आरक्षणाच्या मुद्द्यावर पत्रकार परिषद घ्या, जरांगे-भुजबळांना बोलवा, जागा नसेल तर आम्ही शिवसेना भ
देवेंद्र फड्नाविसवरील संजय रौत: मराठा आरक्षण (Maratha Reservation) आणि ओबीसी आरक्षणावरून (OBC Reservation) राज्यातील राजकीय वातावरण चांगलेच तापले आहे. मराठा समाजाच्या आरक्षणासंदर्भात राज्य सरकारने काढलेल्या जीआरला ओबीसी समाजाकडून तीव्र विरोध होत आहे. मराठा आरक्षणाच्या जीआर विरोधात राज्याचे अन्न, नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण मंत्री तथा ज्येष्ठ ओबीसी नेते छगन भुजबळ (Chhagan Bhujbal) यांनी न्यायालयीन लढाई लढण्याचा इशारा दिलाय. यावरून छगन भुजबळ आणि मनोज जरांगे पाटील (Manoj Jarange Patil) यांच्यात आरोप-प्रत्यारोप होत असल्याचे पाहायला मिळत आहे. आता मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावरून शिवसेना ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत (Sanjay Raut) यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांच्यावर हल्लाबोल केलाय.
संजय राऊत म्हणाले की, या विषयावर लोकांनी आत्महत्या करण्यासाठी सुरुवात केली आहे. राज्यातील मुख्यमंत्र्यांनी या विषयावर पत्रकार परिषद घेऊन लोकांच्या शंकाआणि प्रश्नांना पुराव्यासह उत्तर द्यायला पाहिजे. ते जाता येता फक्त एखादी कॉमेंट पास करून जातात. इतका मोठा निर्णय तुम्ही घेतलेला आहे. एक भूमिका घेतलेली आहे. तुम्ही पत्रकार परिषद घ्या, असे त्यांनी म्हटले आहे.
पत्रकार परिषदेला जागा नसेल तर आम्ही शिवसेना भवन देऊ (Sanjay Raut On Devendra Fadnavis)
संजय राऊत पुढे म्हणाले की, तुमच्या पत्रकार परिषदेला जागा नसेल तर आम्ही शिवसेना भवन देऊ. सर्व चहापान आम्ही करू. यासंदर्भात जो गोंधळ आणि अराजक महाराष्ट्रात निर्माण झालेला आहे त्या संदर्भात तुम्ही जनतेशी संवाद साधा. मुख्यमंत्री आणि दोन उपमुख्यमंत्र्यांनी एकत्र बसावं. पत्रकार परिषदेला जरांगे पाटील आणि छगन भुजबळ यांना बोलवावे. समोरासमोर होऊ द्या. तरच या महाराष्ट्रात शांतता नांदेल. आज प्रत्येक समाज अशांत आहे. मुख्यमंत्र्यांनी मोदींप्रमाणे पत्रकार परिषदेला घाबरू नये. लोकांचा संयमाचा अंत पाहू नका, असे देखील त्यांनी म्हटले आहे.
मोदींच्या मणिपूर दौऱ्यावर राऊतांची टीका (Sanjay Raut on पंतप्रधान मार्ग मणिपूर भेट)
पंतप्रधान नरेंद्र मोदी आज, 13 सप्टेंबरपासून तीन दिवसांच्या मिझोराम, मणिपूर, आसाम, पश्चिम बंगाल आणि बिहार दौऱ्यावर जाणार आहेत. याबाबत विचारले असता संजय राऊत म्हणाले की, जाऊद्या. त्यांच्या दौऱ्याकडे कुणाचे लक्ष नाही. त्यांच्या दौऱ्याला मणिपूरमध्येच विरोध होत आहे. त्यावर न बोललेले बरे. काही गोष्टीवर, अराजकतेवर लोकांचे लक्ष जाऊ नये म्हणून असे उपक्रम ते साजरे करतात. भारत-पाक सामन्यावरचे लक्ष विचलित करायचा हा प्रयत्न आहे. त्यांच्या दौऱ्याकडे आम्ही फार गांभीर्याने पाहत नाही. जेव्हा नग्न धिंड काढली जात होती, तेव्हा ते कुठे होते? तेव्हा तोंड उघडले नाही. आता कशाला? हे सर्व ढोंग आहे, अशी टीका त्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर केली.
https://www.youtube.com/watch?v=EFG43UY92_Y
आणखी वाचा
आणखी वाचा
Comments are closed.