यामुळे गॅस्ट्रो, काविळ, टायफाइड, कॉलरा यांसारख्या जलजन्य आजारांचा धोका वाढला असल्याने प्रशासनाने तातडीने प्रतिबंधात्मक उपाय हाती घ्यावेत, अशी मागणी रायगडवासीयांमधून होऊ लागली आहे. युद्ध पातळीवर निर्जंतुकीकरण करण्याबरोबरच जिल्हा परिषदेच्या पाणी पुरवठा विभागाने तातडीने जलशुद्धीकरण करून नागरिकांना स्वच्छ पाणी मिळेल याची कार्यवाही करावी, अशा सूचना जिल्हाधिकारी किशन जावळे यांनी दिल्या आहेत.
Comments are closed.